ते टोळांचे ढग नव्हते तर मग कशाचे होते?


मुंबईच्या नॅशनल गॅलरी अॉफ मॉर्डनअार्टच्या तिसऱ्या मजल्यावरच्या घुमटाकार छत असलेल्या दालनात तुम्ही प्रवेश करता. जवळपास २२६ लांब आणि ९ फुट उंचीच्या पांढऱ्याशुभ्र गोलकार भिंतीवर कोळशाने रेखाटलेल्या मानवाकृती आणि लॅंडस्केप्स यांचा पट आपल्यासमोर उलगडत जातो. प्रभाकर पाचपुते गेली काही वर्षं कोळसा खाणी, भू-संपादन, तिथले कामगार, शेतकरी यांचं जगणं या विषयांना धरून कलाकृती निर्माण करत आलाय. त्याच्या 'ते टोळांचे ढग नव्हते' ('नो, इट वॉज नॉट द लोकस्ट क्लाऊड') या एकल प्रदर्शनातल्या या चित्रमालिकेमध्ये हेच मुद्दे एकत्रतपणे आपल्याला पाहायला मिळतात.

मूळच्या चंद्रपूरच्या असलेल्या प्रभाकरच्या कलाकृती खैैरागढच्या कला महाविद्यालयात शिकत असताना या मुख्यत: त्याच्या अवतीभवतीची माणसं, त्यांची कथन यांच्याशी निगडीत होती. नंतर बडोद्याच्या शिल्पकला विभागातून एम.एफ.. करताना चिलीमध्ये खाणीतल्या स्फोटांच्या दरम्यान झालेला अपघात आणि त्याच दरम्यान चंद्रपूरच्या खाणीत झालेला अपघात हा या विषयावर काम करण्यासाठी सुरुवातीचा बिंदू ठरला. त्याच्या आजोबांपासून घरातले-नात्यातले अनेकजण खाणीत काम करत आले आहेत, काहींच्या जमिनी गेल्या आहेत, त्या बदल्यात त्यांना खाणीत राबावं लागतंय, हा वैयक्तिक अनुभव त्याचं कलाविश्व समृद्ध करायला कारणीभूत ठरला.

भिजलेला पांढरा ढग आणि एक्झिट


डेड सी मॅन आणि टुमाॅरो इज अनादर डे


२०१३ साली कलकत्त्याच्या एक्सपरिमेंटर गॅलरी मध्ये भरलेल्या 'लॅंड इटर्स' या प्रदर्शनात कोळशाच्या खाणी, कामगार, धोकादायक काम, खाणीतले बोगदे, अंधाऱ्या वाटा यांच्या प्रतिमा प्रभाकरच्या रेखाटनांमधून उमटत राहतात. त्या आधी, 'केनरी इन अ कोलमाइन' या त्याच्या क्लार्क हाऊसमध्ये भरवलेल्या पहिल्या एकल प्रदर्शनात त्याने प्रेक्षकांना कोळशाच्या खाणीचा अनुभव दिला. कुलाब्यातल्या जुन्या इमारतीतल्या अंधाऱ्या खोल्यांतल्या भिंतींवर काढलेली रेखाचित्रं प्रेक्षक टॉर्चच्या प्रकाशात पाहाताना खाणीतलं कोंदट वातावरण, खाणकामगारांचं कष्टाचं जीचन, त्यातून केवळ शरीरावरच नव्हे तर मनावर होणारे आघात या सगळ्याचं दर्शन यातून घडत राहातं. तुकड्या तुकड्यात दिसणाऱ्या मानवाकृती एकसंधपणे आपल्या मनात उभ्या राहातात. याउलट, एनजीएमएच्या दालनात आतापर्यंतचे सर्व आकार, आकृतीबंध एकत्र येत त्यांचा एक पॅनोरामा उभा राहातो. अशाप्रकारे, निसर्ग चित्र किंवा लॅंडस्केप या कलाप्रकाराला समकालीन संदर्भात बघताना केवळ नयनरम्य डोंगर-दऱ्या किंवा समुद्रकिनारे अशा प्रकारे मांडणी न करता खरंच आपल्या आत रूतत जाणऱ्या, विचारविश्वावर प्रभाव टाकणाऱ्या, निरंतर बदलत जाणाऱ्या भवतालाचे, सामाजिक-सांस्कृतिक स्थिंत्यंतरांचे पडसाद त्यात दिसतात की नाही हे पाहाणंही महत्वाचं ठरतं. हे टिपणं, त्यावर भाष्य करणं हेच कलाकारांच्या समकालीन असण्याचं द्योतक ठरतं आणि तरंच लॅंडस्केप हा कलाप्रकार आज एक समर्पक आणि सामर्थशाली कलाप्रकार बनू शकतो. तेच नेमकं प्रभाकरच्या रेखाटनात दिसतं.

