'हाकारा' कशासाठी? / Why 'Hakara'?

मे २०१७ मध्ये पहिली आवृत्ती आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो तेव्हापासून 'हाकारा' का? हा प्रश्न अनेक वेळा आम्हाला विचारला गेला. 'हाकारा'ची कल्पना प्रत्यक्ष आकार घेऊ लागल्यापासून ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. कला, साहित्य आणि सामाजिक-सांस्कृतिक भान या सगळ्याला एकत्र बांधणारं, त्यावर चर्चा घडवून आणणारं एक अवकाश असावं, या विचारातून 'हाकारा'ला सुरूवात झाली. यावर विचार करताना, त्याला शब्दरूप देताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आज असं अवकाश मर्यादित रूपात  आपल्याला दिसतं.  त्याची व्याप्ती आणि खोली वाढवायची असेल तर त्यावर नव्याने लिखाण, चर्चा आणि चिकित्सा व्हायला हवी. त्याच्या  कक्षा रुंदावायच्या असतील तर माध्यम पण ते अवकाश सामावणारे हवे आणि सहजपणे वाचक अभ्यासकांपर्यंत पोचवण्यासाठी उपलब्ध असणारं  हवं. त्यामुळेच  नवमाध्यम त्याच्या लवचिकतेमुळे माध्यमाचे आणि आरेखनाचे प्रयोग करायला उपयोगी ठरलंय. दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा द्वैभाषिकतेचा. मराठी आणि इंग्रजी भाषेत घडणारी मांडणी, विचारमंथन आणि देवाणघेवाण यातून समृद्ध चर्चाविश्व कसं आकाराला येईल, त्याकरिता कोणती नवी माध्यमे आणि घाट वापरता येतील यावर सातत्याने संवाद घडत राहावा, यासाठी हा 'हाकारा'चा पार.


Snehal Goyal, Before I lose them forever (Edition 01: Memory II)







 
K.G. Subramanyan, Santhal Letters, Asia Art Archive collection (Edition 01: Memory II)


'हाकारा'चं रसायन हे जर्नल किंवा नियतकालिक आणि  दृश्यात्मकता व त्यातली सौंदर्यदृष्टी यांच्या मिश्रणातून तयार होत आहे. प्रत्येक आवृत्ती ही नव्या विषयाला धरून त्या भोवती रचलेल्या कथा, कविता, चित्रं, मुलाखती, लेख यासारख्या निरनिराळ्या रचनाप्रकारातून आकार घेते. 'आठवण' मध्ये हिंसेच्या अनुभवाच्या कैफियतीपासून साध्या पण आयुष्य बदलून टाकणाऱ्या घटनांना उजाळा मिळतो. 'आतलं, बाहेरचं, अधलं-मधलं' मध्ये गुंतागुंतीच्या आणि असंख्य पदर असलेल्या जगण्याच्या, कलाव्यवहाराच्या, सांस्कृतिक इतिहासाच्या अनेक पैलूंवर मांडणी केली आहे. ही मांडणी करणारे कवी, चित्रकार, छायाचित्रकारांपासून इतिहासकार, कथाकार, नाटककार आणि शास्त्रज्ञ आहेत. एकाच विषयाच्या अनेक बाजू, अनेकविध दृष्टीकोन त्या विषयाबद्दलच कुतूहल जागवतात, जागं ठेवतात. त्याचे निरनिराळे पैलू आपल्यासमोर आणतात. यातून 'हाकारा'तील मांडणी ही ठरावीक पद्धतीच्या अभिव्यक्तीच्या किंवा कलाविष्काराच्या रूपांना धडका देत त्यांचा परीघ मोठा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानिमित्ताने आम्ही मांडलेली 'हाकारा'ची भूमिका:

हाकारा । hākārā
(नाम/noun)
//: (m) हाक, बोलावणे;

a call, a general or a great and continued calling


हाकारा’ या मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणा-या ऑनलाईन नियतकालिकाच्या अवकाश-निर्मितीमागे भवताल, आपण आणि आपली निर्मिती यामधील गुंतागुंतीचं नातं समजून घेण्याची भूमिका आहे. जगणं, भाव-भावना, सौंदर्य आणि संस्कृतीविषयक विचार आपल्या कला-दृष्टी आणि निर्मितीवर, लिहिण्यावर आणि वाचण्यावर कसे आणि कोणते प्रभाव पाडत असतात? मानवी बदल कलाविषयक देवाण-घेवाणी आणि सौंदर्य- जाणिवांशी कसे जोडून घेत असतात? सतत बदलत्या आणि प्रवाही असणाऱ्या कला-जाणिवा आपला भवताल कसा घडवत असतात? या आणि इतर मुद्द्यांचं आकलन लिखित आणि दृश्य माध्यमातून ‘हाकारा’च्या पारावरुन संवादी रीतीनं मांडण्याचा प्रयत्न आहे. काळ, संस्कृती आणि कला यांच्यातील देव-घेव नेहमीच बहुपदरी आणि बहुपेडी राहिलेली आहे. अभिव्यक्ती सद्यकालात घडत जात असते तर उद्याकडे पाहात आताचा काळ गतकाळाशी आपली नाळ जोडून असतो. कलाकृतीमध्ये तीनही काळ एकमेकांत अशा अनोख्या रितीने गुंतलेले असतात की त्यांच्यातील सीमारेषा धुसर होतात. त्रि-काळाच्या सत्य आणि आभासी खेळातून कला अभिव्यक्ती, सौंदर्यभान आणि तिचे बदलते निकष यातून समकालीन अभिव्यक्ती साकारत असते. अभिव्यक्तीने निरनिराळे घाट, शैली आणि रचना अंगिकारणं तसंच अशा अभिव्यक्तीचं सखोल आकलन करुन घेणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अशा तऱ्हेनं आकाराला येणारी नाविन्यपूर्ण निर्मिती आणि चिकित्सक प्रक्रिया ‘हाकारा’चा गाभा असेल.

