Showing posts with label Reviews/परीक्षण. Show all posts
Showing posts with label Reviews/परीक्षण. Show all posts

नाट्यावकाशातील समकालीनतेचे अन्वयार्थ




कलेच्या क्षेत्रात समकालीनतेचा विचार करताना समकालीन नाटक आणि तेही महाराष्ट्रात घडणारं समकालीन नाटक काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. समकालीनतेच्या बहुपेडी व्याख्येत चपखल बसणारं आणि समकालीनतेच्या प्रयोगशीलतेला आपलसं करणारं अलिकडच्या काळातलं लिखाण म्हणजे आशुतोष पोतदार यांची नाटके. त्यांच्या लिखाणातून ते त्यांच्या भवतालाला भिडतात, सामाजिक सांस्कृतिक भान बाळगत प्रत्ययकारी नाटकांच्या संहिता त्यांनी गेल्या दहा वर्षात मराठी नाटकाचे वाचक, अभ्यासक आणि प्रेक्षकांना दिल्या आहेत. 'वॉटरमार्कपब्लिकेशन'ने प्रकाशित केलेल्या आशुतोषपोतदार यांच्या चार नाटकांच्या दोन संग्रहात संहिता एकत्रितपणे वाचायला मिळाल्यामुळे त्यांच्यातले काही समांतर धागे व लेखकाच्या सर्जनशील प्रक्रियेतील चिंतनाचे विषय समजून घ्यायला तर मदत होतेच पण या संग्रहामुळे त्यांच्या लिखाणातील वैशिष्ट्यांचाही सापेक्षतेने विचार करता येतो. या लेखाच्या सुरूवातीला मला प्रमाणिकपणे नमूद करावंसं वाटतं की या दोन पुस्तकात छापलेल्या चार नाटकांपैकी केवळ 'F1/105' या एका नाटकाचे सादरीकरण मी प्रत्यक्षात पाहिले आहे आणि त्याबद्दल या आधी विस्ताराने इतरत्र लिहिलेदेखील आहे. या टिपणात प्रत्यक्ष सादरीकरण व त्याचे विवेचन हे मुद्दे यात विचारात न घेता मी या नाटकांचा मुख्यतः संहिता म्हणून विचार केला आहे. या पुस्तक द्वयीतला एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे संहितांसोबत दिलेली नाटकांची परीक्षणे. नाटकांच्या प्रयोगांनंतर निरनिराळ्या ठिकाणी प्रकाशित झालेली ही टिपणे या पुस्तकात एकत्रितरित्या वाचकांना वाचायला मिळतात आणि नाटकांच्या संहितांकडे पाहायचा एक दृष्टिकोन मिळण्यास मदत होते.

कसबा सांगाव, कोल्हापूर, बंगलुरू आणि पुणे अशा लेखकाच्या व्यक्तिगत प्रवासातून घडणारं असलं तरी नाटकीय काळाच्या संदर्भात ते एकरेषीय असत नाही. अनुभव वा आठवणींच्या पातळीवर ते प्रतिमारूपात आपल्या समोर उभं राहातं. त्यातून तयार झालेल्या समकालीन संवेदना, त्यातले पदर व त्या पदरांच्या घड्या एकमेकांवर येत राहातात. या संहिता वाचताना एकीकडे फॉर्मच्या प्रयोगातून रूपबंधाचं भान दिसून येतं, तर त्याचबरोबर आशयातून संदर्भचौकट स्पष्ट होत जाते. ‘पुलाखालचा बोंबल्या मारूती' मधलं मुख्य पात्र माया म्हणते, “निर्मितीप्रक्रिया भवतालातूनच आकारते.” हे अर्थात आपल्याला माहिती असलं तरी ते खऱ्या अर्थानं आशुतोषच्या नाट्यलेखन प्रक्रियेत घडताना दिसतं. एका अभ्यासकाच्या वृत्तीतून घडणारं हे लिखाण कला, संस्कृती, इतिहास, भाषा, सामाजिक आणि राजकीय मीमांसा असे अनेकविध पदर ही त्यांच्या लिखाणाची बलस्थाने ठरतात. मेट्रोपॉलिटन शहरांतून राहाणाऱ्या, वावरणाऱ्या समाजाच्या निरनिराळ्या स्तरातल्या, समुदायाच्या माणसांचे जगणे, त्यातले तणाव व विसंगती, शोषणाच्या व्यवस्था, मोकळीकीच्या रचना, आणि या साऱ्यातून लागत जाणारे अन्वयार्थ हे या नाटकांची पार्श्वभूमी ठरतात. या संहिता व त्यातील पात्रे या मार्फत नाटककार जातीपासून, भाषेपर्यंत, विकासाच्या प्रकल्पापासून उपभोगवादापर्यंत, परंपरेपासून समकालीनतेपर्यंत अनेक विषयांचा उहापोह करतात.



