जन-कला: नोंदी महानगरातल्या (भाग ३)



फौंडेशन फॉर इंडियन कंटेम्पररी आर्ट, दिल्ली या संस्थेकडून मिळालेल्या अभ्यासवृत्तीच्या कामाचा भाग म्हणून गेल्या महिन्यात गुवाहटीला पोचले. ईशान्य भारतात प्रवास करायची ही माझी पहिलीच वेळ. तेही मला तिथं भेटलेल्या जवळजवळ प्रत्येक माणसानी विचारलं होतं. सुरूवातीला या प्रश्नानी मी थोडीशी बुजत होते. आपण आजवर या भागात आलो नाही याची खंत मनात होती. आणि थोडंसं अपराधीपणदेखील. ते याकरिता की समकालीन कलेत या भागात काय प्रकारचे प्रयोग चाललेत, कलाकारांची मानसिकता काय आहे, कशाप्रकारे ते काम करताहेत याची फारच वरवरची कल्पना मला होती. मुंबई-दिल्लीकडच्या कलासंस्थांमध्ये किंवा कलेविषयक लिखाणामध्येही त्या भागात आकाराला येणाऱ्या कलेला फारसं स्थान नाही, त्याविषयी अभ्यास करणारे अगदी मोजकेच कलाभ्यासक आहेत. तिथं जायची तयारी करत असतानाही मोजकेच लेख मला कला नियतकालिकांमध्ये सापडले. गेल्या काही वर्षात मौशमी कंदाली, अमृता गुप्ता आणि मेघाली गोस्वामी यांनी आसामच्या आधुनिक आणि समकालीन कलेवर संशोधनपूर्ण लिखाण केलंय. पण तेही आसाममधल्या कलाक्षेत्राचा आवाका लक्षात येण्यासाठी पुरेसं ठरत नाही. दुसरा महत्वाचा प्रश्न मला अनेक वेळा विचारला गेला तो म्हणजे 'तुला इथल्या कलेचा अभ्यास का करावासा वाटतोय?' त्यात 'तू ईशान्य भारतातील नसताना तुला यात रस का निर्माण झाला', असं बहुतेक वेळा अध्यारूत असायचं. माझ्या बरोबर असलेली दुसरी संशोधिका, अमृताने मी इथलीच आहे शिलॉंगची असं सांगितल्यावर त्यांचं समाधान झालेलं दिसायचं. आणि माझं उत्तर सरळ होतं, मी भारतातल्या मोठ्या शहरातल्या जनकलेचा अभ्यास करतेय त्यामुळे तेही उत्तर आमच्यातला विश्वास वाढून मनमोकळा संवाद करायला पुरेसं असायचं.