‘हाकारा’च्या पारावरून बोलावण्यामागं लिखित आणि दृश्य कला माध्यमात ऐरणीवर असलेल्या मुद्द्यांविषयी सखोल चिंतन आणि समग्र चर्चा घडवून आणणं हा उद्देश आहे. आशय, घाट आणि रचनेचे ‘संहिता’ अंतर्गत आणि ‘संहिता’ बाह्य भवतालाशी असलेल्या आंतरिक संबधांचं विश्लेषण इथं केलं जाईल. कला-माध्यमांचं आंतर-संवादी स्वरुप निरखणं जसं महत्वाचं ठरतं तसंच त्यांची इतिहास, तत्त्वज्ञानाबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानासारख्या ‘इतर’ विद्याशाखांशी घातली जाणारी सांगड मोलाची ठरेल.

‘हाकारा’चा पार वैविध्यपूर्ण शैलीतले लिखाण आणि मांडणी, समीक्षा, कविता, गाणी, कथात्म-साहित्य, वाद-विवाद, मुलाखती, दृक-श्राव्य आणि दृश्य रूपांची गुंफण अशा विविधांगी आविष्कारांतून आपल्याशी मुक्त आणि थेटपणे संवाद साधेल असा आम्हाला विश्वास वाटतो.

हाकारा'ची येती आवृत्ती आता/Now  या विषयाभोवती गुंफलेली आहे. आपल्या कलाकृती/लिखाण पाठविण्यासाठी पाहा: http://www.hakara.in/appeal-call-3/

आशुतोष पोतदार आणि नूपुर देसाई
संपादक, हाकारा । hākārā


Current edition


Our contemporary lives and actions have been radically influencing expressions of writing, image-making and publicizing. Conversely, the production, consumption and circulation of expressions have influenced the aesthetics, politics and networking today. With hākārā, our aim is to explore and practice newer ways of producing and appreciating creative expressions while encouraging dialogue between different fields of expressions. Considering a rich and diverse body of creative work, we’ll focus on creative and critical writing in Marathi and English across literary and visual forms of expressions.
In keeping with this focus, hākārā will be published online in freely accessible and interactive format by focusing on the area that may help us address the diversities and the synergies implicit in literary and visual cultures.

The hākārā editors would be interested in the sharing of research, speculations, literary and visual work presented innovative ways that responds to current debates while being attentive to the nuanced understanding and interconnectedness of content, form and society. We particularly encourage innovative nature of literary and visual images, critical artistic practices and developments that inform the contemporariness of the medium (and its pasts and futures), as well as the formal qualities of words and images in changing contexts.

To submit your work for our forthcoming edition on आता/Now , please see our Next Call here: http://www.hakara.in/appeal-call-3/

Ashutosh Potdar and Noopur Desai
Editors, हाकारा । hākārā.

शांतिनिकेतनचा समकालीन शिलेदार: संचयन घोष यांची मुलाखत (भाग ३)



निराळ्या अवकाशात आणि सामाजिक संदर्भात काम करताना तुमच्या प्रक्रियेमध्ये कोणते बदल घडत जातात? गेल्या कोची बिनालेतल्या 'क्रिटीकल जंक्चर' या प्रदर्शनातल्या तुमच्या संदर्भात मी हे विचारतेय...

गेल्या कोची बिनालेच्या वेळी मी एक वर्तमानपत्र तयार केलं, 'डोन्ट टॉक अबाऊट पोलंड'. मल्याळम सिनेमात हे वाक्य बऱ्याचदा वापरलं जातं. कम्युनिस्ट भावाला दुसरा भाऊ सुनावत राहतो की पोलंड मध्ये अमकं झालं, तमकं झालं, त्यावर कम्युनिस्ट असलेल्या भावाचं उत्तर असतं, ''डोन्ट टॉक अबाऊट पोलंड'! तो आमचा अंतर्गत मामला आहे, या अर्थी. हे मी वापरायचं कारण म्हणजे 'क्रिटीकल जंक्चर' हे प्रदर्शन कोचीत पोलंडच्या सहयोगानं भरवलं होतं. रशिया भेटीनंतरचे टागोरांनी सहकार चळवळीबद्दल मांडलेले विचार किंवा कम्युनिस्ट सत्ता पोलंडमध्ये आता नसताना तिथे घडलेले बदल, भारतातल्या कम्युनिस्ट चळवळीतून आलेली सांस्कृतिक मांडणी यावरचे जुने लेख, आत्ता पोलंडमध्ये चालू असलेल्या सामाजिक-सांस्कृतिक हस्तक्षेपावरचे लेख यांचा त्याच्या समावेश केला होता. दुसरं म्हणजे मी गेली काही वर्ष हरीकुमार गुप्ता या लोककलाकाराबरोबर काम करतोय. सामाजिक व्यंगावर गाणी आणि सादरीकरणातून टीका-टिप्पणी करण्याचा हा प्रकार. त्यांची स्वतःची अशी काही कलेविषयक भूमिका आहे, संकल्पना आहे. ती पण या पत्रिकेत छापली होती. कोचीत एका चहाच्या टपरीवर आम्ही दोघांनी त्याचं जाहीर वाचन केलं. पूर्वी कम्युनिस्ट चळवळ जोरात असताना कामगार रोज चहाच्या टपरीवर जमून असं वाचन आणि त्यावर चर्चा करायचे. कोचीत ते हळूहळू बंद पडलं. पण साधारणपणे १९७० पर्यंत त्यांच्या रोजच्या जगण्याचा तो अविभाज्य भागच होता. तोच फॉर्म आम्ही वापरायचं ठरवलं

 