आधुनिकतेच्या भव्यदिव्य उभारलेल्या देखाव्यात एेतिहासिक संदर्भ, ओळखी, मानवी संबंध यांच्या पलीकडे जाऊन सुपरहायवे किंवा मॉलसारख्या '-जागा' (नॉन-प्लेसेस, मार्क ओजे १९९५) आधुनिक, संपन्न जगण्याचा आणि विकासाचा आभास निर्माण करतात. प्रचंड वेगाने जाणाऱ्या गाड्यातून ना वाटेतले रस्ते कळतात, ना गावं ना त्यांच्या खाणाखुणा किंवा चकचकीत मॉलच्या बंदीस्त भिंतीत ना काळाचे भान राहाते ना भवतालात घडणाऱ्या घडामोडींचे. अशा '-जागा' या एकप्रकारचे तुटलेपण तयार करण्यात हातभार लावतात. कोणत्याही प्रकारच्या मानवी संवादारहित असा हा व्यवहार चालत राहू शकतो किंवा असला तरी तो तात्पुरत्या आणि 'कंत्राटी' पद्धतीचा असू शकतो. अशा प्रतीकांच्या वापरातून आत्ताच्या परिस्थितीत सतत आजूबाजूला जाणवणारं एक प्रकारचं विखुरलेपण मात्र केवळ संवादातून नव्हे तर नाटकीय रूपरचनेतून देखील सशक्तपणे उजागर केले गेलेले दिसते. 'पुलाखालचा बोंबल्या मारूती' मध्ये गावातले काही आणि बाहेरून आलेल्यांचा रेसिडन्सीमधला एकत्रितरित्या सहभाग, कला आणि भवतालाचं नातं, जागतिकीकरणानंतर बदलेली विकासाची मॉडेल्स, वेगाने वाढलेली शहरं, गावातल्या शेती आणि शिक्षणापासूनचे अनेक प्रश्न, शहरी मध्यमवर्गाच्या आणि ग्रामीण लोकांच्या बदलत्या आकांक्षा यावरच्या तपशीलवार संवादातून हे विखुरलेपण, तुटलेपणाच्या जाणिवा सजगपणे पुढे आणल्या आहेत. समकालीनता शहरी-ग्रामीण, स्त्री - पुरूष यासारख्या द्वैतांच्या पलीकडे जाते किंवा त्यांना कवेत घेते. गावात चालू असलेल्या आर्ट रेसिडेन्सीतल्या कलाकारांच्या अॅक्टीविटीज मधून परंपरेबद्दलची चर्चा इथे एलकुंचवारांच्या नाट्यत्रयीतल्या एका प्रसंगाच्या निमित्ताने घडते. त्यात गतकाळाला सतत सामोरं जाण्याची प्रक्रिया यांच्या लेखनात अधोरेखित होते. मात्र इतर संहितांपेक्षा अधिक चर्चात्मकतेकडे झुकते व थेटपणाने काही मुद्दे मांडते. शहरीकरणाची प्रक्रिया आणि बदलती गावकुसं याकडे ते लक्ष वेधते. पण गाव नावाच्या गोष्टीकडे एक्झॉटिक व रम्यपणाच्या कल्पनातून बघणं, टोकाच्या दृष्टीकोनातून शहर व गाव असं द्वैत मांडणं याकडे लेखक मात्र चिकित्सकपणे बघतात. त्या ध्रुवीकरणात न अडकता त्यातली गुंतागुंत गावात येऊ घातलेल्या 'सुपरहायवे'च्या आणि त्यामुळे 'विस्थापित' होणाऱ्या बोंबल्या मारूतीच्या प्रतीकातून हाताळतात. जातीच्या उतरंडीबद्दलची चर्चा नंतरच्या टप्प्यावर येते पण सुरूवातीला स्थानिक कलेच्या उल्लेखा दरम्यान मात्र केवळ परंपरा आणि समकालीन कलाविष्काराच्या पद्धती यांच्यातल्या तणावापुरते रेसिडन्सीतल्या कलाकारांचे संवाद घडतात. त्या दोन्हीमध्ये अस्तित्वात असलेले द्वंद्वात्मक नाते मात्र नाटकाच्या ओघात बाजूला पडते. येणाऱ्या बदलाचा स्वीकार करायचा की त्याला नकार द्यायचा हे पर्याय उरतात पण त्यातून वेगळ्या पर्यायाची, अधिक सजग, समतोल साधणाऱ्या बदलाच्या पर्यायासाठीचं अवकाश अशा प्रकारच्या लेखनातून तयार होण्याच्या शक्यता आपण आजमावू शकतो का, असा प्रश्न उरतो.