या सगळ्या प्रक्रियेत मला मात्र मेनलॅंड आणि ईशान्य भारत हा फरक पहिल्यांदाच ठळकपणे जाणवला. त्याचा आवाका समजून घेताना संजय हजारीका यांचे 'रायटींग अॉन द वॉल' हे एेतिहासिका आढावा घेणारे पुस्तक किंवा ध्रुब हजारिकाच्या 'सन्स अॉफ ब्रह्मपुत्रा' ही कादंबरी, तसंच मेघाली गोस्वामी आणि मौशमी कंदाली सारख्या कला इतिहासाच्या अभ्यासकांच्या लेखनात आसामचा इतिहास, भू-राजकीय परिस्थिती, सांस्कृतिक घडामोडी, कलाविश्वाची जडणघडण, विद्यार्थी चळवळ, बंडखोरी याचे संदर्भ येत राहातात. स्वातंत्र्यपूर्व काळात बंगाली संस्कृती व वैैचारिक प्रभुत्व इथे वाढत गेले आणि तेच आपल्याला आसामच्या कलेतही उतरलेले दिसते. आसामच्या आधुनिक कलेचं भान हे त्या काळात कलकत्त्यामध्ये उभे राहिलेले कलाकारांचे कलेक्टिव, आधुनिकतेविषयीची वैचारिक घुसळण, आंतर्राष्ट्रीय कलाप्रवाहांचा प्रभाव यातून घडत गेले. १९६० नंतरचा तिथला काळ समजून घेताना वसाहतकालीन इतिहास समजून घेणंही महत्त्वाचं ठरतं. ब्रिटीश काळातला 'ईशान्य सरहद्द प्रांत' हा भारतापासून प्रशासकीय दृष्टीने आणि ब्रिटीश धोरणांमुळे मुख्य भारतापासून वेगळा राखला गेला. त्यामुळे या भागात वांशिक स्वायत्ततेचा उदय होण्यास हातभार लागला. तसंच बांग्लादेशला सीमा जोडलेली असल्यामुळे तिथले हिंसाचार, वांशिक अस्मिता, राजकीय प्रातिनिधित्वाचे प्रश्न हे सारे तिथला स्थलांतराचा इतिहास, भू-राजकीय प्रश्न, राजकीय अस्थिरता यांच्या संदर्भातच पाहावे लागतील. 'आसु' ही विद्यार्थी चळवळ, तेलाच्या आणि एकूणच विकासाच्या प्रश्नाला हात घालणारी आसाम चळवळ, 'उल्फा'ची बंडखोरी, बांग्लादेशी स्थलांतरितांना त्यांनी केलेला विरोध, त्यातून उदयाला आलेला मुस्लिम विरोध आणि हिंसाचार, बोडोलॅंडची मागणी आणि त्यातून आकाराला आलेल्या अतिरेकी कारवाया, लष्कराने केलेला हस्तक्षेप या सगळ्याचे समाजशास्त्रीय विश्लेषण हे गुंतागुंतीचे आहे. या सगळ्यात 'केंद्र-परिघा'च्या मांडणीतूनच बघितलं गेल्यामुळे कला इतिहासाच्या अभ्यासात आणि कला समीक्षेच्या क्षेत्रातही या भागाचे चित्रण हे मुख्यत्वे करून त्याच्या 'अनोखे'पणावर भर देत केले गेले. पण परीघावरचे कलाप्रवाह केवळ मुख्यप्रवाहाला बळी पडले किंवा त्याच्या प्रभावाखाली राहिले असंच नव्हे तर त्या असमतोलाच्या नात्यामुळे आणि नकारामुळे त्यांनी स्वतःचे नवे मार्ग आणि भाषा तयार करण्याचे प्रयत्न केलेले दिसून येतात.

दिलीप तामुली,नोबडी, एव्हरीबडी, डेडबॉडी

 