त्यातल्या विडिओमधून सध्या चालू असलेल्या माझ्या प्रकल्पाची प्रक्रिया टिपलेली दिसते. हरीदा शांतिनिकेतनपासून ३० किमीवरच्या एका गावात राहतात. त्यांचं गाव, तिथल्या खाणी, लोकांचं जगणं हे सगळं त्यांच्या गाण्यात, कवितेत उतरताना दिसतं. इथली उपसलेली माती दूरच्या कारखान्यात जाते आणि तीच माती गावातले लोकं परत विकत घेतात. त्याच्या वस्तू बनवून तिथल्याच बाजारात विकतात. वस्तूंची ही देवाणघेवाणही त्या विडीओत दिसते. स्वतःचीच माती ते विकतातही आणि विकतही घेतात! हरीदांबरोबर मी निरनिराळ्या अवकाशात काम केलंय, त्यांचं गाव, तिथल्या जागा, कलकत्त्याची कला दालनं किंवा हा कोचीचा प्रकल्प. त्यांच्याबरोबरच्या गप्पांमधून, चर्चेतून हे आकाराला येतं. त्याच बरोबर, 'समकालीन' या संकल्पनेकडे आपण कसं बघतो, तेही महत्वाचं ठरतं. समकालीन ही प्रवाही संकल्पना आहे. ती स्थानिक पातळीवरही आकार घेत असते आणि ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. सर्वसामान्यपणे ज्याला आपण पारंपारिक म्हणतो त्यातही ही समकालीनता उमटताना दिसते. तसं बघायला गेलं तर ती 'साइट-स्पेसिफीक' असते. त्या प्रक्रियेत सहभागी व्हायला मला आवडतं. कोची सारख्या पूर्णपणे अनोळखी ठिकाणी काम करताना दोघांसाठी ती प्रक्रिया घडत होती: सांस्कृतिक, भाषिक पातळीवरही.

अशा प्रकारे सहयोगातून कलाकृती उभ्या करताना नेमकं काय वेगळं घडत असतं? म्हणजे कलाकार म्हणून त्यावर नेमका कुणाचा हक्क असतो?

कलाकृतीवर कलाकाराचा हक्क तर असतो. कलाकारच त्या कलाकृतीचा कर्ता/कर्ती असते. त्याच्या पूर्णपणे पलिकडे जाऊन काहीतरी असेल अशा रोमॅंटिक विचारातही आपण अडकता कामा नये. माझं यात काहीच नाही, सगळं लोकांनीच केलंय असं काही नसतं. मुद्दा असा आहे की त्याची व्याप्ती तुम्ही कशी वाढवता, ज्यायोगे ती कलाकृती फक्त एका व्यक्तीची किंवा एकाच विचारातून आलेली न राहाता जास्त व्यापक बनेल. तुम्ही इतरांचे मुद्दे विचारात घेता तेव्हाच ती परिपूर्ण बनते. अशा कलाकृतींचा मुळात हेतूच तो आहे. पण कलाकृती निर्माण करताना सगळ्यांना सारखाच हक्क असेल, ती प्रक्रिया पूर्णपणे लोकशाही पद्धतीने हाताळली जाईल, ही कल्पना जरा युटोपिक आहे. त्यामुळे कलाकृती बनवताना तुम्ही अनेक मुद्दे आणि भूमिका विचारात घेतलेच पाहिजेत, त्या विचारांचं बहुपेडी असणं हाच त्याचा गाभा आहे.

खाजगी आणि सार्वजनिक यासारख्या कल्पनांचा कलाक्षेत्राच्या संदर्भात, खास करून जनकलेचा विचार करताना, तुम्ही कसा विचार करता? त्या कशा आकाराला आल्या?

हे मात्र मी शांतिनिकेतनमध्ये शिकलो. तिथल्या सामूहिक जगण्यातून आणि एकत्र येऊन केलेल्या कला उत्सवातून शिकत गेलो. कारण आपल्याकडे त्याचं काही प्रारूप तयार नाहीये किंवा इतिहासातले काही दाखले नाहीयेत. सार्वजनिक असणं याचं आपल्याकडचं उदाहरण म्हणजे स्वातंत्र्य चळवळ आणि राष्ट्रवादाचा उदय. ब्रिटीशविरोधातून तो त्या काळात आकाराला आला. शहराला भिडणारा असा सार्वजनिक अवकाशाविषयीचा विचार आणि मांडणी आपल्याकडे झाली नाहीये. त्यामुळे या ठराविक राष्ट्रवादाच्या चौकटी बाहेर जाऊन आपल्याला उदाहरण शोधावी लागतात. ते जरा अवघडच काम आहे. गेल्या २०-२५ वर्षात मात्र आपल्याला आजूबाजूला ते आकाराला येताना दिसायला लागलंय. १९९० नंतरच मुख्यतः कारण त्याआधी पब्लिक-प्रायवेट याचा विचार करणाऱ्या कलाकृती फारशा नव्हत्या. विवान सुंदरमचं कलकत्त्यातलं इन्स्टलेशन, 'खोज'चे प्रकल्प किंवा सफदरच्या हत्येनंतर दिल्लीत सुरू झालेलं 'सहमत'चं काम, एवढंच. त्याशिवाय, नाटकाच्या क्षेत्रात काहीतरी केलं जात होतं पण दृश्यकलेच्या बाबतीत मात्र फारसं घडलेलं दिसत नाही. पण त्याआधी पाहायचं झालं तर १९६० मधल्या सोमनाथ होर यांच्या 'तिभागा डायरी' आहेत. त्यांनी तिभागा चळवळीच्या काळात गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या, तिथल्या लोकांच्या वेदना समजून घेतल्या. त्यातून या डायरी तयार झाल्या. किंवा दुसऱ्या बाजूला नव-सिनेमा आला. त्यातही कॅमेरा प्रत्यक्ष गावात, लोकांपर्यंत पोहोचला, खऱ्या लोकेशनवर गेला. कलेच्या बाबतीत 'खाजगी' आणि 'सार्वजनिक' या कल्पनांची एेतिहासिक पार्श्वभूमी बघताना याचाही विचार केला पाहिजे. १९६० ते ८० मध्ये देशभर अशा प्रकारचे प्रयोग चालू होते. कलाप्रकल्प म्हणून नव्हे तर सामाजिक कार्याच्या क्षेत्रातले उपक्रम आणि संवाद या पातळीवर ते काम चालू होतं. पण त्यात बरीच सर्जनशील मंडळी काम करतच होती. फक्त सामाजिक विकासाचा मुद्दा नव्हता तर जगणं, व्यवहाराच्या पद्धती यातूनही ते घडत होतं. पण त्या इतिहासाचं दस्तेवजीकरण झालं नाही. त्याविषयी लिहिलं गेलं नाही, त्यामुळे त्यातलं आज फारच थोडं आपल्यापर्यंत पोहोचतं. आसाममध्ये एकानी जंगल उभं केलं. अशी उदाहरण खूप आहेत. त्याचा इतिहास लिहिला गेला पाहिजे नाहीतर मग कलाकारांना सतत 'या प्रकारच्या कला व्यवहाराची सुरूवात कुठून झाली?' या प्रश्नाला सतत सामोरं जावं लागतं. शांतिनिकेतन मधली भित्तीचित्रं आणि रामकिंकर यांची शिल्पं याच्या पलिकडे अकादमीक क्षेत्रात त्याचं उत्तर मिळत नाही