विदर्भातले खाणकामगार आणि शेतकऱ्यांच्या जगण्याचं वास्तव जरी तो टिपत असला तरीपण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित न राहता एका प्रकारे वैश्विक बनतं. जर्मनी, वेल्स पासून ब्राझिल, तुर्कस्तान पर्यंतच्या खाणी, तिथले अनुभव, कामाची व्यवस्था, खाणींचा इतिहास याचा अभ्यास करून प्रभाकर ते त्याच्या कलाकृतीतून मांडत आलाय. एकीकडे, या प्रतिमा अनिल बर्वे यांच्या 'अकरा कोटी गॅलन पाणी' मधला झगडा, किशोर कवठे यांच्या 'डगान' मधल्या खाणकामगारांच्या आयुष्यावरच्या कविता किंवा नवजोत अल्ताफ यांच्या सध्याच्या चालू प्रकल्पातल्या छत्तीसगडमधल्या वेदांत-बाल्को मालकीच्या खाणींचं चित्रण यांच्या माध्यमातून आपल्यासमोर उभ्या राहातात. तर दुसरीकडे, प्रभाकर या माध्यमांची सरमिसळ करत, त्यांना एकमेकांना पूरक पद्धतीने एनजीएमएच्या प्रदर्शनात आणतो. चंद्रपूरच्या सप्तरंग या खाणकामगार-कवी-शेतकरी यांच्या कलेक्टीवच्या प्रभाकर अनेक वर्षं संपर्कात आहे. त्यातूनच किशोर कवठे आणि मनोज बोबडे यांच्या कवितेतल्या प्रतिमा प्रभाकरच्या कलाभा़षेचा अविभाज्य भाग बनत जातात. १३ दिवस भिंतींवर ही रेखाटनं करण्यासाठी दिलेला वेळ आणि शारीरिक श्रम यातून तयार झालेली ही चित्रमालिका क्युरेटर झाशा कोला म्हणतात त्याप्रमाणे जणू 'श्रमाचं महाकाव्य' बनतं. चित्रमालिकेच्या चक्राकार रचनेत त्या श्रमाची, शोषणाची, त्यातूनही उमटणाऱ्या आशेची कथनं प्रेक्षकांसमोर उलगडत जातात. टोळधाड, पिकाला लागलेली कीड किंवा पावसाचं दुर्भिक्ष या नैसर्गिक गोष्टी कारणीभूत आहेत असा सार्वत्रिक समज असताना तो खोडून काढत प्रभाकर प्रेक्षकांसमोर सरळसरळ प्रश्न उभा करतो. या भीषण परिस्थिती नेमकी सामाजिक-राजकीय कारणं काय आहेत? ही टोळधाड जर नसेल तर नेमकं यामागचं कारण काय आहे? अशावेळी जमिनी बळकावणाऱ्या कंपन्या, फुटकळ किमतीत शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणारे मालक, कुटुंबातल्या एखाद्याला खाणीत नोकरी देऊन स्थलांतराला भाग पाडणारी धोरणं यासाठी या प्रदर्शनात टोळांचे ढग हे रूपक म्हणून आपल्यासमोर येतं. यात कोळसा हा केवळ रेखाटनांचा विषय न राहता तो प्रभाकरच्या चित्रांचं माध्यमही बनतो. चारकोल या माध्यमाचा त्याने जाणीवपूर्वक केलेला वापर त्यांच्या रेखाटनांना वेगळीच खोली आणि अर्थ प्राप्त करून देतात.

