सीमरेषा धूसर होताना: शिल्पा गुप्ता यांची मुलाखत (पूर्वार्ध)



शिल्पा गुप्ता ही समकालीन कलेतलं एक महत्त्वाचं नाव. जागतिक पातळीवर तिच्या कलाकृती वाखाणल्या गेल्या आहेत. हवाना, सेऊल, सिडनी, शांघाय, ग्वांग्जु इथल्या बिनाले सारख्या अनेक मोठ्या कलाप्रदर्शनांध्ये शिल्पा सहभागी होत आली आहे. सर्पंटाईन गॅलरी, टेट मॉडर्न, न्यू म्युझियम, मोरी म्युझियम यासारख्या आंतर्राष्ट्रीय संस्थांमध्ये तिच्या कलाकृती प्रदर्शित केल्या गेल्या आहेत. प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता यांच्या मिलाफातून तिने राष्ट्रवाद, स्थलांतर, देशांच्या सीमारेषा, यासारखे अनेकविध मुद्दे हाताळले आहेत. तिच्या मुलाखतीतील हे काही अंश.

तू 'जेजे'ला असल्यापासून नवनवीन माध्यमं हाताळायला लागलीस, प्रयोग करत राहिलीस... त्यातूनच तुझी कलाभाषा विकसित होत गेली, त्याबद्दल सांगू शकशील काय?

सुरुवातीपासूनच मला न्याहाळणं, पाहाणं आणि त्याची व्यक्तिसापेक्षता यात रूची होती. आपण वस्तूंकडे, खासकरून कलावस्तूंकडे, कसे पाहातो, त्यांचे अर्थ कसे लावतो, असं काय असतं जे एखाद्या वस्तूला कलाकृती बनवतं किंवा नाही? कॉलेजमध्ये असताना मला कुणीतरी सांगितलं होतं की इंडोनेशिया मधल्या कुठल्यातरी भाषेत 'कले' साठी प्रतिशब्दच नाहीये. त्यासाठी 'जगणं' हाच शब्द ते वापरतात. कलेची नेमकी व्याख्या काय आहे, कलाकृती कशी समजून घ्यायची, तिच्याकडे कसं पाहायचं, तिचे अर्थं कसे समजून घ्यायचे... मी 'जेजे'ला शिकायला लागल्यावर विविध वस्तू वापरून कलाकृती बनवू लागले. ते का करत होते मला तितकंस कळत नव्हतं पण मला वस्तू हाताळण्यात, त्यांना कलाकृतींमध्ये बांधण्यात रस होता. मला चित्रकलेचं-शिल्पकलेचं तंत्र शिकण्यात रस होताच पण त्याचबरोबरीनं साधारण १९९२-९४ च्या आसपास मी 'जेजे'त असताना घुंगरू किंवा जिलेटीन पेपरचे डब्बे या सारख्या वस्तू आणून त्यांच्या रचना करून शिक्षकांना दाखवायचे. एकच चांगली गोष्ट होती ते म्हणजे त्या शिक्षकांनी मला कधी उडवून लावलं नाही, असल्या प्रयोगांना ते प्रोत्साहनच देत राहिले. मग मला एक सिनियरनी सांगितलं की तू ज्या प्रकारचे प्रयोग करतेस तशा प्रकारचं काम कलाकार करत आले आहेत, त्यातूनही माझी कलाभाषा विकसित होत गेली

Untitled (1997)

 

कलावस्तू आणि कलाकाराचं घडणं हे कलाकाराची कलाभाषा तयार करत असतं. तुझ्याबाबतीत ते कसं उलगडत गेलं?