 

मला कलाभवनमध्ये पण 'तू चित्रं का काढत नाहीस?' या प्रश्नाला तोंड द्यावं लागतं. माझं उत्तर एवढंच आहे की मी कॅनव्हासवर चित्रं काढत नाही. इतर मटेरिअल, प्रक्रिया, अनुभव यातून ते आकाराला येतं. तो संघर्ष कायम चालू असतो. पण थोडं पुढं-मागं करत त्यातूनच मार्ग काढावा लागतो. मला कला शिक्षक म्हणून दिलेल्या चौकटी काम करावं लागतं. मी फक्त त्याची व्याप्ती वाढवायचा प्रयत्न करतो. उदाहरण द्यायचं झालं तर मला 'लाईफ स्टडी' शिकवावं लागतं. पण मग तिथंच मी 'शॅडो कास्टींग'चा प्रयोग केला. असे स्टडी करताना मग मी त्यांना सामाजिक अवकाशात घेऊन जातो. तिथले अनुभव, त्या जागेचा इतिहास, निरनिराळी मटेरिअल हे सगळं तुमच्या चित्रात कसं आणता येईल आणि ते समजून घेऊन चित्र कसं तयार होईल, असा विचार मी विद्यार्थ्यांना करायला लावतो. आता केवळ माध्यम आणि घाट याच्या पलिकडे जाऊन बरेचजण विचार करायला लागलेत असं दिसतंय. अर्थात, या सगळ्याबद्दल आमच्या सतत वाद आणि चर्चा होतच असतात.

या सारख्या प्रकल्पांवर काम करताना दोन महत्त्वाचे मुद्दे समोर येतात, एक म्हणजे आर्थिक पाठबळ आणि दुसरं म्हणजे त्यांचं दस्तेवजीकरण करणं. त्या संदर्भात काय सांगू शकाल?

आत्ता मी ज्या प्रकल्पावर काम करतोय त्याला 'आयएफए'ने थोडी मदत केली आहे. मी शक्यतो फंडिंग एजन्सीकडून पैसे घेऊन काम करत नाही कारण मग फक्त पैसे मिळवायला हा काम करतोय अशी कलाकाराची प्रतिमा बनते. त्यापेक्षा मला लोकांबरोबर काम करण्यात, त्यांच्याशी संवाद साधण्यात रस आहे. यात मी एका नाटकाच्या ग्रुपबरोबर काम करतोय. वेगवेगळ्या प्रकारे लॅंडस्केप कसं दाखवता येईल याचा विचार आम्ही करतो आहोत. बीरभूममधल्या वेगवेगळ्या भागात आम्ही मिटींग घेतोय. तिथली जमीन, निसर्ग आणि एकूण राहाणीमान समजावून घेतोय. यात विविध क्षेत्रातले लोक एकत्र आले आहेत. ते त्यांच्या कामातून आपापल्या भागातल्या लॅंडस्केपला कसं भिडतात, ते पाहायचा प्रयत्न आहे. ते एकत्र येऊन हे धागे एकत्र आणू शकतात का आणि या जमिनीची, अवकाशाची काही वेगळी कल्पना करू शकतात का, ते आम्हाला पाहायचं आहे. जमीन ही केवळ मालकी हक्कापुरती मर्यादित न राहाता अशा इतर काय शक्यता असू शकतात ते पाहाणं महत्त्वाचं आहे. त्या त्या भागातले लोक-कलाकार, कारागीरांना आम्ही बोलवायचं ठरवलं. ते त्यांची रोजंदारी सोडून येणार तर त्यांना किमान जाण्या-येण्याचा खर्च तरी द्यायला हवा म्हणून मग मी 'आयएफए'ला विचारलं. त्यांनी आर्थिक मदत करायची तयारी दाखवली. ते पैसे संशोधनाकरता असले तरी ही प्रक्रिया तेवढ्यापुरती मर्यादित नाही. ती मुख्यतः संवादी प्रक्रिया आहे. आम्ही सुरूवात टागोरांकडून प्रेरणा घेऊन सहा ऋतू, सहा गावं यापासून केली. नंतर मात्र त्याची दिशा बदलली. भौगोलिकदृष्ट्या एकदम वेगळ्या असलेल्या सहा जागा आम्ही निवडल्या. लोकांना भेटलो. त्यांच्या ओळखीतून अजून काही लोक जोडले गेले. त्यांच्या बरोबरच्या गप्पांमधून काय काय करता येईल ते ठरवलं. यासाठी सहा शामियाने उभे केले. त्या त्या ठिकाणी त्यात कार्यक्रम आयोजित केले. एक दिवसभर एकत्र जमून अनेक गोष्टी समजून घेतल्या, चर्चा केली. त्याचा विडिओ आणि साऊंड रेकॉर्डिंग आहे.

