नाट्यावकाशातील समकालीनतेचे अन्वयार्थ




कलेच्या क्षेत्रात समकालीनतेचा विचार करताना समकालीन नाटक आणि तेही महाराष्ट्रात घडणारं समकालीन नाटक काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. समकालीनतेच्या बहुपेडी व्याख्येत चपखल बसणारं आणि समकालीनतेच्या प्रयोगशीलतेला आपलसं करणारं अलिकडच्या काळातलं लिखाण म्हणजे आशुतोष पोतदार यांची नाटके. त्यांच्या लिखाणातून ते त्यांच्या भवतालाला भिडतात, सामाजिक सांस्कृतिक भान बाळगत प्रत्ययकारी नाटकांच्या संहिता त्यांनी गेल्या दहा वर्षात मराठी नाटकाचे वाचक, अभ्यासक आणि प्रेक्षकांना दिल्या आहेत. 'वॉटरमार्कपब्लिकेशन'ने प्रकाशित केलेल्या आशुतोषपोतदार यांच्या चार नाटकांच्या दोन संग्रहात संहिता एकत्रितपणे वाचायला मिळाल्यामुळे त्यांच्यातले काही समांतर धागे व लेखकाच्या सर्जनशील प्रक्रियेतील चिंतनाचे विषय समजून घ्यायला तर मदत होतेच पण या संग्रहामुळे त्यांच्या लिखाणातील वैशिष्ट्यांचाही सापेक्षतेने विचार करता येतो. या लेखाच्या सुरूवातीला मला प्रमाणिकपणे नमूद करावंसं वाटतं की या दोन पुस्तकात छापलेल्या चार नाटकांपैकी केवळ 'F1/105' या एका नाटकाचे सादरीकरण मी प्रत्यक्षात पाहिले आहे आणि त्याबद्दल या आधी विस्ताराने इतरत्र लिहिलेदेखील आहे. या टिपणात प्रत्यक्ष सादरीकरण व त्याचे विवेचन हे मुद्दे यात विचारात न घेता मी या नाटकांचा मुख्यतः संहिता म्हणून विचार केला आहे. या पुस्तक द्वयीतला एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे संहितांसोबत दिलेली नाटकांची परीक्षणे. नाटकांच्या प्रयोगांनंतर निरनिराळ्या ठिकाणी प्रकाशित झालेली ही टिपणे या पुस्तकात एकत्रितरित्या वाचकांना वाचायला मिळतात आणि नाटकांच्या संहितांकडे पाहायचा एक दृष्टिकोन मिळण्यास मदत होते.

कसबा सांगाव, कोल्हापूर, बंगलुरू आणि पुणे अशा लेखकाच्या व्यक्तिगत प्रवासातून घडणारं असलं तरी नाटकीय काळाच्या संदर्भात ते एकरेषीय असत नाही. अनुभव वा आठवणींच्या पातळीवर ते प्रतिमारूपात आपल्या समोर उभं राहातं. त्यातून तयार झालेल्या समकालीन संवेदना, त्यातले पदर व त्या पदरांच्या घड्या एकमेकांवर येत राहातात. या संहिता वाचताना एकीकडे फॉर्मच्या प्रयोगातून रूपबंधाचं भान दिसून येतं, तर त्याचबरोबर आशयातून संदर्भचौकट स्पष्ट होत जाते. ‘पुलाखालचा बोंबल्या मारूती' मधलं मुख्य पात्र माया म्हणते, “निर्मितीप्रक्रिया भवतालातूनच आकारते.” हे अर्थात आपल्याला माहिती असलं तरी ते खऱ्या अर्थानं आशुतोषच्या नाट्यलेखन प्रक्रियेत घडताना दिसतं. एका अभ्यासकाच्या वृत्तीतून घडणारं हे लिखाण कला, संस्कृती, इतिहास, भाषा, सामाजिक आणि राजकीय मीमांसा असे अनेकविध पदर ही त्यांच्या लिखाणाची बलस्थाने ठरतात. मेट्रोपॉलिटन शहरांतून राहाणाऱ्या, वावरणाऱ्या समाजाच्या निरनिराळ्या स्तरातल्या, समुदायाच्या माणसांचे जगणे, त्यातले तणाव व विसंगती, शोषणाच्या व्यवस्था, मोकळीकीच्या रचना, आणि या साऱ्यातून लागत जाणारे अन्वयार्थ हे या नाटकांची पार्श्वभूमी ठरतात. या संहिता व त्यातील पात्रे या मार्फत नाटककार जातीपासून, भाषेपर्यंत, विकासाच्या प्रकल्पापासून उपभोगवादापर्यंत, परंपरेपासून समकालीनतेपर्यंत अनेक विषयांचा उहापोह करतात.