१९९०च्या आसपासच्या काळात अचानकपणे आजूबाजूला बदल घडताना दिसून येत होते...व्हीएचएस, इंटरनेट, बिलबोर्ड्स...या सगळ्याचा परिणाम होत होताच. तेच माझ्या कामात उतरत गेलं कारण तेच माझं वास्तव होतं, त्यातूनच माझ्या कामातल्या प्रतिमा आणि विषयवस्तू ठरत गेल्या. माझं सुरुवातीचं काम लालसा, हाव, इच्छा याभोवती आकाराला आलं. त्यामुळेच सुरुवातीपासूनच माझं काम हे विषयवस्तू, त्यांचे अर्थ या विषयी होतं. त्यामुळे ते केवळ जन-कलेच्या अंगानं नव्हतं तर त्यातून मी कलावस्तू, कलाकार आणि प्रेक्षक यांचातल्या अवकाशाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होते. कारण कलाकार आणि कलावस्तू यांच्यातलं नातही बऱ्याचदा क्लेशदायक असतं...कलाकार हा सजग संकलक असतो पण त्याचबरोबर तो त्याच्या आंतर्भानाशी बांधील असतो. तेच त्याच्या कलाकृतीत उमटत असतं. पण त्याचबरोबर, ही कलावस्तू कुठेतरी सार्वजनिक अवकाशात मांडली जाते हे वास्तवही विसरता येत नाही. त्यामुळे प्रेक्षकाचं अस्तित्व तर महत्त्वाचं होतंच पण एका पातळीवर कलाकारही प्रेक्षक बनतो या वास्तवाचं भान मला सतत होतं. मी जेजे'ला असताना एक मांडणीशिल्प केलं होतं. त्यात दोन लाकडी चौथऱ्यांवर दुधाच्या बाटल्या ठेवल्या होत्या. एका चौथऱ्यावरच्या बाटल्यांमध्ये पानपसंदच्या गोळ्या होत्या तर दुसरा संच लांबून रिकामाच दिसत होता. जवळ येऊन पाहिलं की त्यातली वाक्यं प्रेक्षकांना वाचता येत, 'हेल्प युअरसेल्फ. प्लीज लाइक मी, आय वॉन्ट यू टू लाइक मी.' यातून कुणाच्या नजरेला (गेझ) कलावस्तूचं अतिसंवेदनशील असणं आणि वस्तूंतलं प्रत्यक्ष अंतर, त्यांचा एका ठिकाणहून दुसरीकडे होत जाणारा प्रवास, त्याबरोबरचं अर्थघटन, त्यातून निर्माण होणाऱ्या असंख्य पण भेगाळलेल्या स्मृती हे सारं मला समजून घ्यायचं होतं.

जनकला या कलाप्रकाराबद्दल किंवा गॅलरीबाहेर जाऊन काम करणं हेही तू आजमावत आली आहेस, त्याकडे तू कोणत्या दृष्टीकोनातून पाहातेस?

सार्वजनिक अवकाशात एखादी कलाकृती तयार केली किंवा मांडली म्हणून ती जनकला या प्रकारात मोडतेच असं नाही. त्यासाठी कलाकाराचा दृष्टिकोन, त्यांचे संदर्भ, त्यांना अंगिकारलेल्या कार्यपद्धती या सगळ्यातून ते ठरत जातं, असं मला वाटतं. मागे वळून बघताना हे 'पब्लिक' कोण आहे, हेही पाहाणं महत्त्वाचं ठरतं. जेजे'च्या शेवटच्या वर्षाला असताना जंहागीरला प्रदर्शन भरायचं. मी काही स्मृती विकायला ठेवल्या होत्या. लोकं त्यातल्या त्यांना पाहिजे त्या स्मृती विकत घेऊ शकत होते. आमच्या या कलाकृतींसाठी चांगली जागा मिळवण्यासाठी आमच्यात चढओढ असायची. मी तशी जागा पटकावली पण शिक्षकांनी माझं मांडणीशिल्प पाहून मला दारासमोर माझी कलाकृती मांडायची सूचना केली. मी आधी थोडी हिरमुसले पण मग तिथं मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की माझ्या कामासाठी तोच 'बेस्ट स्पॉट' होता. तिथे लोकांची सतत ये जा होती, त्यामुळे अधिक मोकळेपणा होता, मला अनेक गोष्टी ताडून पाहाता येत होत्या, कलादालनात जाणवणारा हलकासा ताण नव्हता आणि अधिक जिवंतपणा होता. त्याचबरोबर, कलाकृतीला वेगळा अर्थ प्राप्त होत होता. त्यामुळे गॅलरी लकीरे असेल किंवा केमोल्ड असेल, सुरूवातीपासूनच माझा कलाव्यवहार आंतरक्रियात्मक राहिलेला आहे

Shadow 3 (2007)

Memory (2007)
 

'आरपार' हा भारत आणि पाकिस्तानमधल्या कलाकारांच्या सहयोगातून झालेला प्रकल्प होता. त्याची सुरूवात कशी झाली, पुढं तो कसा बहरत गेला? लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या?