यात एक़ गोष्ट नक्की की आम्ही कुठलाही परफॉर्मन्स करत नाही. आपापल्या कला व्यवहाराचं चिकित्सक आकलन करणं हा त्यामागचा हेतू आहे. प्रत्येक जण आपापल्या कला प्रकाराचे बारकावे सगळ्यांसमोर ठेवतो आणि मग त्यावर चर्चा होते. यात शेतकरी पण आहेत, ते शेतीही करतात आणि लोककलाकार आहेत, ते गाणीही गातात. यात शेती तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक इतिहासकार आहेत त्यामुळे जमिनीच्या प्रश्नांवर पण खूप चर्चा होते. शेतीच्या प्रश्नावर चर्चा होते. पण त्या भागातून आलेल्या लोककलाप्रकारांवरही गप्पा होतात. त्यात नेमके काय आणि कसे बदल घडता आहेत, ते हे कलाकार मांडतात. त्या शामियानाचं आणि त्यावर काढलेलं डिजाईन हा पण एक चर्चेचा मुद्दा असतो. त्या डिजाईनमध्ये तिथल्या लोकसंख्येची माहिती पुरवणारे आलेखही काढले जातात. एके ठिकाणी या शामियान्याच्या कापडावर काही महिलांनी त्यांची गाणी लिहिली, भरतकाम केलं. शेवटच्या वेळी सगळीकडची अशी आकडेवारी घेऊन त्याची शामियानाच्या कापडावर चित्ररूपात मांडणी केली. त्याला साधारण कार्यशाळेचं स्वरूप येतं त्यामुळे येऊन फक्त सादरीकरण करून गेले असं होतं नाही. लोकांचा पूर्णवेळ सहभाग यात अपेक्षित आहे. वसंत ऋतूमध्ये एका आदिवासी खेड्यातल्या शाळेत हा कार्यक्रम पार पडला. तिथल्या स्थानिक गोष्टी आणि आधुनिकता यांचा मेळ साधत टागोरांच्या विचारांतून ही शाळा चालवली जाते. ते गुंतागुंतीचे संबंध काय आहेत हेही आम्हाला समजून घ्यायचं होतं. संथाळ नृत्य तिथे सादर केलं गेलं पण त्यात आधुनिक काळात नेमके कोणते बदल घडले यावरही चर्चा केली गेली.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे कुणीही 'प्रेक्षक' नसतं. सगळेजण या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतात. हे सहा कार्यक्रम झाल्यावर त्यांना एकत्र कसं आणायचं हा मोठा प्रश्न आहे. पण आम्ही त्या त्या ठिकाणी हे अनुभव प्रदर्शित करायचा विचार करतो आहोत, तसंच इतर ठिकाणीही ते घेऊन जायचा विचार करतो आहोत. पण ते बाहेर घेऊन जाताना त्यामागचं आमचं धोरण काय असेल ते नीट ठरवावं लागेल. ते तुम्ही इतरत्र कसं घेऊन जाता, त्याची मांडणी कशी करता, त्यातून काय पद्धतीचे संबंध प्रस्थापित होतात ते लक्षात घेणं फार गरजेचं आहे. दुसरं म्हणजे त्याच्या भोवती सजावट न करता ते जसंच्या तसं लोकांसमोर मांडणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. तो दस्तेवज अपूर्ण असू शकतो, त्यात त्रुटी असू शकतात, ती चालू प्रक्रिया म्हणून लोकांसमोर येऊ शकते. त्या प्रकल्पाचं बहुपेडी असणं हे दस्तेवजीकरणाच्या प्रक्रियेत टिकवता आलं पाहिजे. विविध पद्धतीने ते करता येऊ शकत. विडिओ रेकॉर्डिंग, रेखाटनं, नोंदी ठेवणं, डायरी, फोटो, इत्यादि. अशा प्रकल्पांमध्ये त्यांची तात्कालिकताही तेवढीच महत्त्वाची असते. त्यामुळे विडिओ रेकॉर्डिंगमध्ये अगदी पाच वेगवेगळ्या आवृत्ती पण असूच शकतात! त्यातून एखादं नवीन कथनही तयार होऊ शकतं. अर्थात, ती वेगळीच कलाकृती ठरेल. ती या प्रक्रियेला पुरेसा न्याय देऊ शकत नाही. मला असं वाटतं की त्या दस्तेवजाचा अस्सलपणा जपणं मोलाचं आहे. कारण माझ्यासाठी फॉर्मपेक्षा प्रक्रिया जास्त महत्त्वाची आहे.


मुलाखत आणि अनुवाद: नूपुर देसाई
छायाचित्र सौजन्य: संचयन घोष

पूर्वप्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, मार्च २०१७

शांतिनिकेतनचा समकालीन शिलेदार: संचयन घोष यांची मुलाखत (भाग दोन)