आधुनिकतेच्या भव्यदिव्य उभारलेल्या देखाव्यात एेतिहासिक संदर्भ, ओळखी, मानवी संबंध यांच्या पलीकडे जाऊन सुपरहायवे किंवा मॉलसारख्या '-जागा' (नॉन-प्लेसेस, मार्क ओजे १९९५) आधुनिक, संपन्न जगण्याचा आणि विकासाचा आभास निर्माण करतात. प्रचंड वेगाने जाणाऱ्या गाड्यातून ना वाटेतले रस्ते कळतात, ना गावं ना त्यांच्या खाणाखुणा किंवा चकचकीत मॉलच्या बंदीस्त भिंतीत ना काळाचे भान राहाते ना भवतालात घडणाऱ्या घडामोडींचे. अशा '-जागा' या एकप्रकारचे तुटलेपण तयार करण्यात हातभार लावतात. कोणत्याही प्रकारच्या मानवी संवादारहित असा हा व्यवहार चालत राहू शकतो किंवा असला तरी तो तात्पुरत्या आणि 'कंत्राटी' पद्धतीचा असू शकतो. अशा प्रतीकांच्या वापरातून आत्ताच्या परिस्थितीत सतत आजूबाजूला जाणवणारं एक प्रकारचं विखुरलेपण मात्र केवळ संवादातून नव्हे तर नाटकीय रूपरचनेतून देखील सशक्तपणे उजागर केले गेलेले दिसते. 'पुलाखालचा बोंबल्या मारूती' मध्ये गावातले काही आणि बाहेरून आलेल्यांचा रेसिडन्सीमधला एकत्रितरित्या सहभाग, कला आणि भवतालाचं नातं, जागतिकीकरणानंतर बदलेली विकासाची मॉडेल्स, वेगाने वाढलेली शहरं, गावातल्या शेती आणि शिक्षणापासूनचे अनेक प्रश्न, शहरी मध्यमवर्गाच्या आणि ग्रामीण लोकांच्या बदलत्या आकांक्षा यावरच्या तपशीलवार संवादातून हे विखुरलेपण, तुटलेपणाच्या जाणिवा सजगपणे पुढे आणल्या आहेत. समकालीनता शहरी-ग्रामीण, स्त्री - पुरूष यासारख्या द्वैतांच्या पलीकडे जाते किंवा त्यांना कवेत घेते. गावात चालू असलेल्या आर्ट रेसिडेन्सीतल्या कलाकारांच्या अॅक्टीविटीज मधून परंपरेबद्दलची चर्चा इथे एलकुंचवारांच्या नाट्यत्रयीतल्या एका प्रसंगाच्या निमित्ताने घडते. त्यात गतकाळाला सतत सामोरं जाण्याची प्रक्रिया यांच्या लेखनात अधोरेखित होते. मात्र इतर संहितांपेक्षा अधिक चर्चात्मकतेकडे झुकते व थेटपणाने काही मुद्दे मांडते. शहरीकरणाची प्रक्रिया आणि बदलती गावकुसं याकडे ते लक्ष वेधते. पण गाव नावाच्या गोष्टीकडे एक्झॉटिक व रम्यपणाच्या कल्पनातून बघणं, टोकाच्या दृष्टीकोनातून शहर व गाव असं द्वैत मांडणं याकडे लेखक मात्र चिकित्सकपणे बघतात. त्या ध्रुवीकरणात न अडकता त्यातली गुंतागुंत गावात येऊ घातलेल्या 'सुपरहायवे'च्या आणि त्यामुळे 'विस्थापित' होणाऱ्या बोंबल्या मारूतीच्या प्रतीकातून हाताळतात. जातीच्या उतरंडीबद्दलची चर्चा नंतरच्या टप्प्यावर येते पण सुरूवातीला स्थानिक कलेच्या उल्लेखा दरम्यान मात्र केवळ परंपरा आणि समकालीन कलाविष्काराच्या पद्धती यांच्यातल्या तणावापुरते रेसिडन्सीतल्या कलाकारांचे संवाद घडतात. त्या दोन्हीमध्ये अस्तित्वात असलेले द्वंद्वात्मक नाते मात्र नाटकाच्या ओघात बाजूला पडते. येणाऱ्या बदलाचा स्वीकार करायचा की त्याला नकार द्यायचा हे पर्याय उरतात पण त्यातून वेगळ्या पर्यायाची, अधिक सजग, समतोल साधणाऱ्या बदलाच्या पर्यायासाठीचं अवकाश अशा प्रकारच्या लेखनातून तयार होण्याच्या शक्यता आपण आजमावू शकतो का, असा प्रश्न उरतो.