१९९९ मध्ये दिल्लीला खोजच्या कार्यशाळेत वेगवेगळ्या देशातले कलाकार आले होते. तिथेच माझी हुमाशी मैत्री झाली. टेलिविजनवर तेव्हा कारगीलच युद्ध चालू झालं होतं. आम्ही अखंड गप्पा मारायचो, दंगा करायचो. त्या गप्पांच्या दरम्यान आम्हाला वाटलं की काहीतरी एकत्र करायला हवं. कार्यशाळा संपल्यावरही आम्ही एकमेकींच्या संपर्कात होतो त्यातूनच 'आरपार १'चा जन्म झाला. मग पुढे आम्ही आरपार २ आणि ३ ही आयोजित केले. पहिल्या भागात दोन्ही देशातले पाच-पाच कलाकार सहभागी झाले होते. हुमा तेव्हा कराचीत राहात होती. आम्ही कलाकारांकडून ए४ आकाराच्या कलाकृती मागवल्या आणि भारतीय कलाकारांच्या कलाकृती पाकिस्तानात पाठवल्या आणि पाकिस्तानी कलाकारांच्या इकडं आणल्या. मी त्यात कलाकार म्हणूनही सहभागी झाले होते. यात सगळ्या रोचक भाग होता तो म्हणजे कलाकारांचा प्रतिसाद. उदाहरणार्थ, बालाने केलेलं काम हे त्याच्या नेहमीच्या शैलीपेक्षा फार वेगळं होतं, इतकं की ते माझंच काम आहे असं बघणाऱ्याला वाटू शकलं असतं. त्यामुळे कलाकारांच्या मनातही एक कल्पित प्रेक्षकवर्ग होता ज्याच्यासाठी त्यांनी या कलाकृती बनवल्या असाव्यात.

या कलाकृती रस्त्याकडेची दुकानं, भिंती, पोस्टाच्या पेट्या, कॅफे यावर आम्ही चिकटवली जेणेकरून येता-जाता ती लोकांच्या नजरेस पडतील. एका कलाकृती उर्दू भाषेतला लिखित मजकूर होता, ते मग मी ज्या भागात लोकांना उर्दू वाचता येईल अशा भागात लावलं. आणि लोकांच्या प्रतिक्रिया म्हणशील तर ते जोखणं अवघड होतं कारण मी एकटीच तेव्हा हे शहरभर चिकटवत होते. नंतर, 'शॅडो ३' च्या वेळेला मी कार्टर रोडवर थांबून लोकांशी बोलायचे, त्यांचं मत समजून घ्यायचे. पण ही तर अगदीच सुरूवात होती. त्यामुळे प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत हे समजून घेणं अवघडच होतं. सार्वजनिक अवकाशात जेव्हा तुम्ही सर्वसाधारणपणे जाहिराती पाहाता, एकतर कंपन्यांच्या किंवा राजकीय पक्षांच्या. त्यात तुम्हाला काहीतरी विकत घ्या, मत द्या असं आवाहन असतं. या कलाकृतींमध्ये तसं काहीच नव्हतं, त्यामुळे त्या प्रतिमा मनात खोलवर रूजणाऱ्या असल्या तरी असा सरळ सरळ प्रतिसाद येईलच असं काही नाही.

आरपार २ च्या वेळी एका पाकिस्तानी कलाकारानी पाठवलेल्या कलाकृतीवर नकाशा होता आणि हिरव्या रंगात उर्दूत काही मजकूर होता. मी ते लावत काळाघोडापासून बांद्रयाकडे चालले होते. तेव्हा माझ्या मदतनीसाला पोलिसांनी थांबवून 'बाईंना थांबायला सांगा नाहीतर 'पोटा' लावू' अशी धमकीही दिली होती. मुळात तो मजकूर काय आहे हे समजून घ्यायची तसदीही त्यांनी घेतली नाही. खरंतर त्यात कराचीत असलेल्या 'बॉम्बे हाऊस', 'दिल्ली दरबार' या इमारतींचे उल्लेख होते.

त्यावेळी विडिओ आर्टची पण सुरूवात होत होती. त्यामुळे, आरपार ३ मध्ये आम्ही विडिओ एकमेकांना पाठवले, त्यातले काही मी कार्टर रोडवर दाखवले होते, कॉलेजमध्येही स्क्रिनिंग्ज केली. यामध्ये सहभागी बहुतेक कलाकारांसाठी असं रस्त्यावर आपलं काम घेऊन जाण्याचा हा पहिलाच अनुभव होता.

(क्रमशः)

मुलाखत आणि अनुवाद: नूपुर देसाई
छायाचित्र सौजन्य: शिल्पा गुप्ता
पूर्वप्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, जुलै २०१६

ते टोळांचे ढग नव्हते तर मग कशाचे होते?