रहीम काका


रेझिस्टन्स


घुमटाकार इमारतीतल्या गोलाकार भिंतींवरची चित्रं आणि मध्यभागी छतावर दिसणारा अॅनिमेशन-पट हे 'पॅनॉप्टिकॉन' रचनेचा आभास निर्माण करतात. 'पॅनॉप्टिकॉन'मध्ये गोलाकार रचनेच्या इमारतीच्या केंद्रस्थानी भोवतालावर पाळत ठेवणारी यंत्रणा कार्यरत असते. ती पाळत नेमकी कधी आणि कशी ठेवलीये हे लोकांना कळत नसल्यामुळे सतत शिस्त पाळण्यास त्यांना भाग पाडलं जातं. एवढंच नव्हे तर ते सत्ता राबवण्याचे साधन म्हणून वापरले जाते. (मिशेल फुको, डिसिप्लीन अॅंड पनिश, १९७५) पिओत्र द्युमाला या पोलंडच्या कलाकारानी विकसित केलेलं 'डिस्ट्रक्टीव अॅनिमेशन'चं तंत्र वापरून हा अॅनिमेशन-पट तयार केला आहे. यात एक चित्र कागदावर किंवा कुठल्याही पृष्ठभागावर काढून ते खोडून टाकायचं आणि पुढची कृती दाखवणारं चित्र पुन्हा काढायचं अशा पद्धतीने चित्रांचे एकमेकांवर थर तयार होतात. ते कॅमेऱ्यातून टिपून त्यांची एकत्रितपणे चित्रमालिका बनवली की त्यातील वस्तू किंवा व्यक्ती यांचे हालचालींचे टप्पे धुसर का होईना पण पाहाणाऱ्याला दिसत राहतात. दुर्बिणीतून दोन डोळे चारही दिशांना रोखून पाहातात, करडी नजर ठेवतात. त्यात मॅनेजर किंवा सर्वेक्षकाचे ते डोळे हे एक पात्रच बनून जातं आणि ते ड्रोनच्या रूपात भिंतीवरच्या चित्रातही दिसत राहातं. 'डिस्ट्रक्टीव अॅनिमेशन'च्या कृतीतच अंतर्भूत असलेलं विध्वंसक रूपही एकप्रकारे जमिनीचा आणि निसर्गाचा होणाऱ्या अनियंत्रित विकासाचं आणि पर्यायानं विनाशाचं प्रतीक बनतं.

या चक्राकार चित्रमालिकेत आपल्याला दिसत राहातात ते शेतकरी अन् खाण कामगार, त्यांच्या डोक्यांच्या जागी बसवलेली शेतीची अवजारं, नांगराचे फाळ, फवारणी यंत्र अाणि खाणीतले हेडलाइट. यातल्या प्रतिमा आणि त्यांचे अर्थ शब्दश: आहेतच पण रूपकात्मकही आहेत. सुरुवातीला फवारणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यावर घोंघावणारा कीटकांचा भलामोठा ढग आहे. पर्वताच्या सावलीच्या टोकावर एक कललेली बोट आहे जी सरकारी रसद पुरवण्यासाठी आलेली असली तरी ती मदत प्रत्यक्ष किती जणांपर्यंत पोहोचते असा प्रश्न प्रभाकर इथे विचारतो. यानंतर, मध्यभागी खाली वाकलेली एक मानवाकृती, बहुधा कंपनीचा मॅनेजर, जमिनीला पडलेल्या भेगा पाहाताना दिसते. कारावाजिओच्या 'डाऊटींग थॉमस' या चित्राला तो संदर्भ म्हणून वापरतो. थॉमस ज्याप्रमाणे येशूच्या जखमा बोटाने तपासू पाहातोय त्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या हालाखीच्या परिस्थितीवर विश्वास न ठेवू शकणारे लोक जमिनीला पडलेल्या भेगांमध्ये बोटं खुपसून खात्री करून घ्यायचा प्रयत्न करतात पण ही वास्तवापासूनचं त्यांचं तुटलेपणच दर्शविते. 'भिजलेला पांढरा ढग' या चित्रात तो कापसात पाणी टाकून त्याचं वजन वाढवण्याचा आणि पर्यायाने स्वत:चं नुकसान टाळण्यासाठी धडपडणारा शेतकरी चित्रीत करतो.

