जन-कला: नोंदी महानगरातल्या (भाग – १)



बंगलुरू शहर हे आज माहिती आणि तंत्रज्ञानाचं हब म्हणून ओळखलं जातंय. गेल्या काही वर्षात हे शहर, शहराचं व्यक्तिमत्व बदलत गेलंय. तसा या शहराचा इतिहास जेमतेम तीन-चारशे वर्षांचा. पण गेल्या पंधरा-वीस वर्षात शहर वाढत गेलं, आसपासची गावं, तलाव, रहवासी सगळ्यांना सामावून घेत गेलं. एवढंच नव्हे तर बहुराष्ट्रीय कंपन्या, त्यात कामासाठी येणारे भारतभरातले तंत्रज्ञ, अभियंते, डिजाइनर या सर्वांनी शहरची जडणघडण होत गेली. हे सगळं होत असताना, शहराचा पसारा वाढत जाताना, त्याचा विकास होत जाताना शहराच्या कला-सांस्कृतिक जीवनातही अनेक बदल होत गेले. हे प्रयोग मुख्यत्वे दृश्यकलाकार, नाट्यकलाकार त्याचप्रमाणे समकालीन नृत्यकलाकार यांच्या प्रयत्नातून घडून आलेले आपल्याला दिसतात. यात जनकला किंवा सार्वजनिक अवकाशात घडणारे कला-प्रकार महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. या पार्श्वभूमीवर बंगलुरू मध्ये गेल्या काही वर्षात आकाराला आलेले कलाकारांचे कलेक्टिव्स, त्यांनी पार पाडलेले जनकला प्रकल्प, इतर कलाशाखांच्या सहयोगातून मांडलेले आकृतीबंध, अनेक माध्यमांच्या संयोगातून तयार झालेल्या कलाकृती आणि प्रकल्प हे सगळं समजून घेणं हे महानगरात घडणाऱ्या जनकला प्रकल्पाची व्याप्ती आणि खोली समजून घेण्याकरिता जरूरी ठरतात.

बंगलुरू शहराला मी अलिकडे भेट दिली ती माझ्या जनकलेवरच्या अभ्यास प्रकल्पादरम्यान. या प्रकल्पा अंतर्गत मी भारतातल्या मोठ्या शहरांतल्या अशा कला हस्तक्षेपांकडे अधिक बारकाईने पाहायला लागले. हे जनकला प्रकल्प या शहरांमध्ये का आकाराला आले, त्यांचे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ काय होते, त्यामुळे समकालीन कलाव्यवहारामध्ये काय फरक पडतोय हे सगळे मुद्दे तपासून पाहाता येणं हा याचा उद्देश आहे. या हस्तक्षेपातून होणाऱ्या सामाजिक घुसळणीतून सार्वजनिक अवकाशात काय प्रकारचे बदल घडतात, तिथला कलाप्रकार काय प्रकारची रूपं धारण करतो. त्याचबरोबर, जनकला ही संकल्पनाच मुळात प्रवाही आहे त्यामुळे त्याचं अर्थघटन कसं होतं, यातले अनेक प्रवाह कुठून उगम पावतात, त्यात 'सामाजिकता' अधिक महत्त्वाची की 'कलात्मकता', भारतीय संदर्भात जनकलेची सैद्धांतिक मांडणी कशी करता येईल, त्याचे विविध पैलू शहरांच्या संदर्भात तसेच प्रेक्षकवर्ग, जनकलेची सौंदर्यात्मक मांडणी या परिप्रेक्ष्यातून कसे जाणून घेता येतील हाही या अभ्यासाचा भाग आहे. यात मी मुंबई, दिल्ली, बंगलुरू, कलकत्ता, कोची इत्यादि शहरांमधल्या जनकला व्यवहारांचं दस्तेवजीकरण करणं आणि पुढे जाऊन त्यांचं अर्काइव उभं करणं ही उद्दिष्टं ठेऊन कामाला सुरूवात केली. बंगलुरू शहर यातलं पहिलं शहर होतं जिथे जाऊन मी कलाकार, कला संस्था, तिथले विद्यार्थी, शिक्षक, कलेक्टिव्सचे संस्थापक यांच्या भेटी घेऊन त्यांच्या सविस्तर मुलाखती घेतल्या. यावरून बंगलुरू शहारातील जनकलेच्या उगमाचा आणि विकासाचा एक आलेख आपल्यासमोर उभा राहू शकतो.

गेल्या दोन दशकात या शहरातले कलाकार सार्वजनिक अवकाशात प्रवेश करत परफॉर्मन्स, सामुदायिक कला व्यवहार, जनकलेची इतर अनेक रूपं आजमावून पाहायला लागले. पण याची मुळं शोधायची असतील तर दोन कलाकरांचा कलाव्यवहार इथं पाहावा लागेल. एक आहे, जॉन देवराज आणि दुसरे म्हणजे सी. एफ. जॉन. हा कालखंड होता १९९०च्या दशकाचा. जॉन देवराज यांनी बंगलुरू शहराच्या सार्वजनिक अवकाशात शिल्पं उभी केली. यात त्यांनी मुख्यतः लहान मुलांना सहभागी करून घेतलं. या मुलांनी देवराज यांच्या बरोबर ही प्रतिकात्मक शिल्पं आणि स्मारकं शहरातले बगिचे, मोकळी मैदानं, तलाव अशा ठिकाणी तयार केली. या शिल्पांचा आशय हा सामाजिक होता, त्यात शांतता, मैत्री, लोकशाही, स्वातंत्र्य यासारखी मूल्ये जपणारी प्रतिकं त्यांनी मुलं आणि नववसाक्षरांच्या सहयोगातून उभारली. यात कला लोकांपर्यंत सहजपणे पोहोचवणं हा मुख्य उद्देश होता.