मुंबईच्या नॅशनल गॅलरी अॉफ मॉर्डनअार्टच्या तिसऱ्या मजल्यावरच्या घुमटाकार छत असलेल्या दालनात तुम्ही प्रवेश करता. जवळपास २२६ लांब आणि ९ फुट उंचीच्या पांढऱ्याशुभ्र गोलकार भिंतीवर कोळशाने रेखाटलेल्या मानवाकृती आणि लॅंडस्केप्स यांचा पट आपल्यासमोर उलगडत जातो. प्रभाकर पाचपुते गेली काही वर्षं कोळसा खाणी, भू-संपादन, तिथले कामगार, शेतकरी यांचं जगणं या विषयांना धरून कलाकृती निर्माण करत आलाय. त्याच्या 'ते टोळांचे ढग नव्हते' ('नो, इट वॉज नॉट द लोकस्ट क्लाऊड') या एकल प्रदर्शनातल्या या चित्रमालिकेमध्ये हेच मुद्दे एकत्रतपणे आपल्याला पाहायला मिळतात.

मूळच्या चंद्रपूरच्या असलेल्या प्रभाकरच्या कलाकृती खैैरागढच्या कला महाविद्यालयात शिकत असताना या मुख्यत: त्याच्या अवतीभवतीची माणसं, त्यांची कथन यांच्याशी निगडीत होती. नंतर बडोद्याच्या शिल्पकला विभागातून एम.एफ.. करताना चिलीमध्ये खाणीतल्या स्फोटांच्या दरम्यान झालेला अपघात आणि त्याच दरम्यान चंद्रपूरच्या खाणीत झालेला अपघात हा या विषयावर काम करण्यासाठी सुरुवातीचा बिंदू ठरला. त्याच्या आजोबांपासून घरातले-नात्यातले अनेकजण खाणीत काम करत आले आहेत, काहींच्या जमिनी गेल्या आहेत, त्या बदल्यात त्यांना खाणीत राबावं लागतंय, हा वैयक्तिक अनुभव त्याचं कलाविश्व समृद्ध करायला कारणीभूत ठरला.

भिजलेला पांढरा ढग आणि एक्झिट


डेड सी मॅन आणि टुमाॅरो इज अनादर डे


२०१३ साली कलकत्त्याच्या एक्सपरिमेंटर गॅलरी मध्ये भरलेल्या 'लॅंड इटर्स' या प्रदर्शनात कोळशाच्या खाणी, कामगार, धोकादायक काम, खाणीतले बोगदे, अंधाऱ्या वाटा यांच्या प्रतिमा प्रभाकरच्या रेखाटनांमधून उमटत राहतात. त्या आधी, 'केनरी इन अ कोलमाइन' या त्याच्या क्लार्क हाऊसमध्ये भरवलेल्या पहिल्या एकल प्रदर्शनात त्याने प्रेक्षकांना कोळशाच्या खाणीचा अनुभव दिला. कुलाब्यातल्या जुन्या इमारतीतल्या अंधाऱ्या खोल्यांतल्या भिंतींवर काढलेली रेखाचित्रं प्रेक्षक टॉर्चच्या प्रकाशात पाहाताना खाणीतलं कोंदट वातावरण, खाणकामगारांचं कष्टाचं जीचन, त्यातून केवळ शरीरावरच नव्हे तर मनावर होणारे आघात या सगळ्याचं दर्शन यातून घडत राहातं. तुकड्या तुकड्यात दिसणाऱ्या मानवाकृती एकसंधपणे आपल्या मनात उभ्या राहातात. याउलट, एनजीएमएच्या दालनात आतापर्यंतचे सर्व आकार, आकृतीबंध एकत्र येत त्यांचा एक पॅनोरामा उभा राहातो. अशाप्रकारे, निसर्ग चित्र किंवा लॅंडस्केप या कलाप्रकाराला समकालीन संदर्भात बघताना केवळ नयनरम्य डोंगर-दऱ्या किंवा समुद्रकिनारे अशा प्रकारे मांडणी न करता खरंच आपल्या आत रूतत जाणऱ्या, विचारविश्वावर प्रभाव टाकणाऱ्या, निरंतर बदलत जाणाऱ्या भवतालाचे, सामाजिक-सांस्कृतिक स्थिंत्यंतरांचे पडसाद त्यात दिसतात की नाही हे पाहाणंही महत्वाचं ठरतं. हे टिपणं, त्यावर भाष्य करणं हेच कलाकारांच्या समकालीन असण्याचं द्योतक ठरतं आणि तरंच लॅंडस्केप हा कलाप्रकार आज एक समर्पक आणि सामर्थशाली कलाप्रकार बनू शकतो. तेच नेमकं प्रभाकरच्या रेखाटनात दिसतं.