आज सार्वजनिक आणि खाजगी अवकाशातला फरक धुसर होत जात असताना त्याचं प्रत्यंतर आशुतोषच्या संहितातून प्रखरपणे समोर येते. नाटकीय अवकाशाचा विचार करता 'F1/105' आणि 'आनंदभोग मॉल' ही दोन्ही नाटके मुख्यतः घराच्या खाजगी अवकाशात पार पडतात. अर्थात, हे होत असताना सार्वजनिक अवकाशातल्या घटना, सामाजिक उतरंडी, जात आणि धर्माचं राजकारण या सारख्या आपल्याला जखडून टाकणाऱ्या अनेक गोष्टी या जोडप्यांच्या खाजगी अवकाशात प्रवेश करतात. त्यांचे नातेसंबंध, विश्वास, विचार, त्यांच्या जगण्याची तत्त्वं, सवयी साऱ्यांचीच यात घुसळण होत राहाते. पण ते माणसांच्या मनोवृत्ती किंवा मानसिक आंदोलने या परीघात फिरत राहात नाही. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'आनंदभोग मॉल' हे त्यांचं रंगमंचीय अवकाशात उभं राहिलेलं पहिलं नाटक. यातलं आंतरजातीय विवाह केलेलं जोडपं त्यांच्या जाती अस्मिता विसरू शकत नाही. त्या विसंवादी जगण्यात आणि भांडणात पुन्हा पुन्हा त्यांची जात डोकं वर काढत राहाते. ब्राह्मण आणि मराठा या समाजातल्या दोन उच्च जातीय समूहांचं प्रितिनिधित्व करणारी ही पात्रं आधुनिक समाजात वावरताना जात गळून पडावी लागते याची जाणीव असतानाही त्यांच्या परंपरांचे दाखले देत राहातात, जातीवरून एकमेकांची उणीदुणी काढत राहातात, कामाच्या ठिकाणच्या जातीय राजकारणाने अस्वस्थ होत आपापल्या जातीला घट्ट धरून ठेवू पाहातात. त्यांना मूल न होणं हे जातीभेदाच्या पालिकडंच सत्य दाखवणारं प्रतीक असू शकतं तसंच ते त्यांच्यातल्या खुंटलेल्या नवनिर्मितीच्या जाणिवा वा क्षमता यांचं प्रतीकही असू शकतं. या अस्थिरतेच्या वातावरणात दोघंही त्यांचं मनःस्वास्थ्य इतरत्र शोधत राहातात. बाहेरच्या जगात तीव्र होत जाणाऱ्या जातीय अस्मिता, त्यात येत जाणारी कट्टरता, आधुनिकतेनं पूर्ण न केलेली वचन, जागतिकीकरणाच्या रेट्यात उफाळून वर येणारे जातीचे आणि धार्मिक अस्मितांचे प्रश्न हे सगळं या जोडप्याच्या संवादातून आपल्या पुढे उभं राहातं. या सगळ्यापासून दूर जाताना ते संभ्रमित अवस्थेत जातात. यात स्वप्नाळूपणातून त्यांचा नव्या जगाच्या निर्मितीची नव्हे तर अधिक गुंतागुंतीच्या शोषण व्यवस्थेचं प्रतीक असलेल्या मॉलच्या बांधणीकडे ते वळतात. प्रस्थापित मध्यमवर्गीय जाणिवांना छेद देणारी, त्यातले ताणे बाणे दाखवणारी व त्याच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाची चिकित्सा करणारी ही संहिता समीक्षेच्या दृष्टीकोनातून उजवी ठरते.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे भाषेचा. या चारही संहितांचं आकलन करताना नाटकीय अवकाशासह समकालीन भाषा समाजात काय प्रकारे काम करत असते, याचा विचार लेखकाने मांडलेला आहे. केवळ मौखिक वा संवादातील भाषा नाही तर दृश्य-अदृश्य आणि संहितांचे पदर उलगडत जाताना समजत जाणारी, आकाराला येणारी भाषा, या सर्व पातळीवर भाषेचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आशुतोषच्या नाटकातील भाषा ही एका विशिष्ट भाषिक समुदायापुरती मर्यादित न राहाता ती अधिक सार्वत्रिक रूप धारण करते. मराठी नाटकांना सवयीच्या असलेल्या भाषेपेक्षा वेगळी, शहरी वापरातली, बहुभाषिक समुदायांची, आंतरजालीय समाजमाध्यमातून तयार होत गेलेली ही संमिश्र भाषा सहजतेने त्यांची पात्रं बोलतात. 'सिंधु, सुधाकर..’ या संहितेत अलंकारिक ते आजची बोलीभाषा अशी ही तफावत प्रकर्षाने जाणवते. शंभर वर्षाच्या फरकाने झालेले भाषिक अभिव्यक्तीचे बदल, फक्त भाषेपुरते मर्यादित न राहाता जीवनशैली आणि बदलत्या सामाजिक व नातेसंबंधांच्या बदलाला देखील अधोरेखित करतात. 'F1/105' या दीर्घांकात अनेक भाषांची सरमिसळ होत जाते. निरनिराळी पात्रं निरनिराळ्या भाषिक अस्मिता जपत त्यांच्या भवतालाशी जोडून घेतात. पण त्याचबरोबर, तीच भाषा त्या भवतालात निर्माण होणाऱ्या संघर्षालाही कारणीभूत ठरते. मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी आणि अगदी तंजावरी मराठीचा वापरही यातली पात्रं सहजपणे करतात. मोठ्या शहरातल्या कॉस्मोपॉलिटन वातावरणात जगणाऱ्या या पात्रांची त्यांची भाषा ही ओळख ठरते. भाषेच्या वापरावरून त्यांची ओळख, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे स्वभाव हे नुसते ठरत जातात इतकंच नाही तर त्यातून काही वेळा आपल्या साचेबंद समजांना पुष्टीही मिळते. 'आनंदभोग मॉल' मधील भाषेचा बाज हा मिश्र आहे. शहाण्णवकुळी मराठा असलेला आणि गावाकडून शहरात आलेला पण बहुतेकवेळा प्रमाण मराठी भाषेत बोलणारा 'तो' अचानक मध्येच ग्रामीण ढंगातल्या मराठीकडे वळतो. क्वचित पण 'ती' देखील ग्रामीण ढंगात बोलून जाते. पेशाने डॉक्टर असलेला 'उच्चकुलीन' मराठा 'तो' आणि ब्राह्मण असलेली 'ती' असे दोघेही उच्चविद्याविभूषित असलेल्या त्यांच्या भाषेतला हा गोंधळ वाचकालाही जरासा गोंधळात टाकतो.