ड्रीम अॉफ द मॅनेजर


लॅंड एस्केप

मॅनेजरची प्रतिमा प्रभाकरच्या कलाकृतींमध्ये पुनःपुन्हा येत राहाते. ती कागद्याच्या लगद्याच्या शिल्पातूनही दालनाच्या एका भागात उभी असलेली आपल्याला दिसते. हुकुम देण्याच्या आविर्भावात असलेली ही मानवाकृतीच्या डोक्यातून खाणीतलं यंत्र बाहेर येतं आणि त्यातून जमीन सर्वेक्षणाचे तक्ते, नकाशाची भेंडोळी लोंबकाळताना दिसतात. सतत नवीन जमिनीच्या शोधात असलेला हा सर्वेक्षक जणू तिथल्या जमिनी त्याच्या एका आदेशावर नियंत्रित करत असतो. दुसऱ्या बाजूला, काही मानवाकृती भिंत, जमिनीचे तुकडे हालवताहेत, डोक्यावर वाहून नेताहेत. यात केवळ जमिनीचाच नव्हे तर तिथल्या माणसांचाही कायापालट होताना दिसतो. हे सगळं चालू असताना परत एकदा ढग जमू लागतात. यावेळी छतावरच्या अॅनिमेशन-पटातील सर्वेक्षकाचे पाळत ठेवणारे डोळे ड्रोन कॅमेऱ्याप्रमाणे गटा-गटानी घोंघावू लागतात, आपलं वर्चस्व लादू पाहातात. लाल-पांढरे पट्टे असलेले वात-दर्शक येऊ घातलेल्या वादळची जाणीव करून देतात. आणि हे वादळ आल्यानंतरही 'रेझिस्टन्स' या चित्रात माणसं आपल्या जमिनींना धरून ठेवतात. या मानवाकृती पृथ्वीच्या गोलावरील नकाशांची आठवण करून देत या विषयाला पुन्हा जागतिक पातळीवर नेतात. पण त्याचबरोबर, स्थानिक विरोध, संघटना, पुनर्वनीकरणाची प्रक्रिया, शेतकरी-कवी-कामगारांचे गट यांचं प्रतीक बनून आपल्यासमोर येतात. तर, 'डेड सी मॅन' मध्ये बंद झालेल्या खाणी रेतीने न भरल्यामुळे जमिनीच्या खाली तयार झालेली पोकळी, त्यात साठत जाणारं पाणी, त्यामुळे होणारे अपघात, हरवलेली माणसं अन् जनावरं आणि त्या पोकळीच्या पृष्ठभागावर वसलेलं गाव, त्याचं अधांतरी भविष्य यावर भाष्य करते.

शेवटच्या टप्प्यात, मृत खाणींच्या बाबतीतली जगाच्या इतर भागातील धोरणं, त्या जागांचा केला जात असलेला पुनर्वापर हे प्रभाकर अधोरेखित करू पाहातो. खाणीची प्रचंड मोठी जागा ही अनेक ठिकाणी सांस्कृतिक केंद्र, स्टेडियम किंवा संग्रहालयात रूपांतरीत केली गेली आहेत. तसंच काही पर्याय आपल्या इथे असू शकतात का, असा एक आशावाद यातून दिसतो पण त्याचबरोबरीनं, चित्रातल्या स्टेडियममधून बाहेर पडणाऱ्या माणसांचा पुन्हा एकदा 'टोळांचा ढग' तयार होताना दिसतो आणि तो जमिनी बळकावण्याच्या दिशेने प्रवास करू लागतो...त्यामुळे हेच चक्र पुढेही चालू राहाणार की यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आपण शोधणार, असा सरळ सरळ प्रश्न प्रभाकर प्रेक्षकांसमोर उभा करतो आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करतो.

छायाचित्र सौजन्य: प्रभाकर पाचपुते आणि झाशा कोला
पूर्व प्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, जून २०१६


जन-कला: नोंदी महानगरातल्या (भाग – २)



गेल्या भागात म्हणल्याप्रमाणे बंगलुरू शहरात कलाकारांनी एकत्र येऊन 'कलेक्टिव्स' सुरू केले. याला सुरूवात झाली २००० नंतर. हे बंगलुरू मध्येच का घडलं? या शहराचं वेगळेपण काय आहे हे देखील पाहायला हवं. या शहराला कलाकारांनी असे उपक्रम सुरू करायचा इतिहास आहेच. त्याचबरोबर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे दिल्ली किंवा मुंबईसारखी या शहरात खाजगी कलादालनांची व्यवस्था फारशी इथं अस्तित्वात नसणं. त्याच बरोबर कलाशाळातून बाहेर पडल्यावर या नवोदित कलाकारांनी काय करायचं, कलाकरांच्या नेटवर्कचा भाग कसं बनायचं, आपली कला जाणकारांसमोर कुठे प्रदर्शित करायची अशा प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत हे कलेक्टिव्स अस्तित्वात आले. यातल्या कलाकारांनी आपला कलाव्यवहार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठीही प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण कलाप्रकार, कल्पक रचनात्मक मांडणी यांना स्विकारलं, प्रयोगातून जुन्या रचना मोडून काढून शहाराच्या कलापटलावर अनेक नव्या रचना उभारायला सुरूवात केली. साधारण २००० च्या दशकात समुहा, जागा, बार-वन, १ शांतीरोड यासारखे कलेक्टिव्स इथं उभे राहिले. इथल्या तरूण कलाकारांशी बोलताना लक्षात आलं की २००२ साली इथं 'खोज' या संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यशाळेचा फार खोलवर परिणाम या कलाकारांच्या कलानिर्मिती प्रक्रियेवर घडून आला. आधी म्हणलं त्याप्रमाणे यांची संकल्पनात्म मांडणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी हे केवळ कलाकारांनी केलं. हे प्रकल्प शहराच्या सांस्कृतिक जीवनात भर घालणारे ठरले. या प्रकल्पांकडे हे कलाकार त्यांच्या कलाव्यवहाराचा एक भाग म्हणून बघत होते, आहेत. पण ते कलाकार म्हणून स्वत्वाची व्याप्ती वाढवत इथं 'कलाकार' किंवा 'क्युरेटर' न राहाता फॅसिलिटेटर बनतात, ते कला प्रकल्पांची जोडणी करतात, लोकांना यात सहभागी होण्यास आणि त्यातून कलानिर्मिती करण्यास उद्युक्त करतात. इतर अनेक कलाकार आणि सर्जनशील व्यक्तींना एकत्र आणून त्यातून हे कला-प्रकल्प आकाराला येतात आणि यशस्वीरित्या पार पाडतात. त्यामुळे त्यात कुठलीही पक्की संस्थात्मक रचना न आणता ते कला-प्रकल्पांसारखेच चालवले गेले. त्यातले काही मर्यादित कालावधीकरिता चालवले गेले तर काही दीर्घकालीन ठरले. सुरेश कुमार जी., अर्चना प्रसाद आणि शिवप्रसाद यांची संकल्पना असलेला 'समुहा' हा कला-प्रकल्प ४१४ दिवस सलग चालवला गेला, यात २३ सभासद कलाकारांना प्रत्येकी १७ दिवस कला निर्मिती आणि प्रदर्शनासाठी मिळाले. त्या सोबत, समकालीन कलेवर चर्चा, कार्यशाळा, मांडणीही आयोजित केल्या गेल्या. तसंच 'बार-वन' ही रेसिडन्सी २००७ पासून २०१२ पर्यंत चालू होती. यात भारतातील आणि बाहेरील देखील अनेक समकालीन कलाकार बंगलुरू मध्ये राहून काम करून गेले. बंगलुरू शहराचे सांस्कृतिक, सामाजिक संदर्भ आणि त्या कलाकारांचा कलाव्यवहार यातून या रेसिडन्सीज् आकाराला आल्या