बॉर्न फ्री


१९९२ साली बाबरी मस्जिद पाडल्यानंतर इतर शहरांप्रमाणेच बंगलुरू शहराचं वातावरणही ढवळून निघालं. ठिकठिकाणी जातीय दंगली आणि हिंसाचार उसळला. या अस्वस्थ करणाच्या काळात अनेक कलाकारांना स्टुडिओच्या बाहेर पडून, प्रत्यक्ष लोकांत जाऊन काम करण्याची, संवाद साधण्याची आवश्यकता असल्याची तीव्र जाणीव झाली. गाणी, प्रदर्शनं, नाटकं अशा विविध माध्यमांतून भारतभर अनेक कलाकार सार्वजनिक अवकाशात प्रत्यक्ष लोकसंपर्कात येऊन कलाकृती तयार करू लागले, लोकांच्या सहभागातून कलाव्यवहार आकाराला येऊ शकतो, तो अधिक अर्थपूर्ण ठरू शकतो का यावर विचार आणि प्रक्रिया या काळात सुरू झाली. देवराज यांनी 'आशेच्या बगिचात' बॉर्न फ्री हे १४ फूटी शिल्प मुलांच्या मदतीने १९९४ साली उभं केलं. लोकचळवळींशी संबंधित असलेले सी. एफ. जॉन यांना त्या काळात शहरातल्या दंगलग्रस्त भागात पोस्टर आणि कबीराच्या दोह्यांमधून लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न केला. हा अनुभव त्यांच्याकरिता अत्यंत क्लेशदायक ठरला. पण तरीही हे चालू ठेवत त्यांनी पुढे सार्वजनिक अवकाशात हस्तक्षेप करणारे आणि विविध समुदायांबरोबर संवादात्मक कला-प्रकल्प १९९३ ते २००३ या दहा वर्षाच्या कालावधीत आकाराला आणले आणि पार पाडले. कलेक्टिव्सचा धागा या उपक्रमांशीही जोडलेला आहे कारण जॉनच्या बरोबरीने काही कलाकारांनी एकत्र येऊन या काळात कलाकृती आणि कला प्रकल्पांवर काम केले. हे सहयोगातून काम करणं, केवळ आपल्या व्यक्तिगत अवकाशात काम न करता त्याची व्याप्ती वाढवणं, कलाकारांचा एक गट एक कम्युनिटी म्हणून उभं राहाणं आणि त्यातून आपल्याला भवतालाला भिडणं हे या कलाकारांना शक्य झालं


कल्चरल स्पायरल

 

वॉल्स अॉफ मेमरीज


हे करताना त्यांनी कलाकारांना केवळ स्वतःचे अनुभव प्रमाण न मानता प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन परिस्थिती समजावून घ्यायला उद्युक्त केलं. दंगलग्रस्त भागात जाऊन काम करायला लागल्यावर सहभागी कलाकारांची विचार प्रक्रिया, कला-प्रक्रिया या सगळ्यातच आमूलाग्र बदल या काळात घडून आला. 'कल्चरल स्पायरल' हे ४० फुटी सर्पिलाकृती मांडणी शिल्प जॉन यांनी शीला गौडा आणि रसना भूषण, राघवेंद्र राव, सुरेखा या कलाकारांच्या सहयोगातून उभारले. मांडणी शिल्प उभं करायचं आणि तेही सार्वजनिक अवकाशात हा नावीन्यपूर्ण प्रयोग बंगलुरू मध्ये पहिल्यांदाच घडत होता. अगदी भारतातल्याही पहिल्या काही प्रयोगांपैकी हा एक. यात दोन सर्पिलाकृती एक्रेलिक एकमेकांत अशा पद्धतीने गुंफल्या होत्या की एकातून प्रवेश करतील आणि केंद्रबिंदू पर्यंत पोचून दुसऱ्या सर्पिलाकृतीतून बाहेर पडतील. यातल्या पारदर्शक भिंतीवर आक्का महादेवी, कबीराच्या ओळी आणि त्याच बरोबर प्रतिमा रंगवलेल्या होत्या. प्रेक्षक त्या अनुभवत आत शिरतो पण त्याचबरोबर तो त्या सर्पिलाकृतीतून निर्माण होणारे एकमेकांवर येणार पदर अनुभवतो, एका पारदर्शी पातळ भिंतीतून पलिकडची भिंत पाहू शकतो. त्यावरच्या प्रतिमाकृती एकमेकांना छेद देतात, नवे अर्थ आणि संदर्भ देतात. त्या प्रतिमांच्या थरातून आपण पलिकडच्या प्रेक्षकांनाही पाहू शकतो. सर्वात आत, त्या सर्पिलाकृतीच्या केंद्रस्थानी दोन आरशांची रचना केलेली होती. हे आरसे तुम्हाला स्वत:कडे बघायला, प्रश्न विचारायला, आपले अनुभव ताडून बघायला भाग पाडतात. या दशकभराच्या कालावधीत त्यांनी अनेक प्रकल्पांवर कलाकारांच्या आणि त्या त्या परिसरातल्या समुदायांच्या सहयोगातून काम केले. 'टेरीटेरी' हा आैद्योगिक परिसरातला प्रकल्प असेल किंवा 'क्वेस्ट फॉर सेलिब्रेशन अॅंड क्वेस्ट अॉन वेस्ट' हा प्रकल्प हे जागतिकीकरणानंतर आलेल्या उपभोगवादी जीवनसरणीवर भाष्य करणारे, जमीन, निसर्ग, मानवी गरजा याबद्दलचे मुद्दे उपस्थित करणारे होते. 'वॉल्स अॉफ मेमरीज' या कलाप्रकल्पासाठी त्यांनी शहराबाहेरची जुनी मोठी पायऱ्या असलेली विहीर निवडली. ही विहीर जॉन, त्रिपुरा कश्यप आणि अझिस टी. एम. या तिघांसाठी एक आव्हानात्मक साइट बनली. तिथल्या रहवाशांच्या स्मृती, त्याभोवती गुंफलेल्या कथा आणि मिथकं, त्या विहिरीचं त्या भागातलं महत्त्व, जमिनी खालची पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आटलेल्या विहीरी, वाढत्या शहरीकरणामुळे बदलत जाणारी भूरचना, त्याबरोबर नाहिसे होत जाणारे विहीरींसारखे घटक, आटलेल्या विहिरींमध्ये साठत जाणारा कचरा हे सगळं लक्षात घेऊन या कलाकारांनी तेथे हस्तक्षेप केला. इन्स्टलेशन, फोटोग्राफी आणि परफॉर्मन्स या माध्यमांतला हा कलाविष्कार तिथल्या स्थानिक लोकांच्या संवादातून घडत, उलगडत गेला. वर्षानुवर्षे सामूहिक स्मृतीचा भाग असलेल्या पण बदलत्या सांस्कृतिक व्यवहारात वापरातून बाद ठरलेल्या विहीरीसारख्या फॉर्मवर काम करण्यातून कलाकारांनी तिथल्या जगण्याशी, लोकांची स्वप्नं, आकांक्षा, भीती यांच्याशी त्यांचा मेळ घातला. इथं विहीर ही एक प्रयोगशाळा बनली आणि कलाकारांना आपले प्रयोगशील मार्ग चोखाळायला वाव मिळाला. एवढंच नव्हे तर या सारख्या प्रयोगशील कलाव्यवहाराची मालिकाच या शहरात या काळात आणि त्यापुढे सुरू झाली आणि बंगलुरू शहराने समकालीन कलाव्यवहारात अशा सामूहिक कला प्रयोगांनी पुढच्या दशकात मोलाची भर घातली.