यातून तुम्ही मग सार्वजनिक अवकाशाकडे कसं वळलात? काही प्रयोगांबद्दल सांगू शकाल काय?
माझे परफॉर्मन्स हे मी एक परफॉर्मर म्हणून सादर न करता एक प्रक्रिया म्हणून घडवत असतो. माझा रोख हा माझ्या कृती आणि हालचालीतून ते अवकाश कसं बदलेल, त्याचं जडणं-घडणं कसं बदलेलं यावर असतो. आणि कलाकारांची भूमिका ते त्यांच्या शरीर आणि अभिनयात कसं आणता येईल आणि त्यापुुढे संवादात कशी रूपांतरित करता येईल यावर भर देणारी असते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी ते घडत जातं. माझ्याबाजूने एका परीने तर होतंच पण त्यांच्याही बाजूने ते आकार घेतं. त्यानंतर मी एका सार्वजनिक स्मारकाच्या ठिकाणी कला-हस्तक्षेप केला. कॉलेज स्ट्रीट भागात ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा आणि स्मारक आहे. त्या स्मारकालाही इतिहास आहे. नक्षलवादी चळवळीचा जोर असताना त्यांनी एका ठराविक पद्धतीच्या शिक्षणपद्धतीला विरोध दर्शविण्याकरिता त्या पुतळ्याचं डोकं उडवलं होतं. ते नंतर परत उभारलं गेलं. तुला माहितीच असेल विद्यासागरांनी हे समाज सुधारक होते आणि विधवा, महिलांचं शिक्षण अशा अनेक आघाड्यांवर खूप काम केलं होतं. शोनागाछी भागात काम करणारा एक गट आहे..दुर्गानारी संघ किंवा असं काहीतरी नाव आहे. मला नेमकं आता आठवत नाही. विद्यासागरांच्या जयंतीला ते त्या भागात फेरी काढतात आणि पुतळ्याला हार चढवतात. ही पण पार्श्वभूमी त्याला होती.

माझा प्रकल्प हा मुख्यत: पुतळ्याकडे एक प्रतिमा किंवा आयकॉन म्हणून पाहात होता, त्याचबरोबर पुतळ्याचं अचलत्व, त्याचे आजच्या संदर्भातले अर्थ, विद्यासागरांनी हाताळलेले मुद्दे, त्यांचं वर्तमानातलं महत्त्व आणि स्थिती असे अनेक मुद्दे त्यातून उलगडत गेले. नाट्यक्षेत्रातला माझा मित्र प्रणव मुखर्जी याच्या बरोबर मी तिथे काम केलं. तो त्यांचं मृत्युपत्र घेऊन आला. विद्यासागर तसे श्रीमंत होते. ब्रिटीशकाळात ते शाळेत शिकवायचे. अनेक लेखक-कवींना त्यांनी त्या काळात मदत केली होती. तर त्यांचं ते मृत्युपत्र हे अर्थातच त्यांच्या संपत्तीबद्दल होतं. मग आम्ही विचार केला की त्यांच्या स्मारकापाशीच त्याचं जाहीर वाचन करूया. त्यांचं सामाजिक आणि व्यक्तिगत आयुष्य ही समांतर रेषांवर चाललेली होती. म्हणजे एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून विचार केला तर त्यांनी खूप लोकांना आर्थिक साहाय्य केलं होतं पण त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांनी त्यांच्या संपत्तीचं नेमकं काय केलं, ते त्यातून कळणार होतं. त्याचबरोबर, आजच्या काळात त्यांच्या कार्याचं काय महत्त्व आहे, हेही. प्लायवूडमध्ये त्यांची आकृती कोरून ती पुतळ्यासमोर ठेवली. सर्वात मोठी पुतळ्याच्या आकाराची होती. त्याचं प्रमाण लहान करत करत एकदम छोटी आकृती सर्वात पुढे होती. त्यामागे पुतळा लपला होता. पुनर्विवाह किंवा स्त्रियांच्या प्रश्नावर नियतकालिकांमध्ये आलेले लेख कापून ते त्यावर गुंडाळले. त्यांनी बंगाली मुळाक्षरं पहिल्यांदा आणली त्यामुळे मग आम्ही ती पण प्लास्टिकमध्ये कापून ठेवली होती. त्या सगळ्या गोष्टी कागदांत गुंडाळल्या आणि मागेच असलेल्या सार्वजनिक तळ्यात त्यांचं विसर्जन केलं.

नंतर सार्वजनिक अवकाशातलं म्हणजे २००६ मध्ये बिर्ला अॅकॅडमीच्या बागेत एक परफॉर्मन्स- इन्स्टलेशन केलं होतं. जमीन आणि त्यात होत चाललेले बदल यावर मी एक परफॉर्मन्स केला. सार्वजनिक बागेतलं ते एक परफॉर्मन्स-इन्स्टलेशन होतं. त्याच सुमारास कलकत्त्यात खोजची सुरूवात झाली. त्यात आम्ही एका आर्किटेक्टबरोबर बाडीपूरमधल्या एका सरंजामी पद्धतीच्या घरात एक कला-हस्तक्षेप पार पाडला होता. कलकत्त्याच्या उच्चभ्रू लोकांसाठीचं ते विश्रांतीसाठी जायचं स्थळं होतं. आणि अलिकडच्या काळात मी कलकत्त्यात माझं काम प्रदर्शित केलंय पण शहरात प्रत्यक्ष कला हस्तक्षेप फारसे केले नाहीयेत.

लॉस्ट इन आयकॉन फ्रोझन इन मिथ, कलकत्ता, २००२

लॉस्ट इन आयकॉन फ्रोझन इन मिथ, कलकत्ता, २००२


कलकत्त्याबाहेर तुम्ही बरेच हस्तक्षेप आणि सामुहिक कला प्रयोग केले आहेत, ते शहराच्या अवकाशाबाहेरचे असले तरी त्याबद्दल काय सांगू शकाल? फक्त कलाकार म्हणून नव्हे तर कला शिक्षक म्हणूनही तुम्ही याला भिडत आला आहात...