आज सार्वजनिक आणि खाजगी अवकाशातला फरक धुसर होत जात असताना त्याचं प्रत्यंतर आशुतोषच्या संहितातून प्रखरपणे समोर येते. नाटकीय अवकाशाचा विचार करता 'F1/105' आणि 'आनंदभोग मॉल' ही दोन्ही नाटके मुख्यतः घराच्या खाजगी अवकाशात पार पडतात. अर्थात, हे होत असताना सार्वजनिक अवकाशातल्या घटना, सामाजिक उतरंडी, जात आणि धर्माचं राजकारण या सारख्या आपल्याला जखडून टाकणाऱ्या अनेक गोष्टी या जोडप्यांच्या खाजगी अवकाशात प्रवेश करतात. त्यांचे नातेसंबंध, विश्वास, विचार, त्यांच्या जगण्याची तत्त्वं, सवयी साऱ्यांचीच यात घुसळण होत राहाते. पण ते माणसांच्या मनोवृत्ती किंवा मानसिक आंदोलने या परीघात फिरत राहात नाही. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'आनंदभोग मॉल' हे त्यांचं रंगमंचीय अवकाशात उभं राहिलेलं पहिलं नाटक. यातलं आंतरजातीय विवाह केलेलं जोडपं त्यांच्या जाती अस्मिता विसरू शकत नाही. त्या विसंवादी जगण्यात आणि भांडणात पुन्हा पुन्हा त्यांची जात डोकं वर काढत राहाते. ब्राह्मण आणि मराठा या समाजातल्या दोन उच्च जातीय समूहांचं प्रितिनिधित्व करणारी ही पात्रं आधुनिक समाजात वावरताना जात गळून पडावी लागते याची जाणीव असतानाही त्यांच्या परंपरांचे दाखले देत राहातात, जातीवरून एकमेकांची उणीदुणी काढत राहातात, कामाच्या ठिकाणच्या जातीय राजकारणाने अस्वस्थ होत आपापल्या जातीला घट्ट धरून ठेवू पाहातात. त्यांना मूल न होणं हे जातीभेदाच्या पालिकडंच सत्य दाखवणारं प्रतीक असू शकतं तसंच ते त्यांच्यातल्या खुंटलेल्या नवनिर्मितीच्या जाणिवा वा क्षमता यांचं प्रतीकही असू शकतं. या अस्थिरतेच्या वातावरणात दोघंही त्यांचं मनःस्वास्थ्य इतरत्र शोधत राहातात. बाहेरच्या जगात तीव्र होत जाणाऱ्या जातीय अस्मिता, त्यात येत जाणारी कट्टरता, आधुनिकतेनं पूर्ण न केलेली वचन, जागतिकीकरणाच्या रेट्यात उफाळून वर येणारे जातीचे आणि धार्मिक अस्मितांचे प्रश्न हे सगळं या जोडप्याच्या संवादातून आपल्या पुढे उभं राहातं. या सगळ्यापासून दूर जाताना ते संभ्रमित अवस्थेत जातात. यात स्वप्नाळूपणातून त्यांचा नव्या जगाच्या निर्मितीची नव्हे तर अधिक गुंतागुंतीच्या शोषण व्यवस्थेचं प्रतीक असलेल्या मॉलच्या बांधणीकडे ते वळतात. प्रस्थापित मध्यमवर्गीय जाणिवांना छेद देणारी, त्यातले ताणे बाणे दाखवणारी व त्याच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाची चिकित्सा करणारी ही संहिता समीक्षेच्या दृष्टीकोनातून उजवी ठरते.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे भाषेचा. या चारही संहितांचं आकलन करताना नाटकीय अवकाशासह समकालीन भाषा समाजात काय प्रकारे काम करत असते, याचा विचार लेखकाने मांडलेला आहे. केवळ मौखिक वा संवादातील भाषा नाही तर दृश्य-अदृश्य आणि संहितांचे पदर उलगडत जाताना समजत जाणारी, आकाराला येणारी भाषा, या सर्व पातळीवर भाषेचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आशुतोषच्या नाटकातील भाषा ही एका विशिष्ट भाषिक समुदायापुरती मर्यादित न राहाता ती अधिक सार्वत्रिक रूप धारण करते. मराठी नाटकांना सवयीच्या असलेल्या भाषेपेक्षा वेगळी, शहरी वापरातली, बहुभाषिक समुदायांची, आंतरजालीय समाजमाध्यमातून तयार होत गेलेली ही संमिश्र भाषा सहजतेने त्यांची पात्रं बोलतात. 'सिंधु, सुधाकर..’ या संहितेत अलंकारिक ते आजची बोलीभाषा अशी ही तफावत प्रकर्षाने जाणवते. शंभर वर्षाच्या फरकाने झालेले भाषिक अभिव्यक्तीचे बदल, फक्त भाषेपुरते मर्यादित न राहाता जीवनशैली आणि बदलत्या सामाजिक व नातेसंबंधांच्या बदलाला देखील अधोरेखित करतात. 'F1/105' या दीर्घांकात अनेक भाषांची सरमिसळ होत जाते. निरनिराळी पात्रं निरनिराळ्या भाषिक अस्मिता जपत त्यांच्या भवतालाशी जोडून घेतात. पण त्याचबरोबर, तीच भाषा त्या भवतालात निर्माण होणाऱ्या संघर्षालाही कारणीभूत ठरते. मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी आणि अगदी तंजावरी मराठीचा वापरही यातली पात्रं सहजपणे करतात. मोठ्या शहरातल्या कॉस्मोपॉलिटन वातावरणात जगणाऱ्या या पात्रांची त्यांची भाषा ही ओळख ठरते. भाषेच्या वापरावरून त्यांची ओळख, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे स्वभाव हे नुसते ठरत जातात इतकंच नाही तर त्यातून काही वेळा आपल्या साचेबंद समजांना पुष्टीही मिळते. 'आनंदभोग मॉल' मधील भाषेचा बाज हा मिश्र आहे. शहाण्णवकुळी मराठा असलेला आणि गावाकडून शहरात आलेला पण बहुतेकवेळा प्रमाण मराठी भाषेत बोलणारा 'तो' अचानक मध्येच ग्रामीण ढंगातल्या मराठीकडे वळतो. क्वचित पण 'ती' देखील ग्रामीण ढंगात बोलून जाते. पेशाने डॉक्टर असलेला 'उच्चकुलीन' मराठा 'तो' आणि ब्राह्मण असलेली 'ती' असे दोघेही उच्चविद्याविभूषित असलेल्या त्यांच्या भाषेतला हा गोंधळ वाचकालाही जरासा गोंधळात टाकतो.