छायाचित्र सौजन्य: जॉन देवराज आणि सी. एफ. जॉन
पूर्वप्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, पुणे (मार्च २०१६) 



किचन डिबेट अर्थात धुलाई यंत्र, फ्रीझर आणि इतर...



मॉस्को इथं १९५९ साली भरलेल्या अमेरिकन नॅशनल एक्झिबिशनच्या दरम्यान अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि सोविएत रशियाचे नेते निकिता ख्रुश्चेव यांच्यात जगप्रसिद्ध 'किचन डिबेट' घडले होेते. भांडवलशाही आणि साम्यवादी या परस्पर विरूद्ध विचारसरणींचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय नेत्यांमधला हा वाद होता. पण त्यातली गंमतीची गोष्ट अशी की हा वाद घडला या प्रदर्शनातल्या आधुनिक स्वयंपाकघराच्या प्रतिकृतीसमोर. निक्सन यांचा दावा होता की यातली सर्व यंत्रं ही आधुनिक जगाची साक्ष देणारी आणि भरपूर अन्न पुरवठा असलेल्या त्यांच्या देशात अन्न प्रक्रिया सहजतेने करता यावी यासाठी विकसित करण्यात आलेली ही यंत्रं होती. ख्रुश्चेव यांनी 'तोंडात घास घालून तो घशातून खाली ढकलणारे यंत्र तुमच्यापाशी नाही काय?' असे चेष्टेने विचारत चांगल्या जगण्यासाठी इतक्या यंत्रांची गरज नाही असे सांगितले होते. शीत युद्धाच्या पार्श्वभूमीवर तो वाद जगभर गाजला आणि शीत युद्धाच्या काळातील एक महत्वाची घटना म्हणून इतिहासात याची नोंद झाली. पण या सगळ्याचा समकालीन कलेशी काय संबंध असा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे. स्वयंपाकघरासारख्या बिन-महत्वाच्या समजल्या गेलेल्या घरातील जागेतील वस्तू प्राजक्ता पोतनीस ही मुंबईतील कलाकार कलापटलावर आणते. त्यात दडलेले संदर्भ आणि आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण, आर्थिक-सामाजिक रचना यातले ताणे-बाणे ती आपल्या कलाकृतीतून बाहेर आणण्याचा प्रयत्न करते. एकीकडे घरातल्या साध्या वस्तूंना ती आपल्या कलाकृतीतून मांडते पण त्याचबरोबर, ती त्यांना राजकीय, एेतिहासिक घटनांची रूपकं म्हणून आपल्यासमोर उभी करते. घरगुती वापराच्या वस्तू आणि उपकरणं, त्यांचा आपल्या जगण्यातला वापर, त्यांचं स्थान, बदलती उपभोगवादी जीवनशैली आणि त्याचबरोबर बदलत जाणारी या वस्तूंची रूपं, त्यांचं टाकाऊपण-टिकाऊपण यातून घडत गेलेली काही रेखाचित्रं, छायाचित्रं आणि मांडणी-शिल्पं प्राजक्ता पोतनीस यांच्या प्रोजेक्ट८८ या मुंबईतील कलादालनात गेल्या महिन्यात भरलेल्या एकल प्रदर्शनात पाहायला मिळाली


किचन डिबेट, मॉस्को



व्हेन द विंड ब्लोज, प्रोजेक्ट८८, मुंबई


या सगळ्याची सुरूवात नक्की कशी आणि कुठे झाली? एखादा कलाकार एकल प्रदर्शन करतो तेव्हा नेमकी काय प्रक्रिया घडते? एक पक्की वेळ सांगता येत नसली तरी साधारणपणे त्या प्रक्रियेला कधी सुरूवात झाली ते मागे वळून पाहाता येतच. प्राजक्ताच्या या प्रदर्शनाची एका प्रकारे सुरूवात झाली ती तिच्या दोन वर्षापूर्वीच्या बर्लिन येथील रेसिडन्सीमध्ये. दैनंदिन जगण्यातल्या वस्तू हा पूर्वीपासून तिच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. पण बर्लिनमध्ये असताना कामानिमित्तच्या संशोधनात तिला वर उल्लेखलेल्या 'किचन डिबेट' विषयी माहिती मिळाली. बर्लिनमध्ये राहात असल्यामुळे दैनंदिन वस्तू आणि त्यांचा शीतयुद्धाच्या संदर्भातील अर्थ तिने शोधायला सुरूवात केली. याच अनुषंगाने पुढे विचार प्रक्रिया चालू असताना कोची बिनालेच्या प्रदर्शनातील तिची कलाकृती आकाराला आली. तिच्यासाठी स्वयंपाकघर ही फक्त जेवणा-खाणाची जागा नव्हती तर जुन्या-नव्या मूल्यांच्या घर्षणातून आकाराला येणाऱ्या वाद-संवादाचं, नातेसंबंधांसाठीचं ते अवकाश होतं. एकीकडे, जांभ्या दगडावर स्वयंपाकघरातील जुन्या, वापरात नसलेल्या साधनांचे ठसे कोरलेले होते. तर दुसरीकडे, भिंतीवरच्या प्रक्षेपित केलेल्या प्रतिमा धुलाई यंत्र आणि ग्राइंडरची गरगर एकेक फ्रेमने दाखवित होता. आवर्तनात चालू असलेल्या जुन्या स्लाइड-प्रोजेक्टरचा क्लिक-क्लिक आवाज दैनंदिन जगण्यातला नित्यक्रम, तोचतोचपणा, त्यातलं अडकलेपण अधोरेखित करत होता. तसंच, बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे सार्वत्रिक झालेल्या उपभोगवादी जीवनशैलीकडेही आपलं लक्षं वेधतात. रेफ्रिजरेटरच्या वरच्या कप्प्यात ठेवलेला फ्लॉवरचा मोठा गड्ड्याची प्रतिमा हा अनेक गोष्टींकडे संकेत करते. फ्लॉवरचा गड्डा हा भूगर्भात घेतल्या जाणाऱ्या अणुबॉंबच्या चाचण्यांकडे संकेत करतं. या गड्ड्याच्या आकार-साधर्म्यामुळे अणुबॉंबच्या स्फोटानंतर तयार झालेल्या ढगाच्या आकाराची आठवण होते आणि त्याचबरोबर जेनेटिकली मॉडिफाइड अन्नपदार्थ हे जगाला सध्या भेडसावणाऱ्या समस्येवरही भाष्य करते.