'जागा'ची इमारत
 
मल्लेश्वरम कॉलिंग, अर्चना प्रसाद, जागा


या सगळ्याचे पडसाद बंगलुरू मधल्या कलाकारांच्या वैयक्तिक पातळीवर आणि कलाव्यवहारावर देखील पडलेले दिसतात. साधारण २००० च्या आसपास समुहाच्या सुरेश यांनी कलावस्तू बनवणं बंद केलं. सध्याच्या आर्थिक रचनेत आणि कलाबाजारात कलावस्तूचे विषयवस्तूकरण होण्याची प्रक्रिया सहजपणे घडते. त्याला विरोध म्हणून त्यांचं शिक्षण शिल्पकलेत झालं असलं तरी त्यांनी स्वतःचं शरीर माध्यम म्हणून वापरायला सुरूवात केली. सुरेश यांचा कला व्यवहार हा साइट स्पेसिफिक म्हणजे स्थल-निष्ठ आहे. सार्वजनिक अवकाशात वावरताना तिथले तपशील घेऊन त्यांना जोडून घेत ते त्यांचा परफॉर्मन्स आकाराला आणतात ज्याला ते 'लाइव आर्ट' अशी व्याख्या वापरतात. हा कुठल्याही प्रकारचा तालमी करून किंवा ठराविक कथन असलेला परफॉर्मन्स नसून त्या त्या ठिकाणच्या संदर्भातून आकाराला येणारा कलाप्रकार आहे. त्यामुळेच तो तात्कालिकही आहे आणि तो एक़ हस्तक्षेपही आहे. तो त्या ठराविक काल आणि अवकाशात उपलब्ध असतो, प्रेक्षकांना भिडतो, त्यांच्याशी संवाद साधतो. शहराचं अवकाश सुरेश यांच्यासाठी साइट बनते, त्यांच्या कला व्यवहाराला त्यामुळे अनेक पदर प्राप्त होतात. 'समुहा' हा प्रकल्पदेखील त्यांच्या कलाव्यवहाराचा भाग म्हणूनच त्यांनी आकाराला आणला. हे नवोदित कलाकारांसाठी, एकमेकांचा कलाव्यवहार समजून घेत एकत्र येऊन कलेचं चर्चाविश्व घडवण्यासाठीचं एक व्यासपीठ बनला. 'समुहा'च्या काळातच कलाकारांच्या चर्चा आणि विचारविनिमयातून 'जागा'ची कल्पनाही पुढे आली. सुरुवातीच्या काळात कायमस्वरूपी कलासंस्था न उभारता कमी वजनाच्या पोलादी पट्ट्या जोडून तात्पुरत्या उभारलेल्या इमारतीत त्यांनी काम सुरू केले. याचा फायदा असा झाला की ही इमारत सहजपणे कुठेही उचलून घेऊन जाणं शक्य होतं. उपलब्ध असलेल्या जागेनुसार रचना करत नंतर त्यांनी 'जागा'ची बांधणी केली.