लेखकाचा नाटक, त्याचा इतिहास आणि नाटकांची अर्काईव्स यातला अभ्यास व संशोधन यातूनही लेखन प्रक्रिया आकाराला येताना दिसते. ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर' ही संहिता राम गणेश गडकरी यांच्या 'एकच प्याला'चे समकालीन दृष्टीकोनातून मांडणी करते. शीर्षक सुचवते त्याप्रमाणे ही संहिता राम गणेश गडकरी यांच्या 'एकच प्याला' या शतकभरापूर्वी लिहिल्या गेलेल्या नाटकावर आधारित आहे. हे नाटक घडत 'एकच प्याला'वर बनत असलेल्या चित्रपटासाठी रंगपट तयार करणाऱ्या डिझाईन स्टुडिओमध्ये. गतकाळातली ही कथा आजच्या काळात घुसत जाते, काळाच्या सीमा उल्लंघत वर्तमान आणि भूतकाळ यांची सरमिसळ होत जाते. मूळ संहितेतल्या अतिरंजित घटना व संवाद आणि आज चालू असलेल्या डिझाईन स्टुडिओतल्या घटना या मागे पुढे येत राहातात, बेमालूमपणे एकमेकात मिसळत राहातात. सुरूवातीला वेगळी असलेली ही काळाची प्रतलं नाटकाच्या शेवटाकडे एकमेकातून वेगळी काढणं अवघड होत जातं. अर्थात, 'एकच प्याला'च्या संहितेतले संवाद केवळ स्मृतीरंजनादाखल पेरलेले नाहीत तर त्यातून आजच्या संदर्भातले मानवी नाती, सामाजिक उतरंडी, लिंगभाव सारखे मुद्दे ध्वनित होत राहातात. रमा आणि अॅपल कॉश्च्युम ठरवताना त्या काळाचा अभ्यास करायचा प्रयत्न करतात पण ते करताना त्या मूळ नाटकातल्या पात्रांमध्ये खोलवर रूतत जातात. इतकं की ते त्या पात्रांकडे सहानुभूतीने आणि कधी चिकित्सक दृष्टीकोनातून पाहात राहातात. काळाच्या खेळाच्या पलीकडे जाऊन समकालीनतेचे संभाषित साकारणारे लिंगभाव, बदलत्या लग्न व्यवस्थेवरचं भाष्य आणि लिंगभावातील प्रवाहीपणा हे मुद्दे त्या निमित्ताने चर्चिले जातात. सिंधु, सुधाकर यांच्या संवादातून, रघू आणि अॅपलच्या नातेसंबंधातून, गीताच्या स्वगतातून किंवा अॅपलच्या एकाचवेळी तळीराम व सिंधुच्या पात्रात शिरताना मॅनेक्विनबरोबरच्या प्रसंगातून हे मुद्दे विविध पद्धतीने अधोरेखित होताना दिसतात.

मराठीतील शोकांतिका मानली गेलेली ही संहिता मूळ नाटकाचा आजच्या संदर्भात अर्थ तर लावतेच पण त्या प्रकियेतून काही तथ्य आणि संदर्भ यांना एकत्र आणत वाचकांना एका परीने संहितेतील आजवर अस्पर्श असलेले मुद्दे व अर्थ यांना परिचित करते. F 1/105 आणि आनंदभोग मॉल मधली जातीय व भाषिक पार्श्वभूमीतून पात्रं असली तरी 'सिंधु, सुधाकर..’ मधली पात्रं ही अशी कोणतीही लेबलं घेऊन येत नाहीत. ती केवळ शहरी मध्यमवर्गीय स्त्री पुरूष म्हणून आपल्या समोर येतात. त्यांच्या 'ओळखीच्या' गुंतागुंती या केवळ लिंगभावापुरत्या मर्यादित राहतात. कपडे बदलून ती पात्रं आपली 'ओळखी'ची अदलाबदल करतात, काळाच्या सीमा ओलांडतात. यात इतिहास, वारसा, परंपरा, वर्तमान अशा अनेक प्रकारे गुंतागुंतीच्या रचना व त्यातले बारकावे ही संहिता मांडते. या संहितेचं वाचन करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे नाटककार केंद्रीत रचनेतून बाहेर पडत त्या भोवतालच्या एेतिहासिक, सामाजिक घडामोडी, भाषा, सौंदर्यशास्त्रीय कल्पना यांची गुंफण यात केलेली दिसते. त्या पण ते करताना मूळ संहिता व त्याच्या बांधणीतून पुन्हा नाटककार केंद्रीत प्रक्रिया यात ते अडकते. गडकरींचे नाटक व त्याचे पुनर्वाचन या पठडीत विचार केल्याने इतर संदर्भांना गौण स्थान मिळते की काय असेही वाटते. शिवाय, त्यातल्या व्यापक जीवनदृष्टी लक्षात घेऊनही गडकरी यांचे मध्यमवर्गीय चौकटीतले नाटक का विचारात घ्यावेसे वाटते, हा मूलभूत प्रश्न उरतो.