विदर्भातले खाणकामगार आणि शेतकऱ्यांच्या जगण्याचं वास्तव जरी तो टिपत असला तरीपण ते तेवढ्यापुरतंच मर्यादित न राहता एका प्रकारे वैश्विक बनतं. जर्मनी, वेल्स पासून ब्राझिल, तुर्कस्तान पर्यंतच्या खाणी, तिथले अनुभव, कामाची व्यवस्था, खाणींचा इतिहास याचा अभ्यास करून प्रभाकर ते त्याच्या कलाकृतीतून मांडत आलाय. एकीकडे, या प्रतिमा अनिल बर्वे यांच्या 'अकरा कोटी गॅलन पाणी' मधला झगडा, किशोर कवठे यांच्या 'डगान' मधल्या खाणकामगारांच्या आयुष्यावरच्या कविता किंवा नवजोत अल्ताफ यांच्या सध्याच्या चालू प्रकल्पातल्या छत्तीसगडमधल्या वेदांत-बाल्को मालकीच्या खाणींचं चित्रण यांच्या माध्यमातून आपल्यासमोर उभ्या राहातात. तर दुसरीकडे, प्रभाकर या माध्यमांची सरमिसळ करत, त्यांना एकमेकांना पूरक पद्धतीने एनजीएमएच्या प्रदर्शनात आणतो. चंद्रपूरच्या सप्तरंग या खाणकामगार-कवी-शेतकरी यांच्या कलेक्टीवच्या प्रभाकर अनेक वर्षं संपर्कात आहे. त्यातूनच किशोर कवठे आणि मनोज बोबडे यांच्या कवितेतल्या प्रतिमा प्रभाकरच्या कलाभा़षेचा अविभाज्य भाग बनत जातात. १३ दिवस भिंतींवर ही रेखाटनं करण्यासाठी दिलेला वेळ आणि शारीरिक श्रम यातून तयार झालेली ही चित्रमालिका क्युरेटर झाशा कोला म्हणतात त्याप्रमाणे जणू 'श्रमाचं महाकाव्य' बनतं. चित्रमालिकेच्या चक्राकार रचनेत त्या श्रमाची, शोषणाची, त्यातूनही उमटणाऱ्या आशेची कथनं प्रेक्षकांसमोर उलगडत जातात. टोळधाड, पिकाला लागलेली कीड किंवा पावसाचं दुर्भिक्ष या नैसर्गिक गोष्टी कारणीभूत आहेत असा सार्वत्रिक समज असताना तो खोडून काढत प्रभाकर प्रेक्षकांसमोर सरळसरळ प्रश्न उभा करतो. या भीषण परिस्थिती नेमकी सामाजिक-राजकीय कारणं काय आहेत? ही टोळधाड जर नसेल तर नेमकं यामागचं कारण काय आहे? अशावेळी जमिनी बळकावणाऱ्या कंपन्या, फुटकळ किमतीत शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणारे मालक, कुटुंबातल्या एखाद्याला खाणीत नोकरी देऊन स्थलांतराला भाग पाडणारी धोरणं यासाठी या प्रदर्शनात टोळांचे ढग हे रूपक म्हणून आपल्यासमोर येतं. यात कोळसा हा केवळ रेखाटनांचा विषय न राहता तो प्रभाकरच्या चित्रांचं माध्यमही बनतो. चारकोल या माध्यमाचा त्याने जाणीवपूर्वक केलेला वापर त्यांच्या रेखाटनांना वेगळीच खोली आणि अर्थ प्राप्त करून देतात.

रहीम काका


रेझिस्टन्स


घुमटाकार इमारतीतल्या गोलाकार भिंतींवरची चित्रं आणि मध्यभागी छतावर दिसणारा अॅनिमेशन-पट हे 'पॅनॉप्टिकॉन' रचनेचा आभास निर्माण करतात. 'पॅनॉप्टिकॉन'मध्ये गोलाकार रचनेच्या इमारतीच्या केंद्रस्थानी भोवतालावर पाळत ठेवणारी यंत्रणा कार्यरत असते. ती पाळत नेमकी कधी आणि कशी ठेवलीये हे लोकांना कळत नसल्यामुळे सतत शिस्त पाळण्यास त्यांना भाग पाडलं जातं. एवढंच नव्हे तर ते सत्ता राबवण्याचे साधन म्हणून वापरले जाते. (मिशेल फुको, डिसिप्लीन अॅंड पनिश, १९७५) पिओत्र द्युमाला या पोलंडच्या कलाकारानी विकसित केलेलं 'डिस्ट्रक्टीव अॅनिमेशन'चं तंत्र वापरून हा अॅनिमेशन-पट तयार केला आहे. यात एक चित्र कागदावर किंवा कुठल्याही पृष्ठभागावर काढून ते खोडून टाकायचं आणि पुढची कृती दाखवणारं चित्र पुन्हा काढायचं अशा पद्धतीने चित्रांचे एकमेकांवर थर तयार होतात. ते कॅमेऱ्यातून टिपून त्यांची एकत्रितपणे चित्रमालिका बनवली की त्यातील वस्तू किंवा व्यक्ती यांचे हालचालींचे टप्पे धुसर का होईना पण पाहाणाऱ्याला दिसत राहतात. दुर्बिणीतून दोन डोळे चारही दिशांना रोखून पाहातात, करडी नजर ठेवतात. त्यात मॅनेजर किंवा सर्वेक्षकाचे ते डोळे हे एक पात्रच बनून जातं आणि ते ड्रोनच्या रूपात भिंतीवरच्या चित्रातही दिसत राहातं. 'डिस्ट्रक्टीव अॅनिमेशन'च्या कृतीतच अंतर्भूत असलेलं विध्वंसक रूपही एकप्रकारे जमिनीचा आणि निसर्गाचा होणाऱ्या अनियंत्रित विकासाचं आणि पर्यायानं विनाशाचं प्रतीक बनतं.