जन-कला: नोंदी महानगरातल्या (भाग – १)



बंगलुरू शहर हे आज माहिती आणि तंत्रज्ञानाचं हब म्हणून ओळखलं जातंय. गेल्या काही वर्षात हे शहर, शहराचं व्यक्तिमत्व बदलत गेलंय. तसा या शहराचा इतिहास जेमतेम तीन-चारशे वर्षांचा. पण गेल्या पंधरा-वीस वर्षात शहर वाढत गेलं, आसपासची गावं, तलाव, रहवासी सगळ्यांना सामावून घेत गेलं. एवढंच नव्हे तर बहुराष्ट्रीय कंपन्या, त्यात कामासाठी येणारे भारतभरातले तंत्रज्ञ, अभियंते, डिजाइनर या सर्वांनी शहरची जडणघडण होत गेली. हे सगळं होत असताना, शहराचा पसारा वाढत जाताना, त्याचा विकास होत जाताना शहराच्या कला-सांस्कृतिक जीवनातही अनेक बदल होत गेले. हे प्रयोग मुख्यत्वे दृश्यकलाकार, नाट्यकलाकार त्याचप्रमाणे समकालीन नृत्यकलाकार यांच्या प्रयत्नातून घडून आलेले आपल्याला दिसतात. यात जनकला किंवा सार्वजनिक अवकाशात घडणारे कला-प्रकार महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. या पार्श्वभूमीवर बंगलुरू मध्ये गेल्या काही वर्षात आकाराला आलेले कलाकारांचे कलेक्टिव्स, त्यांनी पार पाडलेले जनकला प्रकल्प, इतर कलाशाखांच्या सहयोगातून मांडलेले आकृतीबंध, अनेक माध्यमांच्या संयोगातून तयार झालेल्या कलाकृती आणि प्रकल्प हे सगळं समजून घेणं हे महानगरात घडणाऱ्या जनकला प्रकल्पाची व्याप्ती आणि खोली समजून घेण्याकरिता जरूरी ठरतात.

बंगलुरू शहराला मी अलिकडे भेट दिली ती माझ्या जनकलेवरच्या अभ्यास प्रकल्पादरम्यान. या प्रकल्पा अंतर्गत मी भारतातल्या मोठ्या शहरांतल्या अशा कला हस्तक्षेपांकडे अधिक बारकाईने पाहायला लागले. हे जनकला प्रकल्प या शहरांमध्ये का आकाराला आले, त्यांचे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ काय होते, त्यामुळे समकालीन कलाव्यवहारामध्ये काय फरक पडतोय हे सगळे मुद्दे तपासून पाहाता येणं हा याचा उद्देश आहे. या हस्तक्षेपातून होणाऱ्या सामाजिक घुसळणीतून सार्वजनिक अवकाशात काय प्रकारचे बदल घडतात, तिथला कलाप्रकार काय प्रकारची रूपं धारण करतो. त्याचबरोबर, जनकला ही संकल्पनाच मुळात प्रवाही आहे त्यामुळे त्याचं अर्थघटन कसं होतं, यातले अनेक प्रवाह कुठून उगम पावतात, त्यात 'सामाजिकता' अधिक महत्त्वाची की 'कलात्मकता', भारतीय संदर्भात जनकलेची सैद्धांतिक मांडणी कशी करता येईल, त्याचे विविध पैलू शहरांच्या संदर्भात तसेच प्रेक्षकवर्ग, जनकलेची सौंदर्यात्मक मांडणी या परिप्रेक्ष्यातून कसे जाणून घेता येतील हाही या अभ्यासाचा भाग आहे. यात मी मुंबई, दिल्ली, बंगलुरू, कलकत्ता, कोची इत्यादि शहरांमधल्या जनकला व्यवहारांचं दस्तेवजीकरण करणं आणि पुढे जाऊन त्यांचं अर्काइव उभं करणं ही उद्दिष्टं ठेऊन कामाला सुरूवात केली. बंगलुरू शहर यातलं पहिलं शहर होतं जिथे जाऊन मी कलाकार, कला संस्था, तिथले विद्यार्थी, शिक्षक, कलेक्टिव्सचे संस्थापक यांच्या भेटी घेऊन त्यांच्या सविस्तर मुलाखती घेतल्या. यावरून बंगलुरू शहारातील जनकलेच्या उगमाचा आणि विकासाचा एक आलेख आपल्यासमोर उभा राहू शकतो.