हे सगळं सविस्तरपणे लिहिण्याचं कारण की सध्याच्या तिच्या 'व्हेन द विंड ब्लोज' या एकल प्रदर्शनात हे सगळे संदर्भ एकत्र येतात, विस्तारत जातात आणि शक्याशक्यतेच्या सीमेवर प्रेक्षकांना उभं करतात. ती आपल्या कलाकृती निर्माण करताना दैनंदिन जीवनातल्या वस्तूंबरोबरच एेतिहासिक दस्तावेजही संदर्भ म्हणून वापरते. कलाकृती या केवळ उत्स्फुर्ततेतून नव्हे तर पुरेसा अभ्यास, संशोधन आणि चिंतन यातून निर्माण होत असतात त्यामुळे प्राजक्ता सारखे समकालीन कलाकार या माध्यम, घाट याबरोबरच या अभ्यासालाही आवश्यक ते महत्व देताना दिसतात. तिची फिकट, वॉटरकलरमधली रेखाचित्रं करड्या रंगछटा दर्शवितात. स्थिर चित्रणावर भर देत प्राजक्ता त्यातूनही टेबल फॅन, तवा, पिळलेला कपडा, खोलीतला रिकामा कोपरा, ट्युबलाईट अशा दैनंदिन जीवनातल्या वस्तूंच्या प्रतिमा रेखाटते. या रेखाटनातून अवकाशात तरंगणाऱ्या या वस्तू-प्रतिमांचे तरल आकृतीबंध आकाराला येतात. अर्थात, हे करताना प्राजक्ता त्या दस्तावेजात अडकून न पडण्याची काळजी ही घेते. या अभ्यासातून पुढे आलेली माहिती ती तिच्या कलाभाषेत अत्यंत संवेदनशीलपणे स्वीकारते, त्यांना सजगपणे एकजीव करत आपल्यासमोर मांडते. 'व्हेन द विंड ब्लोज' हे प्रदर्शनाचं शीर्षक याच नावाच्या ब्रिटीश ग्राफीक नॉवेलवरून घेतलं आहे. ही कथा आहे इंग्लंडच्या शांत गावात राहाणाऱ्या एका जोडप्याची आहे. अणुबॉंबचा हल्ला होऊ शकतो म्हणून त्यांना तयारीत राहाण्याचे आदेश आहेत. पण प्रत्यक्ष हल्ल्याची घोषणा झाल्यावर मात्र ते दैनंदिन रगाड्यात इतके गुरफटलेले असतात की त्या प्रसंगाचं गांभीर्य त्यांच्या तत्काळ लक्षातच येत नाही

स्टिल लाइफ | २०१४

 

कॅप्सूल ५०४ | २०१६



'कॅप्सूल' या फोटो-मालिकेत ती अत्यंत साध्या वाटणाऱ्या फ्रीजरचे अंतरंग दाखवते. मुंबईसारख्या किनारपट्टीवरच्या शहरात बालपण घालवताना फ्रीझरमधला बर्फच तेवढा प्रत्यक्षात पाहिलेला. हा लहानसा फ्रीजर तिच्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून मात्र एखाद्या भव्य लॅंडस्केपसारखा आपल्यासमोर उभा राहातो. त्यात खोलवर शिरताना अनेक अर्थ हळूहळू उमगत जातात. ही छायाचित्रं असली तरी त्यांची रचना एखाद्या मांडणी-शिल्पाप्रमाणे आहे. त्यात कुकरच्या शिट्टीपासून मिक्सरच्या पात्यांपर्यंत आणि अंड्यापासून लाइटर पर्यंतच्या अनेक वस्तू, बर्फाचे डोंगर, त्यात शिरणारा प्रकाश हे सगळं तिने रचलेलं आहे. फ्रीझरमध्ये साठलेलं बर्फ शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीचं रूपक ठरतं तर त्यातला रचलेल्या बर्फाळ प्रदेशात लाइटर एखाद्या रणगाड्याच्या नळीप्रमाणे तर मिक्सरची पाती लढाऊ विमानाच्या अवशेषांप्रमाणे भासतात. त्यामुळेच नेहेमीच्या वस्तू ठेवलेल्या असूनही ही लॅंडस्केप्स अनोळखी आणि अस्वाभाविक दिसतात. या राजकीय संदर्भाबरोबरच रोजचे आणि वैयक्तिक संदर्भही आपल्याला विसरता येत नाहीत. नामशेष होत जाणारी जुन्या मिक्सरची पाती आणि खटक्यावर सुरू होणाऱ्या शेगड्यांमुळे स्वयंपाकघरातून गायब होत चाललेला लाइटर हे ही संदर्भ या कलाकृतींना आहेतच. हा फ्रीजर हे आपल्या स्मृतीकोशांकरिता रूपक म्हणून इथं येतं. काही स्मृती या अशा गोठवता येतात का? तसं केलं की त्यांचं काय होतं? त्या फ्रीजर मधून त्यांना बाहेर काढलं की काय होईल? इतर अन्नपदार्थांप्रमाणेच त्या कदाचित सडू लागतील आणि नष्ट होतील काय? हे कायमस्वरूपी न टिकणं आणि त्या ऱ्हासाच्या प्रक्रियेची सुरूवात होणं हे ती गॅलरीच्या पांढऱ्या भिंतीवरच्या रंगाच्या निघणाऱ्या पोपड्यांनी दर्शविते. त्या भिंतीवरच्या रंगांच्या थरात कितीतरी आठवणी गाडलेल्या आहेत, भूतकाळातील वेदना-संवेदना त्यात साठलेल्या आहेत. रंगांच्या पापुद्र्यातून आणि भेगाळलेल्या भिंतीतून त्यांच्या पर्यंत आपल्याला पोचता येतं का? की या पापुद्र्यांच्या अंतर्वलनातून निर्माण होणारे घाट हे सर्व आच्छादून टाकतात? असे अनेक विचार हे बघताना मनाला स्पर्शून जातात.