या चक्राकार चित्रमालिकेत आपल्याला दिसत राहातात ते शेतकरी अन् खाण कामगार, त्यांच्या डोक्यांच्या जागी बसवलेली शेतीची अवजारं, नांगराचे फाळ, फवारणी यंत्र अाणि खाणीतले हेडलाइट. यातल्या प्रतिमा आणि त्यांचे अर्थ शब्दश: आहेतच पण रूपकात्मकही आहेत. सुरुवातीला फवारणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यावर घोंघावणारा कीटकांचा भलामोठा ढग आहे. पर्वताच्या सावलीच्या टोकावर एक कललेली बोट आहे जी सरकारी रसद पुरवण्यासाठी आलेली असली तरी ती मदत प्रत्यक्ष किती जणांपर्यंत पोहोचते असा प्रश्न प्रभाकर इथे विचारतो. यानंतर, मध्यभागी खाली वाकलेली एक मानवाकृती, बहुधा कंपनीचा मॅनेजर, जमिनीला पडलेल्या भेगा पाहाताना दिसते. कारावाजिओच्या 'डाऊटींग थॉमस' या चित्राला तो संदर्भ म्हणून वापरतो. थॉमस ज्याप्रमाणे येशूच्या जखमा बोटाने तपासू पाहातोय त्याप्रमाणेच शेतकऱ्यांच्या हालाखीच्या परिस्थितीवर विश्वास न ठेवू शकणारे लोक जमिनीला पडलेल्या भेगांमध्ये बोटं खुपसून खात्री करून घ्यायचा प्रयत्न करतात पण ही वास्तवापासूनचं त्यांचं तुटलेपणच दर्शविते. 'भिजलेला पांढरा ढग' या चित्रात तो कापसात पाणी टाकून त्याचं वजन वाढवण्याचा आणि पर्यायाने स्वत:चं नुकसान टाळण्यासाठी धडपडणारा शेतकरी चित्रीत करतो.

ड्रीम अॉफ द मॅनेजर


लॅंड एस्केप

मॅनेजरची प्रतिमा प्रभाकरच्या कलाकृतींमध्ये पुनःपुन्हा येत राहाते. ती कागद्याच्या लगद्याच्या शिल्पातूनही दालनाच्या एका भागात उभी असलेली आपल्याला दिसते. हुकुम देण्याच्या आविर्भावात असलेली ही मानवाकृतीच्या डोक्यातून खाणीतलं यंत्र बाहेर येतं आणि त्यातून जमीन सर्वेक्षणाचे तक्ते, नकाशाची भेंडोळी लोंबकाळताना दिसतात. सतत नवीन जमिनीच्या शोधात असलेला हा सर्वेक्षक जणू तिथल्या जमिनी त्याच्या एका आदेशावर नियंत्रित करत असतो. दुसऱ्या बाजूला, काही मानवाकृती भिंत, जमिनीचे तुकडे हालवताहेत, डोक्यावर वाहून नेताहेत. यात केवळ जमिनीचाच नव्हे तर तिथल्या माणसांचाही कायापालट होताना दिसतो. हे सगळं चालू असताना परत एकदा ढग जमू लागतात. यावेळी छतावरच्या अॅनिमेशन-पटातील सर्वेक्षकाचे पाळत ठेवणारे डोळे ड्रोन कॅमेऱ्याप्रमाणे गटा-गटानी घोंघावू लागतात, आपलं वर्चस्व लादू पाहातात. लाल-पांढरे पट्टे असलेले वात-दर्शक येऊ घातलेल्या वादळची जाणीव करून देतात. आणि हे वादळ आल्यानंतरही 'रेझिस्टन्स' या चित्रात माणसं आपल्या जमिनींना धरून ठेवतात. या मानवाकृती पृथ्वीच्या गोलावरील नकाशांची आठवण करून देत या विषयाला पुन्हा जागतिक पातळीवर नेतात. पण त्याचबरोबर, स्थानिक विरोध, संघटना, पुनर्वनीकरणाची प्रक्रिया, शेतकरी-कवी-कामगारांचे गट यांचं प्रतीक बनून आपल्यासमोर येतात. तर, 'डेड सी मॅन' मध्ये बंद झालेल्या खाणी रेतीने न भरल्यामुळे जमिनीच्या खाली तयार झालेली पोकळी, त्यात साठत जाणारं पाणी, त्यामुळे होणारे अपघात, हरवलेली माणसं अन् जनावरं आणि त्या पोकळीच्या पृष्ठभागावर वसलेलं गाव, त्याचं अधांतरी भविष्य यावर भाष्य करते.