राजकुमार मझिंदर, अगेन्स्ट होलोकॉस्ट अॅंड टेररीझम



समकालीन कलेत गुवाहाटी, सिलचर या शहरांमध्ये अनेक प्रयोग केले जाताहेत, कलेची नवी माध्यमं हाताळली जाताहेत पण त्यांची फारशी दखल मुख्यप्रवाहातल्या कला नियतकालिकात घेतली जाताना दिसत नाही. तिथले अनेक कलाकार बडोदा, हैदराबाद, दिल्ली अशा ठिकाणी कलाभ्यास करून परत जाऊन तिथे राहातायत, कलाक्षेत्रात नवे प्रकार रूजवू पाहातायत. १९९०च्या आसपासच गुवाहटीमध्ये समकालीन कलेतल्या अशा प्रयोगांना सुरूवात झालेली दिसते. रॉयल डॅनिश अॅकॅडमीतून शिकून आलेल्या दिलीप तामुली यांनी 'मस्तिष्क कोना'च्या रूपात पहिल्यांदा या भागात इस्टॉलेशन उभं केलं. त्यांच्या कलाव्यवहारात त्यांनी सतत इतर कलाकारांबरोबर सहयोगातून काम केलं आणि काव्य, पथनाट्य, ग्राफिक डिजाईन, इस्टॉलेशन, परफॉर्मन्स यांच्या सरमिसळीतून कलाकृती निर्माण केल्या. नंतरच्या काळात ते हळूहळू सार्वजनिक अवकाशात हस्तक्षेप करणाऱ्या कलानिर्मितीकडे वळले. याच काळात विवान सुंदरम यांनी नवी वाट चोखाळली. चित्रकलेकडून ते इनस्टलेशनकडे वळलेले आपल्याला दिसतात. त्यांनी दिल्ली-मुंबईत केलेल्या त्यांच्या कला प्रदर्शनातून समकालीन कलेला वेगळी दिशा मिळाली. पण दिलीप तामुलींच्या म्हणण्याप्रमाणे सुंदरम यांच्या काही महिने आधीच त्यांनी भारतातला इस्टॉलेशनमधला पहिला प्रयोग गुवाहटीमध्ये केला होता. आसाममधील वांशिक अस्मितांचं राजकारण, त्यातून तयार झालेलं अस्वस्थतेचं वातावरण यांचं प्रतिबिंब तामुलींच्या कामात उमटलेलं दिसतं. रॉबिजीता गोगोई यांच्याबरोबर त्यांनी 'आयडेंटीटी मार्केट' आणि 'गाथा' ही जागतिकीकरण आणि त्यामुळे एेरणीवर आलेल्या 'आयडेंटीटी'च्या मुद्द्यावर भाष्य करणारी सादरीकरणं/इस्टॉलेशन आकाराला आली तर २०१२ च्या त्यांच्या 'नोबडी, एव्हरीबडी, डेडबॉडी' हा सार्वजनिक अवकाशात हस्तक्षेप करणारा परफॉर्मन्स त्यांनी गुवाहाटीच्या कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन पार पाडला. हिंसाचारात रस्त्यावर इतस्ततः विखुरलेल्या मृतदेहांचा पंचनामा करताना पांढऱ्या खडूने मानवाकृती आखल्या जातात त्या कृतीची नक्कल करत ते मानवी हिंसेने व्यापलेलं सामाजिक वास्तव, पोलिसांनी केलेली फसवी एनकाऊंटर, शहरात पसरलेली असुरक्षिततेची भावना अशा अनेक पैलूंवर विचार करायला भाग पाडतात.

आसाम चळवळ आणि आसामी राष्ट्रवादावर चिकित्सक टीप्पणी करताना शांतिनिकेतन आणि बडोद्याला शिकलेल्या राजकुमार मझिंदर यांनी चित्रकला, मुद्रा-कला यांच्याबरोबरच सार्वजनिक अवकाशात इस्टॉलेशनच्या माध्यमातून हस्तक्षेप करायला सुरूवात केली. यात त्यांनी आसामी कवी निलोमणी फुकान यांच्या कविता कोरून त्या पुस्तकांच्या लाकडी जळक्या कपाटात ठेवल्या. लाल भुकटी आणि फुटलेल्या काचांमध्ये उभी केलेली ही गोलाकार रचना आसाम चळवळीच्या बळींना आदरांजली तर ठरतेच पण आसामच्या बहुसांस्कृतिक समाजात पुन्हा एकदा 'केंद्र – परीघ' अशी रचना तयार करणाऱ्या या चळवळीवरच प्रश्नचिन्हं उभं करते. २००८च्या बॉंबस्फोटांच्या मालिकेनंतर त्यावर टीकात्मक भाष्य करणारं 'अगेन्स्ट होलोकॉस्ट अॅंड टेररीजम' परफॉर्मन्स-इनस्टलेशन त्यांनी दुगलीपुखरी या तळ्याच्या काठाशी मांडलं. त्यात त्यांनी जळालेले तीन लाकडी दरवाजे मांडले होते आणि समोरच्या सिमेंटच्या चौथऱ्यावर लहान मुलांनी तेली खडूने चित्रे रंगवली. दरवाजावरची कुलपं निरपराध लोकांचा जीव घेणाऱ्या शासन आणि बंडखोर या दोन्हीच्या हिंसाचारामुळे निर्माण झालेल्या असुरक्षितता आणि भीतीचं वातावरण यांची जाणीव करून देणारी होती. बॉंबस्फोटाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येनी जमा झाले होते

इंद्राणी बरूआ, कल्चरल रि-इमॅजिनेशन्स

 

हरेकृष्ण तालुकदार, क्विट फ्रॉम स्प्लिट

 