यानिमित्ताने एक महत्वाची गोष्ट घडताना दिसते ती म्हणजे रोजचं जगणं आणि त्यात अंतर्भूत असलेलं पण सहजपणे लक्षात न येणारं असं राजकारण. या राजकारणाचे पडसाद या स्वयंपाकघरात, त्यातल्या वस्तूंमध्ये सहजपणे पडताना दिसतात. अशा राजकीय आणि खासकरून लष्करी प्रक्रियेतून उदयाला आलेली अनेक तंत्र ही नकळत आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनतात. मायक्रोवेव्ह किंवा टेफ्लॉनचं आवरण असलेले तवे हे मध्यमवर्गात सर्रास वापरली जाणारी उपकरणं. त्यांचं तंत्रज्ञान मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या रडार यंत्रणा उभारणीच्या आणि उष्मारोधक पदार्थ तयार करण्याच्या प्रयोगातून विकसित झालं, हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. ठराविक भूभागातील माणसांना लक्ष्यवेधी पद्धतीनं मारणं यासाठी जे तंत्र वापरलं गेलं तेच तंत्र माणसांच्या जगण्याला आवश्यक असलेलं अन्न शिजवू शकतं ही जाणीवच मुळात अस्वस्थ करणारी आहे. नेमकी हीच अस्वस्थता प्राजक्ता तिच्या कलाकृतीतून टिपते. स्वयंपाकघर हा घरातील अतिशय खाजगी असा कोपरा. पण त्यात सार्वजनिक पटलावरचं राजकारण असं सहजतेनं प्रवेश करतं. आपल्या खाण्याच्या, स्वयंपाकाच्या सवयी, पद्धती यातून घडत जातात आणि याच प्रक्रियेतून आत-बाहेर, खाजगी-सार्वजनिक यातल्या सीमारेषा धूसर बनत जातात.

छायाचित्र सौजन्य: प्राजक्ता पोतनीस आणि प्रोजेक्ट८८, मुंबई
पूर्व प्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, पुणे | मार्च २०१६

सामाजिकतेला भिडणारा कलाकार: तुषार जोग



जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरु झाल्यावर म्हणजे साधारण नव्वदोत्तरी पिढी दृककलॆच्या संदर्भात काही विशिष्ट भूमिका बजावताना दिसते का? या दशकात कलाकार म्हणून तुमची जडण-घडण कशी झाली?

१९९० नंतर परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. युनायटेड कलर्स अॉफ बेनेटनची चकचकीत जाहिरात मल्टिकल्चरलिझमचा बुरखा पांघरून आली असली तरी त्यामागचं शोषण, कामगारांची पिळवणूक, स्थानिक कापडउद्योगांवर आलेली गदा हे सगळे मुद्दे नजरेआड करता येण्यासारखे नव्हते. त्या काळात जाहिरातींनी बाजारपेठेचा आणि लोकांच्या मनाचा कब्जा घेतला. सतत त्या प्रतिमा आपल्यावर आदळू लागल्या, टीव्ही, होर्डिंग, जाहिराती, पेपर...उदारीकरणानी सगळ्यांनाच उपभोक्ता बनवून टाकलं मग तो कुठल्याही आर्थिक स्तरातला का असेना. गावातल्या तरूणांना कोका कोलाच्या जाहिरातीत आणून राष्ट्रवादातून याला होणारा विरोधही हाणून पाडला. सतत दिसणाऱ्या, उपलब्ध असणाऱ्या या प्रतिमा लोकांच्या जीवनाचा भाग बनल्या, नाही त्यावर सत्ता गाजवू लागल्या.

याउलट, ललितकला (चित्र, शिल्प, ) कायमच लोकांपासून अंतर राखून राहिल्या. त्या लोकांसाठी दुर्बोध तर होत्याच पण एका ठराविक उच्चभ्रू लोकांपर्यंतच मर्यादितही राहिल्या. पॉप्युलर प्रतिमा जरी कलाकारांनी वापरल्या तरी त्या त्यांच्या मूळ संदर्भापासून दुरावतात, एक्झॉटिक बनतात. सौंदर्याचं राजकियीकरणाला एक मर्यादा असते, ती मर्यादा कलाकारच स्वतःवर घालून घेतात. जागतिक स्तरावर एका ठराविक पद्धतीचंच काम दाखवलं आणि वाखाणलं जातं.

अोपन सर्कलच्या माध्यमातून यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यात कलाकार, कला-विद्यार्थी, अभ्यासक, कार्यकर्ते यांना एकत्र आणून कार्यशाळा, अभ्यास शिबिरे, प्रदर्शनं भरवली. यातून संवाद सुरू व्हावा हा उद्देश होता. कलाकार म्हणून लोकांशी, आयुष्यातल्या प्रत्यक्ष गोष्टींशी कसं जोडून घेता येईल त्याचाहा शोध होता. त्यात पुढे काही कला-हस्तक्षेप केले. नवीन आर्थिक धोरण, कापडगिरण्या बंद पडणं, धर्मांधता, ध्रुवीकरण, या सगळ्याला हात घातला. गुजरात दंगलीनंतर 'रिक्लेम आवर फ्रीडम' ही मोहिमही सार्वजनिक ठिकाणी राबवली. यातून कलाकारांना या मुद्दयांवर लोकाशी संवाद साधता आला.

या सगळयातून माझी राजकीय समज तयार झाली आणि त्याव विचारातून मी कला निर्मिती सुरू ठेवली. या अनुभवातून हे जाणवलं की राजकारणाचं सौंदर्य बदलणं, निश्चित करणं गरजेचं आहे...



कला निर्मिती करतानाची तुमची प्रकिया काय असते, ते सांगू शकाल का? विविध माध्यमातून काम करताना तुमची भूमिका काय असतॆ, तॆ सांगाल काय?