गेल्या दोन दशकात या शहरातले कलाकार सार्वजनिक अवकाशात प्रवेश करत परफॉर्मन्स, सामुदायिक कला व्यवहार, जनकलेची इतर अनेक रूपं आजमावून पाहायला लागले. पण याची मुळं शोधायची असतील तर दोन कलाकरांचा कलाव्यवहार इथं पाहावा लागेल. एक आहे, जॉन देवराज आणि दुसरे म्हणजे सी. एफ. जॉन. हा कालखंड होता १९९०च्या दशकाचा. जॉन देवराज यांनी बंगलुरू शहराच्या सार्वजनिक अवकाशात शिल्पं उभी केली. यात त्यांनी मुख्यतः लहान मुलांना सहभागी करून घेतलं. या मुलांनी देवराज यांच्या बरोबर ही प्रतिकात्मक शिल्पं आणि स्मारकं शहरातले बगिचे, मोकळी मैदानं, तलाव अशा ठिकाणी तयार केली. या शिल्पांचा आशय हा सामाजिक होता, त्यात शांतता, मैत्री, लोकशाही, स्वातंत्र्य यासारखी मूल्ये जपणारी प्रतिकं त्यांनी मुलं आणि नववसाक्षरांच्या सहयोगातून उभारली. यात कला लोकांपर्यंत सहजपणे पोहोचवणं हा मुख्य उद्देश होता.

बॉर्न फ्री


१९९२ साली बाबरी मस्जिद पाडल्यानंतर इतर शहरांप्रमाणेच बंगलुरू शहराचं वातावरणही ढवळून निघालं. ठिकठिकाणी जातीय दंगली आणि हिंसाचार उसळला. या अस्वस्थ करणाच्या काळात अनेक कलाकारांना स्टुडिओच्या बाहेर पडून, प्रत्यक्ष लोकांत जाऊन काम करण्याची, संवाद साधण्याची आवश्यकता असल्याची तीव्र जाणीव झाली. गाणी, प्रदर्शनं, नाटकं अशा विविध माध्यमांतून भारतभर अनेक कलाकार सार्वजनिक अवकाशात प्रत्यक्ष लोकसंपर्कात येऊन कलाकृती तयार करू लागले, लोकांच्या सहभागातून कलाव्यवहार आकाराला येऊ शकतो, तो अधिक अर्थपूर्ण ठरू शकतो का यावर विचार आणि प्रक्रिया या काळात सुरू झाली. देवराज यांनी 'आशेच्या बगिचात' बॉर्न फ्री हे १४ फूटी शिल्प मुलांच्या मदतीने १९९४ साली उभं केलं. लोकचळवळींशी संबंधित असलेले सी. एफ. जॉन यांना त्या काळात शहरातल्या दंगलग्रस्त भागात पोस्टर आणि कबीराच्या दोह्यांमधून लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न केला. हा अनुभव त्यांच्याकरिता अत्यंत क्लेशदायक ठरला. पण तरीही हे चालू ठेवत त्यांनी पुढे सार्वजनिक अवकाशात हस्तक्षेप करणारे आणि विविध समुदायांबरोबर संवादात्मक कला-प्रकल्प १९९३ ते २००३ या दहा वर्षाच्या कालावधीत आकाराला आणले आणि पार पाडले. कलेक्टिव्सचा धागा या उपक्रमांशीही जोडलेला आहे कारण जॉनच्या बरोबरीने काही कलाकारांनी एकत्र येऊन या काळात कलाकृती आणि कला प्रकल्पांवर काम केले. हे सहयोगातून काम करणं, केवळ आपल्या व्यक्तिगत अवकाशात काम न करता त्याची व्याप्ती वाढवणं, कलाकारांचा एक गट एक कम्युनिटी म्हणून उभं राहाणं आणि त्यातून आपल्याला भवतालाला भिडणं हे या कलाकारांना शक्य झालं


कल्चरल स्पायरल

 