शेवटच्या टप्प्यात, मृत खाणींच्या बाबतीतली जगाच्या इतर भागातील धोरणं, त्या जागांचा केला जात असलेला पुनर्वापर हे प्रभाकर अधोरेखित करू पाहातो. खाणीची प्रचंड मोठी जागा ही अनेक ठिकाणी सांस्कृतिक केंद्र, स्टेडियम किंवा संग्रहालयात रूपांतरीत केली गेली आहेत. तसंच काही पर्याय आपल्या इथे असू शकतात का, असा एक आशावाद यातून दिसतो पण त्याचबरोबरीनं, चित्रातल्या स्टेडियममधून बाहेर पडणाऱ्या माणसांचा पुन्हा एकदा 'टोळांचा ढग' तयार होताना दिसतो आणि तो जमिनी बळकावण्याच्या दिशेने प्रवास करू लागतो...त्यामुळे हेच चक्र पुढेही चालू राहाणार की यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आपण शोधणार, असा सरळ सरळ प्रश्न प्रभाकर प्रेक्षकांसमोर उभा करतो आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करतो.

छायाचित्र सौजन्य: प्रभाकर पाचपुते आणि झाशा कोला
पूर्व प्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, जून २०१६


जन-कला: नोंदी महानगरातल्या (भाग – २)



गेल्या भागात म्हणल्याप्रमाणे बंगलुरू शहरात कलाकारांनी एकत्र येऊन 'कलेक्टिव्स' सुरू केले. याला सुरूवात झाली २००० नंतर. हे बंगलुरू मध्येच का घडलं? या शहराचं वेगळेपण काय आहे हे देखील पाहायला हवं. या शहराला कलाकारांनी असे उपक्रम सुरू करायचा इतिहास आहेच. त्याचबरोबर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे दिल्ली किंवा मुंबईसारखी या शहरात खाजगी कलादालनांची व्यवस्था फारशी इथं अस्तित्वात नसणं. त्याच बरोबर कलाशाळातून बाहेर पडल्यावर या नवोदित कलाकारांनी काय करायचं, कलाकरांच्या नेटवर्कचा भाग कसं बनायचं, आपली कला जाणकारांसमोर कुठे प्रदर्शित करायची अशा प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत हे कलेक्टिव्स अस्तित्वात आले. यातल्या कलाकारांनी आपला कलाव्यवहार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठीही प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण कलाप्रकार, कल्पक रचनात्मक मांडणी यांना स्विकारलं, प्रयोगातून जुन्या रचना मोडून काढून शहाराच्या कलापटलावर अनेक नव्या रचना उभारायला सुरूवात केली. साधारण २००० च्या दशकात समुहा, जागा, बार-वन, १ शांतीरोड यासारखे कलेक्टिव्स इथं उभे राहिले. इथल्या तरूण कलाकारांशी बोलताना लक्षात आलं की २००२ साली इथं 'खोज' या संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यशाळेचा फार खोलवर परिणाम या कलाकारांच्या कलानिर्मिती प्रक्रियेवर घडून आला. आधी म्हणलं त्याप्रमाणे यांची संकल्पनात्म मांडणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी हे केवळ कलाकारांनी केलं. हे प्रकल्प शहराच्या सांस्कृतिक जीवनात भर घालणारे ठरले. या प्रकल्पांकडे हे कलाकार त्यांच्या कलाव्यवहाराचा एक भाग म्हणून बघत होते, आहेत. पण ते कलाकार म्हणून स्वत्वाची व्याप्ती वाढवत इथं 'कलाकार' किंवा 'क्युरेटर' न राहाता फॅसिलिटेटर बनतात, ते कला प्रकल्पांची जोडणी करतात, लोकांना यात सहभागी होण्यास आणि त्यातून कलानिर्मिती करण्यास उद्युक्त करतात. इतर अनेक कलाकार आणि सर्जनशील व्यक्तींना एकत्र आणून त्यातून हे कला-प्रकल्प आकाराला येतात आणि यशस्वीरित्या पार पाडतात. त्यामुळे त्यात कुठलीही पक्की संस्थात्मक रचना न आणता ते कला-प्रकल्पांसारखेच चालवले गेले. त्यातले काही मर्यादित कालावधीकरिता चालवले गेले तर काही दीर्घकालीन ठरले. सुरेश कुमार जी., अर्चना प्रसाद आणि शिवप्रसाद यांची संकल्पना असलेला 'समुहा' हा कला-प्रकल्प ४१४ दिवस सलग चालवला गेला, यात २३ सभासद कलाकारांना प्रत्येकी १७ दिवस कला निर्मिती आणि प्रदर्शनासाठी मिळाले. त्या सोबत, समकालीन कलेवर चर्चा, कार्यशाळा, मांडणीही आयोजित केल्या गेल्या. तसंच 'बार-वन' ही रेसिडन्सी २००७ पासून २०१२ पर्यंत चालू होती. यात भारतातील आणि बाहेरील देखील अनेक समकालीन कलाकार बंगलुरू मध्ये राहून काम करून गेले. बंगलुरू शहराचे सांस्कृतिक, सामाजिक संदर्भ आणि त्या कलाकारांचा कलाव्यवहार यातून या रेसिडन्सीज् आकाराला आल्या