माझा कलाव्यवहार सीमांतीकरण, शहरीकरणामुळे झालेले विस्थापन किंवा शासनाने आणलेली 'विकासा'ची प्रारूपे या सारख्या मुद्द्यांना हात घालताना त्यातील स्थानिक आणि समकालीन राजकारणाचा शोध घेऊ पाहातो. माझं काम यातला असमतोल विकास आणि त्यामुळे उद्भवणारी सामाजिक-सांस्कृतिक बिघाड याला भिडण्याचा प्रयत्न करते. यातून ते चळवळ, जन-कला, विद्रोह आणि हस्तक्षेप यासारखे प्रांत व्यापू पाहाते. कला हे माझ्यासाठी सामाजिक राजकीय बदलाचे माध्यम आहे त्यामुळे त्याकरिता आवश्यक तो संवाद साधणे, चर्चा करणे किंवा त्या मुद्द्याला दृश्यमानता मिळवून देणं हे माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. जरी मला त्यातली तरलता, काव्यात्मकता भावत असली तरी माध्यमाला इथं दुय्यम स्थान मिळते.


कलेचा बाजार, कलादालनातील कलाव्यवहार आणि सामाजिक भान असलॆली कला निर्मिती यातला समन्वय आणि समतॊल कसा राखता? तॆ एकमॆकाला पूरक असतात की परस्परविरॊधी भूमिका बजावतात, तुम्हाला काय वाटतॆ?

आपली भूक किती आहे ते आपण ठरवायचं...आपली भूक जास्त असली तर आपल्याला मार्केटच्या हातात हात घालून तिला मैत्रीण बनवलं पाहिजे, अर्थात तिच्या गरजा पुरवल्या पाहिजेत... मग कामाच्या 'एडिशन्स' होतात, 'असिस्टंट्स'ची फौज जमवावी लागते... आणि स्मॉल, मिडियम, लार्ज आणि कधी कधी एक्सएक्सएक्सएलच्या आकारात 'उत्पादन' करावं लागतं.

गॅलरीज गरजेच्या आहेत कारण कलाकाराला पण जगण्यासाठी पैसा लागतो, ते अगदी साहाजिक आहे. पण आत्ता मुद्दा असा आहे की सध्या जे कलाकार आणि गॅलरी यांचं नातं आहे ते असमतोलाचं आहे. पण आवश्यक त्या कलाप्रकारांना पाठिंबा देताना, त्यांची जोपासना करताना किंवा त्या कलाकृती आणि ते कलाकार टिकून राहावेत, वृद्धिंगत व्हावेत याकरिता त्यांची बाजारपेठ 'तयार करताना' दिसत नाहीत. याउलट, ज्यांच्या कामाला बाजारात भाव आहे किंवा जे कलाकार बाजारपेठ लक्षात घेऊनच काम करतात अशाच कलाकारांच्या कलाकृतींची प्रदर्शनं मांडली जातात.

अर्थात, गॅलरीज काही धर्मादाय संस्था नाहीत, शेवटी तो व्यवसायच आहे... सकस सांस्कृतिक क्षेत्र उभं करणं, त्याची जोपासना करण्याकरिता योगदान देणं, ते जतन करणं यासाठी लागणारी तळमळ त्यांच्याकडे असावी लागते. पण अलिकडच्या काळात या गॅलरीज आणि प्रॉपर्टी डिलर्स यांच्या काही फारसा फरक उरलेला नाहीये, दोघंही प्रति चौरस फुटाच्या दरानी गोष्टींची खरेदी-विक्री करत असतात

 


मुंबई इथं भरलॆल्या वर्ल्ड सॊशल फॊरमच्या सांस्कृतिक समिती मध्यॆ तुम्ही महत्वाची भूमिका बजावलीत, तॊ उपक्रम नक्की काय हॊता? मुंबईच्या सार्वजनिक अवकाशाशी त्यातून कलाकार कसॆ भिडलॆ? त्याची फलनिष्पत्ती काय, असॆ तुम्हाला वाटतॆ?

मी आणि मधुश्री दत्त २००४ मध्ये मुंबईत भरलेल्या डब्ल्यूएसएफच्या सांस्कृतिक समितीचे निमंत्रक होतो. जवळपास २५०० कलाकारांचा समावेश यात आम्ही केला होता. राजकीय अंगानी कला आणि संस्कृती या दोन्हीकडे पाहिलं जावं, कलेमार्फत आजच्या चर्चाविश्वात हस्तक्षेप करता यावा आणि सांस्कृतिक व्यवहार हा राजकीय एकत्रिकरणाचा एक पाया ठरावा या उद्देशानं याची योजना आखली होती. यात विद्रोही कलेचा तर समावेश होताच पण त्याचबरोबर केवळ संकल्पनात्मक पातळीवर नव्हे तर सांस्कृतिक व्यवहाराच्या पातळीवर कलाकृतींच्या राजकीय क्षमता आेळखल्या जातील अशी भावनिष्ठा निर्माण करणं हाही होता. कला आणि लोक यांच्यातील दरी कमी व्हावी, राजकीय कला लोकसहभागातून घडवता यावी आणि त्याकरिता अवकाश तयार करता यावं असंही आम्हाला वाटतं होतं. यात मग प्रदर्शनाच्या जागा निवडणं, त्यांच्या विषयाची निवड, कार्यक्रम आखणं, व्यासपीठं उभी करणं हे सगळंच आम्ही केलं. यात सुधीर पटवर्धन, नवजोत अल्ताफ, नलिनी मलानी, शकुंतला कुलकर्णी यासारखे स्थानिक कलाकार आणि विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईत लोकलवर चित्रं काढण्याचा कार्यक्रम हाती घेतला. 'होम विथ नो वॉल्स' या विषयावर जगभरातून कलाकारांनी 'कॉपी लेफ्ट' कलाकृतींच्या प्रतिमा पाठवल्या, त्या विविध रूपांत प्रदर्शित करण्यात आल्या. त्याचबरोबर, केबिन बॅगेज, बगदाद!बगदाद!, बॉम्बे/बम्बई/मुंबई यासारखी प्रदर्शनं पण आयोजित केली होती.

आम्ही ज्या उद्देशानी हा घाट घातला होता त्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी ठरलो. कार्यक्रमाची भव्यता, त्यांची वैविध्यता, मांडणी, त्यातून उभं राहिलेलं वातावरण, राजकीय प्रतिनिधित्व या सगळ्यातूनच डब्ल्यूएसएफला एका वेगळ्याच उंचीवर आम्ही पोहोचवू शकलो. त्यानंतर, २००५ मध्ये पोर्तो अल्जिर, ब्राझिल आणि २००७ च्या नेरोबीमधल्या डब्ल्यूएसएफमध्येही माझा सहभाग होता. तिथे मी एक आंतरराष्टट्रीय कलाकारांचा कॅंप क्युरेट केला होता, त्या कलाकारांनी उद्घाटनाच्या रॅलीसाठी कलाकृती बनवल्या आणि नंतर मी स्थानिक कलाकारांबरोबर देखील काम केलं.