एक तर शांतिनिकेतनमध्ये शिक्षक म्हणून काम करतानाचा अनुभव आहे, केलेले प्रयोग आहेत. 'प्रक्रिये' बद्दलची समज वाढवी, त्याचं कला निर्मितीमधलं महत्त्व ध्यानात यावं ही एक बाजू त्याला होती. त्याचबरोबर संवादात्मक कलाकृती आणि निर्मिती प्रक्रिया यांची सांगड घालणंही त्यात होतं. त्या धर्तीवर मग मी विद्यार्थ्यांबरोबर काम सुरू केलं. एक तर शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांबरोबर 'शॅडो कास्टींग' पद्धतीचं काम केलं. त्यांच्या आठवणी, त्यांचे दृष्टीकोन हे सगळं त्यात येत गेलं. पण या प्रक्रियेत त्यांचं शरीरावर मागून प्रकाश पडायचा आणि पडद्यावर त्यांची सावली पडायची. फोटोसिंथेटीक मटेरिअल वापरलं होतं, आपण सिल्क स्क्रीनला वापरतो तसं. पण प्रकाशाची योजना अशा पद्धतीने केली होती की एक्स्पोजरला १५-२० मिनिटं लागायची आणि त्या मधल्या वेळात आमचा संवाद चालू राहायचा. त्यामुळे त्याला अॅनिमेशन सारखा परिणाम साधला जायचा. ते जवळपास मी सलग दहा वर्षं करत होतो. ते नंदनमेलात आम्ही प्रदर्शितही करत असू. दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांना मी शांतिनिकेतनमधल्या बाहेर उभ्या असलेल्या स्मारकांपैकी एक-एक निवडायला सांगत असे. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या जागा निवडल्या. मुलींचं वसतीगृह, टुरिस्टसाठीचं प्रसाधनगृह, ग्रंथालय, बैज यांची शिल्पं. त्याचा इतिहास, त्याचं माध्यम, आशय या सगळ्याची माहिती त्यांनी करून घ्यायची आणि जाहिरातीसारखा तेच शिल्प वापरून फ्लेक्स बनवायचा, असं मी त्यांना सांगितलं. तो फ्लेक्स त्या शिल्पाशेजारीच लावायचा त्यामुळे त्याचा आकार काय असेल, नेमकी जागा कोणती असेल, त्यामागचं राजकारण काय, त्यामुळे फ्लेक्स बनवताना कोणत्या बाबींचा नेमका विचार त्यांत मांडावा लागेल या सगळ्याचा विचार त्या विद्यार्थ्यांना करावा लागे. २००५ नंतर आम्ही 'फूल्स क्लब' सुरू केला. त्याचं नावं होतं 'गॉबेट्स'. ते मुलांनीच निवडलं होतं. 'गॉबेट्स' हे 'गंभीर मूर्ख' असतात म्हणजे त्यांच्या कृती निरर्थक असल्या तरी त्यामागची प्रेरणा ही महत्त्वपूर्ण असते. त्यात वेगवेगळे उपक्रम घेतले. नाट्यघर मध्ये सादरीकरण ठेवलं होतं. यात मुलांनी 'शांतिनिकेतन आयडल' यावर १-१ मिनिटाचे सोलो परफॉर्मन्स करायचे होते. त्यांचं सादरीकरण आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया दोन्ही समोर पडद्यावर उमटताना दिसत असायच्या. शांतिनिकेतनमध्ये सगळ्यात पवित्र मानलं गेलेलं 'छातिम'चं रोपटं बक्षिस म्हणून ठेवलं होतं. जो तिसरा येईल त्याला खरंखुरं छातिम मिळायचं आणि पहिल्या-दुसऱ्याला मात्र सोनेरी-चंदेरी छातिम दिलं जायचं! दुसरा एक प्रोजेक्ट आम्ही केला त्यात शांतिनिकेतनमधला वृक्षारोपणाचा इतिहास टिपण्याचा प्रयत्न केला. रविंद्रनाथांपासून त्याला एक सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे. तर आम्ही तिथल्या अर्काइवमधून झाडं लावण्याचा गेल्या ८० वर्षांचा इतिहासाचा आलेख बनवला. मुलांनी कधी कुठे झाडं लावली गेली त्या जागा शोधून काढल्या. ती झाडं आज कोणत्या अवस्थेत आहेत, त्यातली किती उरली आहेत, त्या जागी भिंती, इमारती किंवा इतर काही उभं राहिलं आहे का याची झाडाझडती या विद्यार्थ्यांच्या गटानी घेतली. वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र अशा विविध शाखांच्या लोकांनी या सहभाग घेतला.

मी स्वतः इथल्या आदिवासींबरोबरही काम केलंय. पण त्याला बराच काळ जावा लागला. सुरूवातीला ते केवळ एका बाजूने होतं. म्हणजे विद्यार्थीदशेत असताना आम्ही रेखाचित्र करायला संथाळ वस्तीवर जायचो तेवढंच. तिथं जाऊन काम करणं अवघडच होतं कारण मी 'बाहेरचा' आहे ही भावना सतत असायची. मी त्यांना जाऊन काय शिकवणार? त्यांची घरं, त्यांचं जगणं याची चित्रं काढण्यापलिकडे जाणं गरजेचं होतं. मग मी त्यांच्याशी शांतिनिकेतनमधला एक कला शिक्षक या नात्यानी संपर्क साधला. त्यांच्या इथल्या सुकलेल्या पानांचे रिसायकलिंग कसं करता येईल यावर एक प्रकल्प सुरू केला. त्याला 'खोज'कडूनही काही मदत मिळाली. दोन गावात दोन स्टुडिओ उभारले आणि त्यात नैसर्गिक तंतूंपासून कागद बनवायची प्रक्रिया सुरू केली. त्यापासून त्यांनी वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या. त्या वस्तू प्रदर्शनात, संथाळ फेस्टिवलमध्येही मांडल्या. त्यांनी तो व्यवसाय म्हणून सुरू करावा यासाठी मी त्यांच्या मागे लागलो नाही. ते या अनुभवाचं आणि कौशल्याचं काय करतात ते जास्त महत्त्वाचं होतं. मग माझ्या लक्षात आलं की व्यवसाय करणं हा विचारच मुळात तिथे रूजलेला नाहीये. त्यामुळे मी त्यावर भर देण्यात काही अर्थ नव्हता. त्यांना जर वाटलं तसं काही सुरू करावं तर ट्रेनिंगसाठी वेळोवेळी मी नक्की जाईनच. ती प्रक्रिया पुढे तशीच चालू राहिली नाही पण ते सहा महिने त्यांच्या बरोबरचा संवाद, वेगळ्या मटेरिअल मधलं काम हे सगळंच अर्थपूर्ण होतं.