लेखकाचा नाटक, त्याचा इतिहास आणि नाटकांची अर्काईव्स यातला अभ्यास व संशोधन यातूनही लेखन प्रक्रिया आकाराला येताना दिसते. ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर' ही संहिता राम गणेश गडकरी यांच्या 'एकच प्याला'चे समकालीन दृष्टीकोनातून मांडणी करते. शीर्षक सुचवते त्याप्रमाणे ही संहिता राम गणेश गडकरी यांच्या 'एकच प्याला' या शतकभरापूर्वी लिहिल्या गेलेल्या नाटकावर आधारित आहे. हे नाटक घडत 'एकच प्याला'वर बनत असलेल्या चित्रपटासाठी रंगपट तयार करणाऱ्या डिझाईन स्टुडिओमध्ये. गतकाळातली ही कथा आजच्या काळात घुसत जाते, काळाच्या सीमा उल्लंघत वर्तमान आणि भूतकाळ यांची सरमिसळ होत जाते. मूळ संहितेतल्या अतिरंजित घटना व संवाद आणि आज चालू असलेल्या डिझाईन स्टुडिओतल्या घटना या मागे पुढे येत राहातात, बेमालूमपणे एकमेकात मिसळत राहातात. सुरूवातीला वेगळी असलेली ही काळाची प्रतलं नाटकाच्या शेवटाकडे एकमेकातून वेगळी काढणं अवघड होत जातं. अर्थात, 'एकच प्याला'च्या संहितेतले संवाद केवळ स्मृतीरंजनादाखल पेरलेले नाहीत तर त्यातून आजच्या संदर्भातले मानवी नाती, सामाजिक उतरंडी, लिंगभाव सारखे मुद्दे ध्वनित होत राहातात. रमा आणि अॅपल कॉश्च्युम ठरवताना त्या काळाचा अभ्यास करायचा प्रयत्न करतात पण ते करताना त्या मूळ नाटकातल्या पात्रांमध्ये खोलवर रूतत जातात. इतकं की ते त्या पात्रांकडे सहानुभूतीने आणि कधी चिकित्सक दृष्टीकोनातून पाहात राहातात. काळाच्या खेळाच्या पलीकडे जाऊन समकालीनतेचे संभाषित साकारणारे लिंगभाव, बदलत्या लग्न व्यवस्थेवरचं भाष्य आणि लिंगभावातील प्रवाहीपणा हे मुद्दे त्या निमित्ताने चर्चिले जातात. सिंधु, सुधाकर यांच्या संवादातून, रघू आणि अॅपलच्या नातेसंबंधातून, गीताच्या स्वगतातून किंवा अॅपलच्या एकाचवेळी तळीराम व सिंधुच्या पात्रात शिरताना मॅनेक्विनबरोबरच्या प्रसंगातून हे मुद्दे विविध पद्धतीने अधोरेखित होताना दिसतात.