हा प्रश्न विचारताना हे मात्र जरूर नमूद करायला हवे की निम्नजन किंवा 'इतर' आशुतोषच्या लेखनातील महत्त्वाचा अवकाश व्यापतात. ते 'बळी' स्वरूपात न येता सबल पात्रे म्हणून आपल्यासमोर येतात आणि भौतिक परिस्थितीने निर्माण केलेले त्यांच्यातले गुंतागुंतीचे संबंध आणि सामाजिक आंतर्विरोध हाही सखोलपणे मांडला गेलेला दिसतो. ‘सिंधु, सुधाकर...’मधल्या शिवाच्या तोंडी वाक्य आहे: “इतिहास फक्त वर्तमानच फिरतो.” मला वाटतं, आशुतोष यांच्या लिखाणात इतिहास आणि परंपरेचं हे असं वर्तमानात फिरणं, गोते खाणं आणि वर्तमान संदर्भांना स्पष्टपणे समोर आणणं हे त्यांच्या सर्वच नाटकांतला एक समान धागा म्हणून पाहाता येतो. या प्रक्रियेत अनेक संदर्भ एकत्रित व विलगपणे गुंफलेले दिसतात. ही गुंफण उलगडण्यात वाचकांची कसोटी लागते तर कधी कधी ते केवळ उल्लेखापुरते येऊन जाते, असेही वाटते. त्यामुळेच आधुनिकतेच्या प्रक्रियेकडे चिकित्सक नजरेने पाहाताना अधिक खोलात जाऊन या वास्तवाचा शोध घेता येतो का, त्यातल्या अंतःप्रवाहांचा आवाका यातून खणून काढता येतो का आणि या साऱ्या विसंगतीच्या पोटात दडलेल्या द्वंद्वात्मकतेची जाणीव सखोलपणे उतरू शकते का, याचा विचार गरजेचा ठरतो. आणखी एक सामाईक गोष्ट जाणवते ती म्हणजे या संहितांचा शेवट. संहितांच्या शेवटाला ठराविक दिशा न देता ते खुले ठेवण्याची जोखीम आशुतोष पत्करतात. यातून वाचकांना कल्पकतेची व अर्थघटनाची मुभा मिळते पण लेखकाची भूमिका बऱ्याचदा अस्पष्ट अथवा संदिग्ध राहाते. जातीचा इतिहास, धर्माचा इतिहास, रंग, स्पर्श, भाषा यांचा हजारो वर्षांचा इतिहास आपल्यासमोर या पात्रांतून व नाट्य अवकाशातून उभा ठाकतो. पण हे करताना राजकीय – सामाजिक परिप्रेक्ष्यातून धूसर रेषेवर ही नाटके आणून सोडतात. याखेरीज, मराठी नाट्यक्षेत्रात मूलभूत कलात्मक लिखाणाची व त्यातील फॉर्ममधल्या प्रयोगशीलतेची वानवा असताना ही पुस्तक द्वयी आशुतोष पोतदार यांचे लिखाण मराठी वाचकांपर्यंत पोचवण्यात मोलाची भूमिका बजावते.


लेखक: आशुतोष पोतदार
प्रकाशक: वॉटरमार्क पब्लिकेशन, पुणे
आनंदभोग मॉल आणि पुलाखालचा बोंबल्या मारूती
पाने: ११२ | मूल्य: १६०
F1/105 आणि सिंधू, सुधाकर, रम आणि इतर
पाने: १३६ | मूल्य: १६०

पूर्व प्रसिद्धी: परिवर्तनाचा वाटसरू, -१५ एप्रिल, २०१८

ते टोळांचे ढग नव्हते तर मग कशाचे होते?


मुंबईच्या नॅशनल गॅलरी अॉफ मॉर्डनअार्टच्या तिसऱ्या मजल्यावरच्या घुमटाकार छत असलेल्या दालनात तुम्ही प्रवेश करता. जवळपास २२६ लांब आणि ९ फुट उंचीच्या पांढऱ्याशुभ्र गोलकार भिंतीवर कोळशाने रेखाटलेल्या मानवाकृती आणि लॅंडस्केप्स यांचा पट आपल्यासमोर उलगडत जातो. प्रभाकर पाचपुते गेली काही वर्षं कोळसा खाणी, भू-संपादन, तिथले कामगार, शेतकरी यांचं जगणं या विषयांना धरून कलाकृती निर्माण करत आलाय. त्याच्या 'ते टोळांचे ढग नव्हते' ('नो, इट वॉज नॉट द लोकस्ट क्लाऊड') या एकल प्रदर्शनातल्या या चित्रमालिकेमध्ये हेच मुद्दे एकत्रतपणे आपल्याला पाहायला मिळतात.