लूम हाऊस, कोक्राझार, २००४

लूम हाऊस, कोक्राझार, २००४


कलकत्ता आणि शांतिनिकेतनच्या अवकाशापलिकडे जाऊनही तुम्ही काम केलंय. गेल्या काही वर्षात विविध सामाजिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक संदर्भात हे काम आकाराला आलेलं दिसतं...

आसाममध्ये मी काही काम केलं. गुवाहटीला 'पेरिफरी' बरोबर. त्यांच्या ब्रह्मपुत्रेच्या काठावर उभ्या असलेल्या बोटीवर सलग सात दिवस चहापानाबरोबर गप्पांच्या मैफिली असा तो कार्यक्रम होता. त्या तात्पुरत्या उभ्या केलेल्या अवकाशात गुवाहटी शहर, त्याभोवतीच्या आठवणींना उजाळा देणं, तिथली अनेक कथनं, मिथकं, सामूहिक स्मृती या धर्तीवर तो संवाद घडत गेला. मित्रांच्या आेळखीतून लोक येत गेले, सहभागी होत गेले. त्याला मी 'अॅंकर हाऊस' असं नाव दिलं होतं. ते मुख्यत: संवादात्मक हस्तक्षेपाच्या पातळीवर आकाराला आलेलं काम होतं. नंतर बोडोलॅंडमधल्या कोक्राझारच्या कॉलेजमध्ये एक प्रकल्प केला होता. त्यात मग आजूबाजूच्या हातमाग कारागीरांबरोबर संवाद सुरू झाला. शासन आणि बंडखोर यांच्यातल्या तहानंतर आम्ही भेट देत होतो. त्यात सरकारतर्फे अशा कलाकौशल्याला पाठिंबा देण्याचाही एक भाग होता. ते उभं करण्याच्या किंवा बनविण्याच्या प्रक्रियेत आठवणींना उजाळा देणं, हातमागावर कापड विणणं आणि त्या कारागीरांचं जगणं या दोन्ही बद्दलच्या गोष्टी गोळा करणं अशी ती प्रक्रिया राहिली आहे. आम्ही काही जुने, मोडकळीला आलेले हातमाग मिळवले. लष्कराच्या एका जुन्या पण आता वापरात नसलेल्या तंबूत आम्ही त्याची मांडणी केली. आता वापरात नसला तरी बंडखोरांपैकी काही जण अजून शरण आले नव्हते त्यामुळे कधीही पुन्हा संघर्षाला सुरूवात होईल याचा नेम नव्हता. त्यामुळे तंबूच्या आत हे उभं करणं आम्हाला अधिक सुरक्षित वाटलं. गावातल्या बायकांनी त्यावर कापडही विणलं. बोडोंच्या कापडाच्या डिजाईनमध्ये बरीचं प्रतीकं वापरली जातात. ती प्रतीकं वापरून त्यांनी ते कापड विणलं. या प्रक्रियेत मग खूप लोक येत गेले, चर्चा होत राहिल्या...हे साधारण २००५-६ मध्ये झालं असेल. त्याकाळात जनकलेला फारसं आर्थिक पाठबळही नव्हतं. 'फिका'ची सुरूवात २००८ मध्ये झाली असेल. त्या आधी भारतात असं काहीच नव्हतं. मी त्याकाळात जनकला प्रकल्प करतच होतो. एक़ प्रकल्प मी केला होता तो म्हणजे सुलभ शौचालयांचा. त्यात कल्पना अशी होती की राष्ट्र या संकल्पनेच्या संदर्भात लोकांचा आनंद मोजायचा. गोपाळ भांडची कथा वापरून मी काम सुरू केलं. मी चित्रं आणि कथा असलेलं पुस्तक तयार केलं. त्यात गोपाळ भांडची कथा मांडली. उडिया आणि हिंदी म्हणजे प्रादेशिक आणि राष्ट्रीय अशा दोन्ही भाषात ती कथा मांडली होती आणि भुवनेश्वर शहरातल्या विविध जागा त्यात चित्रित केल्या होत्या. शहरातल्या सार्वजनिक इमारतींच्या पार्श्वभूमीवर जुन्या शिल्पातून मिळालेल्या राजाच्या वेगवेगळ्या प्रतिमा साकारल्या आणि त्या सुलभ शौचालयात स्टोरी-बोर्डाच्या रूपात मांडून ठेवले. तिथे येणाऱ्या लोकांसाठी एक पॅनेल ठेवलं होतं. त्यावर लोक त्यांची आनंदी असण्याविषयीची कल्पना काय आहे, ते लिहू शकत होते. पण ती त्या अर्थी सार्वजनिक जागा होती. त्याहून अधिक खासगी जागा म्हणून मग त्यातली काही पॅनेल्स मी स्वच्छतागृहाच्या आतही ठेवली होती. बाहेरच्या जागेतलं लिखाण हे अगदी नैतिकता पाळणारं होतं पण आतलं लिखाण हे अशिष्ट बोलीभाषेत केलेलं होतं. गंमत म्हणजे स्त्रियांच्या स्वच्छतागृहातून फारसं लिखाण मिळालं नाही! मग ते सगळं लिखाण आणि त्याचे विडिओ असं आम्ही ललित कला अकादमीमध्ये मांडलं. 'राजारेर कष्ट दूर' असं त्याचं नाव होतं, 'कष्ट' म्हणजे पोटाचे त्रास या अर्थी!

(क्रमशः)
मुलाखत आणि अनुवाद: नूपुर देसाई
छायाचित्र सौजन्य: संचयन घोष