'लॉस्ट अॅंड फाऊंड वॅल्यूज(?) अॉफ डेमॉक्रसी' या मुंबईच्या उपनगरी रॆल्वॆ आणि छत्रपती शिवाजी स्थानकावर सादर कॆलॆला कला प्रकल्प काय हॊता
 
कळत नकळत अनेक गोष्टी आपण गमावत जातो पुढे जाताना. माणूस म्हणून आपण काहीतरी गमावतो का? आपण ते गमवतो की नसतंच ते कधी आपल्याकडे? कुणाला स्वातंत्र्य गावलंय का? कुणाला समता हाताशी लागलीय का? आणि न्याय? आणि प्रतिनिधित्व कुठाय?

यात मी विद्यार्थी आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या शेल्टर होममधल्या मुलांबरोबर काम केलं. सीएसटीला घेतलेल्या दोन दिवसाच्या कार्यशाळेत ही मुलं सहभागी झाली होती. त्यात त्यांची या शहराबद्दलची काय कल्पना आहे, ते कसं असावं असं त्यांना वाटतं किंवा त्यांच्या आजबाजूला, आयुष्यात कसली उणीव आहे याची रेखाटनं त्यांनी स्क्रॅप बुकमध्ये केली. त्यांनी बनवलेली चित्र, कोलाजेस यातून ते निरागसपणे स्वातंत्र्य, समता, प्रतिनिधित्व आणि न्याय याविषयी प्रश्न मांडत होते. यातल्या काही वह्यांमध्ये रिकाम्या पानांवर मी (युनिसेलने) काही चित्रांची भर घातली. हा हस्तक्षेप आणि इतरांनी बनवलेली चित्रं यामुळे त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त झाला. त्यावर संपर्काचे काहीतरी नंबर खरडून त्या वस्तू लोकलच्या डब्यांमध्ये आम्ही सोडल्या किंवा 'हरवल्या'. त्या प्रवाशांना 'सापडल्या' आणि काहींनी त्या परत केल्या, त्यांचं प्रदर्शन सीएसटी स्टेशनवर भरवलं आणि ते सगळ्यांसाठी खुलं होतं.




सौंदर्यशास्त्र आणि राजकीय जाणिवा यांची सांगड तुमच्या कला व्यवहारातून कशी घालता? या संदर्भात मोटरसाइकलवरून कॆलॆला मुंबई तॆ चीन (वाया सरदार सरॊवर आणि थ्री गॉर्जॆस) हा प्रवास/परफॉर्मन्स या बद्दल आम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडॆल...

२००० मध्ये मी कलाकृती तयार करणं मी बंद केलं, ते जवळपास दोन वर्षं. माझ्या मास्टर्स नंतरचं म्हणजे जवळपास दहा वर्षाचं काम मी नष्ट केलं, अगदी त्याच्या डॉक्युमेंटेशन सहित. कला ही स्वांतसुखाय आहे आणि तिचा समाजाला काहीच उपयोग नाही, तिची काही भूमिका नाही असं मला वाटायला लागलं. वेगवेगळ्या संघटना, ट्रेड युनियन यात मी सहभागी व्हायला लागलो. मोर्चे, सभांना जायचो, बॅनर, पोस्टर्स किंवा पत्रक बनवून द्यायचो. यातून समजात काहीतरी बदल घडवून आणण्यात आपण वाटा उचलू शकू असं वाटत होतं. पण त्यातही एक प्रकारची अस्वस्थता यायला लागली. मी जे करतोय ते पुरेसं नव्हतं, मोर्चात फक्त घोषणाबाजी करून काहीच साधलं जात नव्हतं...म्हणजे मी निषेध मोर्च्यांना कमी लेखतोय असं नाही पण निषेधाचा तो फॉर्म मला पुरेसा योग्य वाटत नव्हता.

...म्हणजे तुम्ही चर्चगेट स्टेशनच्या बाहेर बॅनर किंवा फलक धरून उभे असता पण तिथले लोक मात्र ट्रेन पकडण्याच्या गडबडीत असतात, त्यांना घरी पोचायची घाई असते...तुम्ही वाटलेली पत्रकं कुठेतरी रस्त्याच्या कडेला, प्लॅटफॉर्मवर पडलेली असतात... लोक तुम्ही काय म्हणताय, का जीव खाऊन ओरडताय ते साधं एेकायला, वाचायला, बघायलाही तयार नसतात. परत कुणीतरी, काहीतरी इथं येऊन बोंबा मारतंय, कसल्यातरी मागण्या करतंय, त्याबद्दल कोणाला काय पडलंय...पण या गलक्यामुळे त्यांची ५.१७ ची विरार लोकल चुकणार म्हणून ते वैतागलेले असतात.

फॉर्म चुकत असला तरीपण ते मुद्दे मात्र महत्वाचे होते, आहेत. मला ते इतरांपर्यंत पोचवायचे होते, त्यावर चर्चा घडवून आणायची होती. मला सगळ्याची उत्तरं माहिती नसतील पण मला प्रश्न पडत होते आणि ते विचारणं फार गरजेचं होतं. आणि मला वाटलं हे कलेच्या माध्यमातून साधता येईल कारण मग तिथे बघणारे लोक तर असतील... ती दोन वर्षं मी ओपन सर्कल बरोबर काम करतच होतो. पण आमचा कार्यक्रम हा मुख्यत्वे कला रस्ते, पार्किंग, होर्डिंग्स अशा ठिकाणी आणून राजकारण आणि सौंदर्यशास्त्राची सांगड घालणं हा होता. २००२ पासून मी ज्या कलाकृती बनवल्या त्यांचा उद्देश राजकारणाचे सौंदर्यीकरण आणि सौंदर्यशास्त्राचं राजकियीकरण करणं हा होता. वॉल्टर बेंजामिन त्यांच्या 'द वर्क अॉफ आर्ट इन द एज अॉफ मेकॅनिकल रीप्रॉडक्शन' (१९३५) या लेखात म्हणतात त्या अर्थी नव्हे, तर बोरिस ग्रॉइस त्यांच्या 'आॅन आर्ट अॅक्टिविजम' (२०१४) या लेखात मांडणी करतात त्या अर्थी राजकारणाचं सौंदर्यशास्त्र बदलणं - सौंदर्यशास्त्राचा निष्फळपणा आणि त्याचबरोबर राजकियीकरण - म्हणजे सौंदर्यशास्त्राचा वापर राजकीय ध्येयासाठी करणं, एक राजकीय आरेखन म्हणून त्याकडे पाहाणं.