मराठीतील शोकांतिका मानली गेलेली ही संहिता मूळ नाटकाचा आजच्या संदर्भात अर्थ तर लावतेच पण त्या प्रकियेतून काही तथ्य आणि संदर्भ यांना एकत्र आणत वाचकांना एका परीने संहितेतील आजवर अस्पर्श असलेले मुद्दे व अर्थ यांना परिचित करते. F 1/105 आणि आनंदभोग मॉल मधली जातीय व भाषिक पार्श्वभूमीतून पात्रं असली तरी 'सिंधु, सुधाकर..’ मधली पात्रं ही अशी कोणतीही लेबलं घेऊन येत नाहीत. ती केवळ शहरी मध्यमवर्गीय स्त्री पुरूष म्हणून आपल्या समोर येतात. त्यांच्या 'ओळखीच्या' गुंतागुंती या केवळ लिंगभावापुरत्या मर्यादित राहतात. कपडे बदलून ती पात्रं आपली 'ओळखी'ची अदलाबदल करतात, काळाच्या सीमा ओलांडतात. यात इतिहास, वारसा, परंपरा, वर्तमान अशा अनेक प्रकारे गुंतागुंतीच्या रचना व त्यातले बारकावे ही संहिता मांडते. या संहितेचं वाचन करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे नाटककार केंद्रीत रचनेतून बाहेर पडत त्या भोवतालच्या एेतिहासिक, सामाजिक घडामोडी, भाषा, सौंदर्यशास्त्रीय कल्पना यांची गुंफण यात केलेली दिसते. त्या पण ते करताना मूळ संहिता व त्याच्या बांधणीतून पुन्हा नाटककार केंद्रीत प्रक्रिया यात ते अडकते. गडकरींचे नाटक व त्याचे पुनर्वाचन या पठडीत विचार केल्याने इतर संदर्भांना गौण स्थान मिळते की काय असेही वाटते. शिवाय, त्यातल्या व्यापक जीवनदृष्टी लक्षात घेऊनही गडकरी यांचे मध्यमवर्गीय चौकटीतले नाटक का विचारात घ्यावेसे वाटते, हा मूलभूत प्रश्न उरतो.