अलिकडच्या दोन-चार वर्षात तुलनेनं या शहरातलं वातावरण शांत आहे आणि असंही लक्षात आलं की तरूण मंडळी भूतकाळातल्या हिंसाचाराबद्दल बोलायला फारशी उत्सुकही नाहीत. यातूनच मग त्यांना जिव्हाळ्याच्या वाटणाऱ्या विषयांवर काम केलेलं दिसून येतं. याचं उदाहरण म्हणजे हरेकृष्ण तालुकदार या कलाकार आणि क्युरेटर यांचे काही कला-प्रकल्प. 'अॅस्थेटीक' या कलेक्टीवच्या माध्यमातून त्यांनी अस्मिता, स्थलांतर, सीमारेषा यासारख्या मुद्द्यांना हात घालणारे 'स्प्लिट' आणि 'क्विट फ्रॉम स्प्लिट' हे परफॉर्मन्स केले. यात ते घराची आकृती ही सतत रूपक म्हणून वापरताना दिसतात. त्यांचा 'रि-विजिटींग दीपोर बील' हा प्रकल्प वाढत्या शहरीकरणामुळे उद्भवणाऱ्या पर्यावरणीय प्रश्नांना भिडणारा होता. गुवाहाटी शहराजवळ राहाणारे विविध भाषिक व सांस्कृतिक लोकसमूह, त्यांचा मौखिक इतिहास, मिथक, स्मृती, तिथल्या परिसराशी असलेलं त्यांचं नातं आणि प्रशासकीय धोरणांमुळे उद्ध्वस्त होत चाललेली जैव वैविध्यता तसंच सांस्कृतिक विविधता यांचा परामर्श घेत कलाकारांनी इथे कला-हस्तक्षेप केले. यात त्यांनी तिथे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वस्तू किंवा सहलीला आलेल्या लोकांनी टाकलेल्या प्लास्टिक आणि कागदी वस्तूंचा वापर केला.

आर्किटेक्ट, कलाकार आणि संशोधक असलेल्या इंद्राणी बरूआ यांचा 'कल्चरल रि-इमॅजिनेशन्स' हा प्रकल्प ब्रह्मपुत्रा नदीकाठी आकाराला आला. २०१२ साली सुरू केलेला तीन टप्प्यात चालणाऱ्या या प्रकल्पाचा उद्देश कलाकार-कारागीर, कला आणि वास्तुकला, हस्तकला आणि ललित कला अशा साचेबंद मांडणीला छेद देणं आणि त्याच प्रक्रियेतून संमिश्र कलाव्यवहार कसा आकाराला येईल याच्या शक्यता आजमावणं हा होता. सुरूवातीला यात कारागीरांबरोबर काम करताना हस्तकला-व्यवहार आणि कलेतील अमूर्तता यांचा मेळ घालत त्यांच्या साचेबंद व्याख्यांवर विचारविनिमय केला गेला. त्यानंतर स्थानिक आणि शाश्वत असं तंत्र वापरून आणि कलाकार, कारागीर व कामगारांच्या सहयोगातून बांबूचा तराफा बनवला गेला. यात संगीत, साहित्य, चित्रपट, नाटक, लोककला अशा अनेक क्षेत्रातल्या कलाकारांनी सादरीकरण केलं. स्थानिक लोकसमूहांबरोबर काम करत ब्रह्मपुत्रा नदी, तिचा परिसर, पर्यावरणीय प्रश्न यांना भिडत लोकसहभागातून नदी भोवतालच्या संस्कृतीबद्दल जाणीव निर्माण करणं असाही याचा उद्देश आहे. मर्यादित काळासाठीच तिथे उभी असलेला हा तराफा 'फिरस्ता' किंवा 'जाजाबोर' कवी म्हणूनच कल्पिला गेला होता.