त्यानंतरच्या माझ्या कलाकृती या सौंदर्यशास्त्राच्या सापेक्षतेतून निर्माण होत गेल्या, यात एखाद्या मुद्द्याच्या किंवा विषयाच्या प्रतिरूपणापेक्षा सामाजिक संबंध, देवघेव हे कलानिर्मितीचा पाया बनत गेले. यातून कधीकधी मग त्याची परिणिती लोकसहभागातून केल्या गेलेल्या 'लॉस्ट अॅंड फाऊंड वॅल्यूज(?) अॉफ डेमॉक्रसी' यासारख्या प्रकल्पांमध्ये झाली जिथे लोकांबरोबर काम करून मी कलाकृती बनवल्या. याचसारखे इतर प्रकल्प म्हणजे हायपोहायड्रो-हायपरहायराइज, लॅमेंट फॉर स्पॅरोज, विंडो क्लिनर्स प्रोजेक्ड इन लंडन, आर यू अवेक, वॉशिंग डर्टी लिनन, इत्यादि.

२००१ मध्ये मी नर्मदा बचाव आंदोलनाच्या संपर्कात आलो आणि तेव्हापासून मी या जनचळवळीचा कट्टर समर्थक आहे. 'राइडिंग रोसिनान्ते - बॉम्बे टू शांघाई वाया सरदार सरोवर अॅंड द थ्री गॉर्जेस' हा प्रकल्प एक परफॉर्मन्स किंवा कृती होती. त्याचा उद्देश होता नर्मदेवरची सरदार सरोवर, ओमकारेश्वर आणि महेश्वर धरणं, तिबेटमधली ग्यानत्से आणि यान्द्रोक तलाव, आणि चीनमधलं थ्री गॉर्जेस धरण यामुळे प्रभावित झालेल्या लोकांना भेटणं...प्रत्यक्ष परिस्थती पाहून त्याबद्दल त्या संपूर्ण कालावधीत ब्लॉग चालवणं, 'प्रजासत्ताक' या संकल्पनेचं परिक्षण करणं, नागरिकांना खरंच निर्णयाचा अधिकार आहे का, कितपत आहे, 'सर्वांच्या फायद्याचे' मध्ये नक्की कुणाचा समावेश होतो याचा तपास करणं...असले मोठाले 'विकास' प्रकल्प खरंच समन्यायी असतात का की समाजातील दुर्बल घटकांचे सक्षमीकरण करतात की त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवतात याचा शोध घेणं...


कोची बिनालेच्या दरम्यान तुम्ही तेथे प्रदर्शित कॆलॆल्या कामाबद्दल: तुम्ही कशाप्रकारॆ तिथल्या सामाजिक घटकांबरॊबर संवाद साधलात आणि त्यातून सहयॊगिक कलानिर्मिती कशाप्रकारॆ घडली?

'वॉशिंग 'आर्टी लिनन' हा माझा प्रकल्प 'क्रिटिकल जंक्चर' या कोची बिनाले दरम्यान भरलेल्या प्रदर्शनाचा भाग होता. हे प्रदर्शन भारत आणि पोलंड या दोन देशांच्या सहयोगातून भरलं होतं. यातून मी धोब्यांच्या सहकारी तत्वावर चालणाऱ्या गटाला या प्रदर्शनातून स्थान मिळवून द्यायचा प्रयत्न केला. वन्नार संघम ही सहकारी संघटना आहे जी धोबीखाना चालवते. जवळपास ६० धोबी रोज १०००च्या वर लिननचे चादरी, पडदे धुतात. कोची हे पर्यटन स्थळ असल्यामुळे हे मुख्यकरून तिथली होटल्स आणि होम स्टे मधून येतात. इथलं काम पारंपारिक पद्धतीनं चालतं. पाण्याचे हौद बांधून त्यात उभे राहून धोबी रोज कपडे धुतात. दिवसाचे बारा-बारा तास राबतात. आणि हे सगळं काम अतिशय शारीरिक कष्टाचं असतं. यामुळे त्यांना अनेकदा शारीरिक व्याधींना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे वन्नार संघम कधीपासून धोबीखान्याचं यांत्रिकीकरण करायच्या प्रयत्नात होते पण पुरेशा निधी अभावी ते जमत नव्हतं.

यातली एक गोष्ट मात्र चांगली होती की कोअॉपरेटिव असल्यामुळे त्याचा फायदाही त्यांना होतो. एकत्र विचारविनिमय करून निर्णय घेतले जातात, एकत्र बॅंकेचं खातं आहे, समिती आहे. ही व्यवस्था जर मोडली तर छोट्या-मोठ्या लाॅंड्री त्यांची जागा घेणार. आणि आता तरूण मंडळी बरीचशी बाहेर पडलीयेत त्यामुळे धोबीखाना मध्ये बहुतकरून मध्यमवयीन किंवा वयस्क लोकच काम करतात. त्यात एक भावनिक धागा तर आहेच पण अडीअडचणीला संघम त्यांना मदतही करतो.

माझ्या प्रकल्पात मी वन्नार संघम बरोबर काम केलं. मी म्हणजे माझी नकली कंपनी युनिसेल. प्रदर्शनातली जागा त्यांना लिनन वाळवण्यासाठी दिली. यातून त्यांना एक प्रकारची दृश्यमानता लाभावी असा एक उद्देश होता. आणि हा प्रकल्प बिनालेच्या काळात केल्यामुळे बहुतेक करून ते लिनन हे कला पर्यटकांचेच होते. यातून धोबी खान्यासाठी निधी उभा करण्यात आला ज्यातून त्यांनी अलिकडेच अौद्योगिकी तत्वावर चालणारी धुलाई यंत्रं आणि हायड्रो एक्स्ट्रॅक्टर तिथं बसवली.

पूर्व प्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, डिसेंबर २०१५, पुणे 
मुलाखत आणि मराठी अनुवाद: नूपुर देसाई