मूळच्या चंद्रपूरच्या असलेल्या प्रभाकरच्या कलाकृती खैैरागढच्या कला महाविद्यालयात शिकत असताना या मुख्यत: त्याच्या अवतीभवतीची माणसं, त्यांची कथन यांच्याशी निगडीत होती. नंतर बडोद्याच्या शिल्पकला विभागातून एम.एफ.. करताना चिलीमध्ये खाणीतल्या स्फोटांच्या दरम्यान झालेला अपघात आणि त्याच दरम्यान चंद्रपूरच्या खाणीत झालेला अपघात हा या विषयावर काम करण्यासाठी सुरुवातीचा बिंदू ठरला. त्याच्या आजोबांपासून घरातले-नात्यातले अनेकजण खाणीत काम करत आले आहेत, काहींच्या जमिनी गेल्या आहेत, त्या बदल्यात त्यांना खाणीत राबावं लागतंय, हा वैयक्तिक अनुभव त्याचं कलाविश्व समृद्ध करायला कारणीभूत ठरला.

भिजलेला पांढरा ढग आणि एक्झिट


डेड सी मॅन आणि टुमाॅरो इज अनादर डे


२०१३ साली कलकत्त्याच्या एक्सपरिमेंटर गॅलरी मध्ये भरलेल्या 'लॅंड इटर्स' या प्रदर्शनात कोळशाच्या खाणी, कामगार, धोकादायक काम, खाणीतले बोगदे, अंधाऱ्या वाटा यांच्या प्रतिमा प्रभाकरच्या रेखाटनांमधून उमटत राहतात. त्या आधी, 'केनरी इन अ कोलमाइन' या त्याच्या क्लार्क हाऊसमध्ये भरवलेल्या पहिल्या एकल प्रदर्शनात त्याने प्रेक्षकांना कोळशाच्या खाणीचा अनुभव दिला. कुलाब्यातल्या जुन्या इमारतीतल्या अंधाऱ्या खोल्यांतल्या भिंतींवर काढलेली रेखाचित्रं प्रेक्षक टॉर्चच्या प्रकाशात पाहाताना खाणीतलं कोंदट वातावरण, खाणकामगारांचं कष्टाचं जीचन, त्यातून केवळ शरीरावरच नव्हे तर मनावर होणारे आघात या सगळ्याचं दर्शन यातून घडत राहातं. तुकड्या तुकड्यात दिसणाऱ्या मानवाकृती एकसंधपणे आपल्या मनात उभ्या राहातात. याउलट, एनजीएमएच्या दालनात आतापर्यंतचे सर्व आकार, आकृतीबंध एकत्र येत त्यांचा एक पॅनोरामा उभा राहातो. अशाप्रकारे, निसर्ग चित्र किंवा लॅंडस्केप या कलाप्रकाराला समकालीन संदर्भात बघताना केवळ नयनरम्य डोंगर-दऱ्या किंवा समुद्रकिनारे अशा प्रकारे मांडणी न करता खरंच आपल्या आत रूतत जाणऱ्या, विचारविश्वावर प्रभाव टाकणाऱ्या, निरंतर बदलत जाणाऱ्या भवतालाचे, सामाजिक-सांस्कृतिक स्थिंत्यंतरांचे पडसाद त्यात दिसतात की नाही हे पाहाणंही महत्वाचं ठरतं. हे टिपणं, त्यावर भाष्य करणं हेच कलाकारांच्या समकालीन असण्याचं द्योतक ठरतं आणि तरंच लॅंडस्केप हा कलाप्रकार आज एक समर्पक आणि सामर्थशाली कलाप्रकार बनू शकतो. तेच नेमकं प्रभाकरच्या रेखाटनात दिसतं.