या वैयक्तिक पातळीवरच्या प्रयत्नांबरोबरच सामूहिक पातळीवरही काही कार्यक्रम आणि उपक्रम इथे चालू असलेले दिसतात. गुवाहाटी आर्ट कॉलेज, गौहाटी आर्टिस्ट गिल्ड, शंकरदेव कलाक्षेत्र, आर्ट अॅंड क्राफ्ट सोसायटी यासारख्या संस्था गेली काही दशकं इथं कार्यरत आहेतच पण अलिकडच्या काही वर्षात कलादालनाच्या बाहेर पडून कलाकार काम करतायत, एकत्र येऊन नवे प्रयोग करतायत, संस्थात्मक रचनांवर टीका करतायत. परात्मता आणि विखंडितता यामुळे माणसाला जखडून टाकणाऱ्या भांडवली समाजरचनेला समोरासमोर तोंड देण्याकरिता वैचारिक आणि दृश्यात्मक पातळीवर काय प्रयोग करता येतील हे आजमावण्यासाठी डिजायर मशिन कलेक्टीव २००४ मध्ये आकाराला आला. त्यांच्या 'पेरीफेरी' या प्रकल्पांतर्गत, सोनल जैन आणि मृगांक मधुकालिया यांनी एक जुनी बोट भाड्याने घेऊन ती ब्रह्मपुत्रेच्या काठावर उभी केली. यात कला, नदीचा, शहराचा इतिहास, परिसर, मौखिक परंपरा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, जन-कला हस्तक्षेप, अर्बन डिजाइन इत्यादिच्या अशा विविध विषयांतल्या संवादात्मक उपक्रमांसाठी ती एक प्रयोगशाळा ठरली. 'नरेटीव्स अॉफ ब्रम्हपुत्रा', 'भोटभोटी टेल्स' यासारख्या प्रकल्पात कलाकारांनी ब्रह्मपुत्रेवरचे नावाडी, प्रवासी यांच्या कथा, नदीच्या अवकाशात घडणारे संवाद, त्यातून आकाराला येणारी कथानकं, चित्रपट असे अनेक प्रयोग त्यांनी केले आहेत. 'डीएमएस'चे हे प्रकल्प आणि गुवाहाटीला त्यांनी आपला तळ बनवणं, तसंच त्यांनी वापरलेल्या आकृतीबंध, रचना आणि माध्यमं यातून ते एकप्रकारे केंद्र-परीघ रचनेला उलथून टाकण्याचा प्रयत्न होता. २००५ मध्ये किशोरकुमार दास, राजकुमार मझिंदर आणि देबानंद उलुप यासारख्या कलाकारांनीही एकत्र येऊन 'अन-डू अॉब्जेक्ट्स' हा कलेक्टीव सुरू केला. संकल्पनात्मक कला व्यवहार, जन-कला प्रकल्प, प्रदर्शनं, रस्त्यावरचे कला-हस्तक्षेप अशा माध्यमांतून काम करणं हा याचा मुख्य उद्देश होता. याच धर्तीवर नंतरच्या काळात, 'येलो कॅब कलेक्टीव' आणि अगदी अलिकडे 'अंगा नॉर्थ ईस्ट' हे कलाकारांचे - कला विद्यार्थ्यांचे कलेक्टीव्स गुवाहाटी मध्ये आकाराला आले. 'अंगा नॉर्थ ईस्ट'धले कलाकार म्हणतात त्याप्रमाणे आर्ट स्कूलबरोबर असलेल्या 'गोड भांडणातून' हा कलेक्टीव उभा राहिला. कलेचा अभ्यासक्रम, त्यातले अनेक प्रश्न, शिकवण्याच्या पद्धती, कलाशाळेची मर्यादित संसाधनं, त्याविषयीची सर्वपातळीवरची अनास्था यातून या मुलांना एकत्र येऊन समकालीन कलेला सामोरं जावं, नव्याचा शोध घ्यावा या उर्मीतूनच हे सुरू झालंय. मुंबई किंवा बंगलुरू सारख्या शहरांपेक्षा वेगळी प्रक्रिया इथे घडताना दिसतेय त्यामुळे यातून गुवाहटीच्या समकालीन कला प्रयोगांना कशी दिशा कशी मिळते ते पाहाणे मोलाचे ठरणार आहे.


छायाचित्र सौजन्य: राजकुमार मझिंदर, दिलीप तामुली, इंद्राणी बरूआ, हरेकृष्ण तालुकदार
विशेष आभार: अमृता गुप्ता-सिंग

पूर्वप्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, पुणे | सप्टेंबर २०१६