'जागा'ची इमारत
 
मल्लेश्वरम कॉलिंग, अर्चना प्रसाद, जागा


या सगळ्याचे पडसाद बंगलुरू मधल्या कलाकारांच्या वैयक्तिक पातळीवर आणि कलाव्यवहारावर देखील पडलेले दिसतात. साधारण २००० च्या आसपास समुहाच्या सुरेश यांनी कलावस्तू बनवणं बंद केलं. सध्याच्या आर्थिक रचनेत आणि कलाबाजारात कलावस्तूचे विषयवस्तूकरण होण्याची प्रक्रिया सहजपणे घडते. त्याला विरोध म्हणून त्यांचं शिक्षण शिल्पकलेत झालं असलं तरी त्यांनी स्वतःचं शरीर माध्यम म्हणून वापरायला सुरूवात केली. सुरेश यांचा कला व्यवहार हा साइट स्पेसिफिक म्हणजे स्थल-निष्ठ आहे. सार्वजनिक अवकाशात वावरताना तिथले तपशील घेऊन त्यांना जोडून घेत ते त्यांचा परफॉर्मन्स आकाराला आणतात ज्याला ते 'लाइव आर्ट' अशी व्याख्या वापरतात. हा कुठल्याही प्रकारचा तालमी करून किंवा ठराविक कथन असलेला परफॉर्मन्स नसून त्या त्या ठिकाणच्या संदर्भातून आकाराला येणारा कलाप्रकार आहे. त्यामुळेच तो तात्कालिकही आहे आणि तो एक़ हस्तक्षेपही आहे. तो त्या ठराविक काल आणि अवकाशात उपलब्ध असतो, प्रेक्षकांना भिडतो, त्यांच्याशी संवाद साधतो. शहराचं अवकाश सुरेश यांच्यासाठी साइट बनते, त्यांच्या कला व्यवहाराला त्यामुळे अनेक पदर प्राप्त होतात. 'समुहा' हा प्रकल्पदेखील त्यांच्या कलाव्यवहाराचा भाग म्हणूनच त्यांनी आकाराला आणला. हे नवोदित कलाकारांसाठी, एकमेकांचा कलाव्यवहार समजून घेत एकत्र येऊन कलेचं चर्चाविश्व घडवण्यासाठीचं एक व्यासपीठ बनला. 'समुहा'च्या काळातच कलाकारांच्या चर्चा आणि विचारविनिमयातून 'जागा'ची कल्पनाही पुढे आली. सुरुवातीच्या काळात कायमस्वरूपी कलासंस्था न उभारता कमी वजनाच्या पोलादी पट्ट्या जोडून तात्पुरत्या उभारलेल्या इमारतीत त्यांनी काम सुरू केले. याचा फायदा असा झाला की ही इमारत सहजपणे कुठेही उचलून घेऊन जाणं शक्य होतं. उपलब्ध असलेल्या जागेनुसार रचना करत नंतर त्यांनी 'जागा'ची बांधणी केली.