विदर्भातले खाणकामगार आणि शेतकऱ्यांच्या जगण्याचं वास्तव जरी तो टिपत असला तरीपण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित न राहता एका प्रकारे वैश्विक बनतं. जर्मनी, वेल्स पासून ब्राझिल, तुर्कस्तान पर्यंतच्या खाणी, तिथले अनुभव, कामाची व्यवस्था, खाणींचा इतिहास याचा अभ्यास करून प्रभाकर ते त्याच्या कलाकृतीतून मांडत आलाय. एकीकडे, या प्रतिमा अनिल बर्वे यांच्या 'अकरा कोटी गॅलन पाणी' मधला झगडा, किशोर कवठे यांच्या 'डगान' मधल्या खाणकामगारांच्या आयुष्यावरच्या कविता किंवा नवजोत अल्ताफ यांच्या सध्याच्या चालू प्रकल्पातल्या छत्तीसगडमधल्या वेदांत-बाल्को मालकीच्या खाणींचं चित्रण यांच्या माध्यमातून आपल्यासमोर उभ्या राहातात. तर दुसरीकडे, प्रभाकर या माध्यमांची सरमिसळ करत, त्यांना एकमेकांना पूरक पद्धतीने एनजीएमएच्या प्रदर्शनात आणतो. चंद्रपूरच्या सप्तरंग या खाणकामगार-कवी-शेतकरी यांच्या कलेक्टीवच्या प्रभाकर अनेक वर्षं संपर्कात आहे. त्यातूनच किशोर कवठे आणि मनोज बोबडे यांच्या कवितेतल्या प्रतिमा प्रभाकरच्या कलाभा़षेचा अविभाज्य भाग बनत जातात. १३ दिवस भिंतींवर ही रेखाटनं करण्यासाठी दिलेला वेळ आणि शारीरिक श्रम यातून तयार झालेली ही चित्रमालिका क्युरेटर झाशा कोला म्हणतात त्याप्रमाणे जणू 'श्रमाचं महाकाव्य' बनतं. चित्रमालिकेच्या चक्राकार रचनेत त्या श्रमाची, शोषणाची, त्यातूनही उमटणाऱ्या आशेची कथनं प्रेक्षकांसमोर उलगडत जातात. टोळधाड, पिकाला लागलेली कीड किंवा पावसाचं दुर्भिक्ष या नैसर्गिक गोष्टी कारणीभूत आहेत असा सार्वत्रिक समज असताना तो खोडून काढत प्रभाकर प्रेक्षकांसमोर सरळसरळ प्रश्न उभा करतो. या भीषण परिस्थिती नेमकी सामाजिक-राजकीय कारणं काय आहेत? ही टोळधाड जर नसेल तर नेमकं यामागचं कारण काय आहे? अशावेळी जमिनी बळकावणाऱ्या कंपन्या, फुटकळ किमतीत शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणारे मालक, कुटुंबातल्या एखाद्याला खाणीत नोकरी देऊन स्थलांतराला भाग पाडणारी धोरणं यासाठी या प्रदर्शनात टोळांचे ढग हे रूपक म्हणून आपल्यासमोर येतं. यात कोळसा हा केवळ रेखाटनांचा विषय न राहता तो प्रभाकरच्या चित्रांचं माध्यमही बनतो. चारकोल या माध्यमाचा त्याने जाणीवपूर्वक केलेला वापर त्यांच्या रेखाटनांना वेगळीच खोली आणि अर्थ प्राप्त करून देतात.

रहीम काका


रेझिस्टन्स


घुमटाकार इमारतीतल्या गोलाकार भिंतींवरची चित्रं आणि मध्यभागी छतावर दिसणारा अॅनिमेशन-पट हे 'पॅनॉप्टिकॉन' रचनेचा आभास निर्माण करतात. 'पॅनॉप्टिकॉन'मध्ये गोलाकार रचनेच्या इमारतीच्या केंद्रस्थानी भोवतालावर पाळत ठेवणारी यंत्रणा कार्यरत असते. ती पाळत नेमकी कधी आणि कशी ठेवलीये हे लोकांना कळत नसल्यामुळे सतत शिस्त पाळण्यास त्यांना भाग पाडलं जातं. एवढंच नव्हे तर ते सत्ता राबवण्याचे साधन म्हणून वापरले जाते. (मिशेल फुको, डिसिप्लीन अॅंड पनिश, १९७५) पिओत्र द्युमाला या पोलंडच्या कलाकारानी विकसित केलेलं 'डिस्ट्रक्टीव अॅनिमेशन'चं तंत्र वापरून हा अॅनिमेशन-पट तयार केला आहे. यात एक चित्र कागदावर किंवा कुठल्याही पृष्ठभागावर काढून ते खोडून टाकायचं आणि पुढची कृती दाखवणारं चित्र पुन्हा काढायचं अशा पद्धतीने चित्रांचे एकमेकांवर थर तयार होतात. ते कॅमेऱ्यातून टिपून त्यांची एकत्रितपणे चित्रमालिका बनवली की त्यातील वस्तू किंवा व्यक्ती यांचे हालचालींचे टप्पे धुसर का होईना पण पाहाणाऱ्याला दिसत राहतात. दुर्बिणीतून दोन डोळे चारही दिशांना रोखून पाहातात, करडी नजर ठेवतात. त्यात मॅनेजर किंवा सर्वेक्षकाचे ते डोळे हे एक पात्रच बनून जातं आणि ते ड्रोनच्या रूपात भिंतीवरच्या चित्रातही दिसत राहातं. 'डिस्ट्रक्टीव अॅनिमेशन'च्या कृतीतच अंतर्भूत असलेलं विध्वंसक रूपही एकप्रकारे जमिनीचा आणि निसर्गाचा होणाऱ्या अनियंत्रित विकासाचं आणि पर्यायानं विनाशाचं प्रतीक बनतं.