वॉल्स अॉफ मेमरीज


हे करताना त्यांनी कलाकारांना केवळ स्वतःचे अनुभव प्रमाण न मानता प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन परिस्थिती समजावून घ्यायला उद्युक्त केलं. दंगलग्रस्त भागात जाऊन काम करायला लागल्यावर सहभागी कलाकारांची विचार प्रक्रिया, कला-प्रक्रिया या सगळ्यातच आमूलाग्र बदल या काळात घडून आला. 'कल्चरल स्पायरल' हे ४० फुटी सर्पिलाकृती मांडणी शिल्प जॉन यांनी शीला गौडा आणि रसना भूषण, राघवेंद्र राव, सुरेखा या कलाकारांच्या सहयोगातून उभारले. मांडणी शिल्प उभं करायचं आणि तेही सार्वजनिक अवकाशात हा नावीन्यपूर्ण प्रयोग बंगलुरू मध्ये पहिल्यांदाच घडत होता. अगदी भारतातल्याही पहिल्या काही प्रयोगांपैकी हा एक. यात दोन सर्पिलाकृती एक्रेलिक एकमेकांत अशा पद्धतीने गुंफल्या होत्या की एकातून प्रवेश करतील आणि केंद्रबिंदू पर्यंत पोचून दुसऱ्या सर्पिलाकृतीतून बाहेर पडतील. यातल्या पारदर्शक भिंतीवर आक्का महादेवी, कबीराच्या ओळी आणि त्याच बरोबर प्रतिमा रंगवलेल्या होत्या. प्रेक्षक त्या अनुभवत आत शिरतो पण त्याचबरोबर तो त्या सर्पिलाकृतीतून निर्माण होणारे एकमेकांवर येणार पदर अनुभवतो, एका पारदर्शी पातळ भिंतीतून पलिकडची भिंत पाहू शकतो. त्यावरच्या प्रतिमाकृती एकमेकांना छेद देतात, नवे अर्थ आणि संदर्भ देतात. त्या प्रतिमांच्या थरातून आपण पलिकडच्या प्रेक्षकांनाही पाहू शकतो. सर्वात आत, त्या सर्पिलाकृतीच्या केंद्रस्थानी दोन आरशांची रचना केलेली होती. हे आरसे तुम्हाला स्वत:कडे बघायला, प्रश्न विचारायला, आपले अनुभव ताडून बघायला भाग पाडतात. या दशकभराच्या कालावधीत त्यांनी अनेक प्रकल्पांवर कलाकारांच्या आणि त्या त्या परिसरातल्या समुदायांच्या सहयोगातून काम केले. 'टेरीटेरी' हा आैद्योगिक परिसरातला प्रकल्प असेल किंवा 'क्वेस्ट फॉर सेलिब्रेशन अॅंड क्वेस्ट अॉन वेस्ट' हा प्रकल्प हे जागतिकीकरणानंतर आलेल्या उपभोगवादी जीवनसरणीवर भाष्य करणारे, जमीन, निसर्ग, मानवी गरजा याबद्दलचे मुद्दे उपस्थित करणारे होते. 'वॉल्स अॉफ मेमरीज' या कलाप्रकल्पासाठी त्यांनी शहराबाहेरची जुनी मोठी पायऱ्या असलेली विहीर निवडली. ही विहीर जॉन, त्रिपुरा कश्यप आणि अझिस टी. एम. या तिघांसाठी एक आव्हानात्मक साइट बनली. तिथल्या रहवाशांच्या स्मृती, त्याभोवती गुंफलेल्या कथा आणि मिथकं, त्या विहिरीचं त्या भागातलं महत्त्व, जमिनी खालची पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आटलेल्या विहीरी, वाढत्या शहरीकरणामुळे बदलत जाणारी भूरचना, त्याबरोबर नाहिसे होत जाणारे विहीरींसारखे घटक, आटलेल्या विहिरींमध्ये साठत जाणारा कचरा हे सगळं लक्षात घेऊन या कलाकारांनी तेथे हस्तक्षेप केला. इन्स्टलेशन, फोटोग्राफी आणि परफॉर्मन्स या माध्यमांतला हा कलाविष्कार तिथल्या स्थानिक लोकांच्या संवादातून घडत, उलगडत गेला. वर्षानुवर्षे सामूहिक स्मृतीचा भाग असलेल्या पण बदलत्या सांस्कृतिक व्यवहारात वापरातून बाद ठरलेल्या विहीरीसारख्या फॉर्मवर काम करण्यातून कलाकारांनी तिथल्या जगण्याशी, लोकांची स्वप्नं, आकांक्षा, भीती यांच्याशी त्यांचा मेळ घातला. इथं विहीर ही एक प्रयोगशाळा बनली आणि कलाकारांना आपले प्रयोगशील मार्ग चोखाळायला वाव मिळाला. एवढंच नव्हे तर या सारख्या प्रयोगशील कलाव्यवहाराची मालिकाच या शहरात या काळात आणि त्यापुढे सुरू झाली आणि बंगलुरू शहराने समकालीन कलाव्यवहारात अशा सामूहिक कला प्रयोगांनी पुढच्या दशकात मोलाची भर घातली.


छायाचित्र सौजन्य: जॉन देवराज आणि सी. एफ. जॉन
पूर्वप्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, पुणे (मार्च २०१६)