या चक्राकार चित्रमालिकेत आपल्याला दिसत राहातात ते शेतकरी अन् खाण कामगार, त्यांच्या डोक्यांच्या जागी बसवलेली शेतीची अवजारं, नांगराचे फाळ, फवारणी यंत्र अाणि खाणीतले हेडलाइट. यातल्या प्रतिमा आणि त्यांचे अर्थ शब्दश: आहेतच पण रूपकात्मकही आहेत. सुरुवातीला फवारणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यावर घोंघावणारा कीटकांचा भलामोठा ढग आहे. पर्वताच्या सावलीच्या टोकावर एक कललेली बोट आहे जी सरकारी रसद पुरवण्यासाठी आलेली असली तरी ती मदत प्रत्यक्ष किती जणांपर्यंत पोहोचते असा प्रश्न प्रभाकर इथे विचारतो. यानंतर, मध्यभागी खाली वाकलेली एक मानवाकृती, बहुधा कंपनीचा मॅनेजर, जमिनीला पडलेल्या भेगा पाहाताना दिसते. कारावाजिओच्या 'डाऊटींग थॉमस' या चित्राला तो संदर्भ म्हणून वापरतो. थॉमस ज्याप्रमाणे येशूच्या जखमा बोटाने तपासू पाहातोय त्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या हालाखीच्या परिस्थितीवर विश्वास न ठेवू शकणारे लोक जमिनीला पडलेल्या भेगांमध्ये बोटं खुपसून खात्री करून घ्यायचा प्रयत्न करतात पण ही वास्तवापासूनचं त्यांचं तुटलेपणच दर्शविते. 'भिजलेला पांढरा ढग' या चित्रात तो कापसात पाणी टाकून त्याचं वजन वाढवण्याचा आणि पर्यायाने स्वत:चं नुकसान टाळण्यासाठी धडपडणारा शेतकरी चित्रीत करतो.

ड्रीम अॉफ द मॅनेजर


लॅंड एस्केप

मॅनेजरची प्रतिमा प्रभाकरच्या कलाकृतींमध्ये पुनःपुन्हा येत राहाते. ती कागद्याच्या लगद्याच्या शिल्पातूनही दालनाच्या एका भागात उभी असलेली आपल्याला दिसते. हुकुम देण्याच्या आविर्भावात असलेली ही मानवाकृतीच्या डोक्यातून खाणीतलं यंत्र बाहेर येतं आणि त्यातून जमीन सर्वेक्षणाचे तक्ते, नकाशाची भेंडोळी लोंबकाळताना दिसतात. सतत नवीन जमिनीच्या शोधात असलेला हा सर्वेक्षक जणू तिथल्या जमिनी त्याच्या एका आदेशावर नियंत्रित करत असतो. दुसऱ्या बाजूला, काही मानवाकृती भिंत, जमिनीचे तुकडे हालवताहेत, डोक्यावर वाहून नेताहेत. यात केवळ जमिनीचाच नव्हे तर तिथल्या माणसांचाही कायापालट होताना दिसतो. हे सगळं चालू असताना परत एकदा ढग जमू लागतात. यावेळी छतावरच्या अॅनिमेशन-पटातील सर्वेक्षकाचे पाळत ठेवणारे डोळे ड्रोन कॅमेऱ्याप्रमाणे गटा-गटानी घोंघावू लागतात, आपलं वर्चस्व लादू पाहातात. लाल-पांढरे पट्टे असलेले वात-दर्शक येऊ घातलेल्या वादळची जाणीव करून देतात. आणि हे वादळ आल्यानंतरही 'रेझिस्टन्स' या चित्रात माणसं आपल्या जमिनींना धरून ठेवतात. या मानवाकृती पृथ्वीच्या गोलावरील नकाशांची आठवण करून देत या विषयाला पुन्हा जागतिक पातळीवर नेतात. पण त्याचबरोबर, स्थानिक विरोध, संघटना, पुनर्वनीकरणाची प्रक्रिया, शेतकरी-कवी-कामगारांचे गट यांचं प्रतीक बनून आपल्यासमोर येतात. तर, 'डेड सी मॅन' मध्ये बंद झालेल्या खाणी रेतीने न भरल्यामुळे जमिनीच्या खाली तयार झालेली पोकळी, त्यात साठत जाणारं पाणी, त्यामुळे होणारे अपघात, हरवलेली माणसं अन् जनावरं आणि त्या पोकळीच्या पृष्ठभागावर वसलेलं गाव, त्याचं अधांतरी भविष्य यावर भाष्य करते.

शेवटच्या टप्प्यात, मृत खाणींच्या बाबतीतली जगाच्या इतर भागातील धोरणं, त्या जागांचा केला जात असलेला पुनर्वापर हे प्रभाकर अधोरेखित करू पाहातो. खाणीची प्रचंड मोठी जागा ही अनेक ठिकाणी सांस्कृतिक केंद्र, स्टेडियम किंवा संग्रहालयात रूपांतरीत केली गेली आहेत. तसंच काही पर्याय आपल्या इथे असू शकतात का, असा एक आशावाद यातून दिसतो पण त्याचबरोबरीनं, चित्रातल्या स्टेडियममधून बाहेर पडणाऱ्या माणसांचा पुन्हा एकदा 'टोळांचा ढग' तयार होताना दिसतो आणि तो जमिनी बळकावण्याच्या दिशेने प्रवास करू लागतो...त्यामुळे हेच चक्र पुढेही चालू राहाणार की यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आपण शोधणार, असा सरळ सरळ प्रश्न प्रभाकर प्रेक्षकांसमोर उभा करतो आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करतो.

छायाचित्र सौजन्य: प्रभाकर पाचपुते आणि झाशा कोला
पूर्व प्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, जून २०१६