हा प्रश्न विचारताना हे मात्र जरूर नमूद करायला हवे की निम्नजन किंवा 'इतर' आशुतोषच्या लेखनातील महत्त्वाचा अवकाश व्यापतात. ते 'बळी' स्वरूपात न येता सबल पात्रे म्हणून आपल्यासमोर येतात आणि भौतिक परिस्थितीने निर्माण केलेले त्यांच्यातले गुंतागुंतीचे संबंध आणि सामाजिक आंतर्विरोध हाही सखोलपणे मांडला गेलेला दिसतो. ‘सिंधु, सुधाकर...’मधल्या शिवाच्या तोंडी वाक्य आहे: “इतिहास फक्त वर्तमानच फिरतो.” मला वाटतं, आशुतोष यांच्या लिखाणात इतिहास आणि परंपरेचं हे असं वर्तमानात फिरणं, गोते खाणं आणि वर्तमान संदर्भांना स्पष्टपणे समोर आणणं हे त्यांच्या सर्वच नाटकांतला एक समान धागा म्हणून पाहाता येतो. या प्रक्रियेत अनेक संदर्भ एकत्रित व विलगपणे गुंफलेले दिसतात. ही गुंफण उलगडण्यात वाचकांची कसोटी लागते तर कधी कधी ते केवळ उल्लेखापुरते येऊन जाते, असेही वाटते. त्यामुळेच आधुनिकतेच्या प्रक्रियेकडे चिकित्सक नजरेने पाहाताना अधिक खोलात जाऊन या वास्तवाचा शोध घेता येतो का, त्यातल्या अंतःप्रवाहांचा आवाका यातून खणून काढता येतो का आणि या साऱ्या विसंगतीच्या पोटात दडलेल्या द्वंद्वात्मकतेची जाणीव सखोलपणे उतरू शकते का, याचा विचार गरजेचा ठरतो. आणखी एक सामाईक गोष्ट जाणवते ती म्हणजे या संहितांचा शेवट. संहितांच्या शेवटाला ठराविक दिशा न देता ते खुले ठेवण्याची जोखीम आशुतोष पत्करतात. यातून वाचकांना कल्पकतेची व अर्थघटनाची मुभा मिळते पण लेखकाची भूमिका बऱ्याचदा अस्पष्ट अथवा संदिग्ध राहाते. जातीचा इतिहास, धर्माचा इतिहास, रंग, स्पर्श, भाषा यांचा हजारो वर्षांचा इतिहास आपल्यासमोर या पात्रांतून व नाट्य अवकाशातून उभा ठाकतो. पण हे करताना राजकीय – सामाजिक परिप्रेक्ष्यातून धूसर रेषेवर ही नाटके आणून सोडतात. याखेरीज, मराठी नाट्यक्षेत्रात मूलभूत कलात्मक लिखाणाची व त्यातील फॉर्ममधल्या प्रयोगशीलतेची वानवा असताना ही पुस्तक द्वयी आशुतोष पोतदार यांचे लिखाण मराठी वाचकांपर्यंत पोचवण्यात मोलाची भूमिका बजावते.


लेखक: आशुतोष पोतदार
प्रकाशक: वॉटरमार्क पब्लिकेशन, पुणे
आनंदभोग मॉल आणि पुलाखालचा बोंबल्या मारूती
पाने: ११२ | मूल्य: १६०
F1/105 आणि सिंधू, सुधाकर, रम आणि इतर
पाने: १३६ | मूल्य: १६०

पूर्व प्रसिद्धी: परिवर्तनाचा वाटसरू, -१५ एप्रिल, २०१८

'हाकारा' कशासाठी? / Why 'Hakara'?

मे २०१७ मध्ये पहिली आवृत्ती आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो तेव्हापासून 'हाकारा' का? हा प्रश्न अनेक वेळा आम्हाला विचारला गेला. 'हाकारा'ची कल्पना प्रत्यक्ष आकार घेऊ लागल्यापासून ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. कला, साहित्य आणि सामाजिक-सांस्कृतिक भान या सगळ्याला एकत्र बांधणारं, त्यावर चर्चा घडवून आणणारं एक अवकाश असावं, या विचारातून 'हाकारा'ला सुरूवात झाली. यावर विचार करताना, त्याला शब्दरूप देताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आज असं अवकाश मर्यादित रूपात  आपल्याला दिसतं.  त्याची व्याप्ती आणि खोली वाढवायची असेल तर त्यावर नव्याने लिखाण, चर्चा आणि चिकित्सा व्हायला हवी. त्याच्या  कक्षा रुंदावायच्या असतील तर माध्यम पण ते अवकाश सामावणारे हवे आणि सहजपणे वाचक अभ्यासकांपर्यंत पोचवण्यासाठी उपलब्ध असणारं  हवं. त्यामुळेच  नवमाध्यम त्याच्या लवचिकतेमुळे माध्यमाचे आणि आरेखनाचे प्रयोग करायला उपयोगी ठरलंय. दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा द्वैभाषिकतेचा. मराठी आणि इंग्रजी भाषेत घडणारी मांडणी, विचारमंथन आणि देवाणघेवाण यातून समृद्ध चर्चाविश्व कसं आकाराला येईल, त्याकरिता कोणती नवी माध्यमे आणि घाट वापरता येतील यावर सातत्याने संवाद घडत राहावा, यासाठी हा 'हाकारा'चा पार.


Snehal Goyal, Before I lose them forever (Edition 01: Memory II)







 
K.G. Subramanyan, Santhal Letters, Asia Art Archive collection (Edition 01: Memory II)


'हाकारा'चं रसायन हे जर्नल किंवा नियतकालिक आणि  दृश्यात्मकता व त्यातली सौंदर्यदृष्टी यांच्या मिश्रणातून तयार होत आहे. प्रत्येक आवृत्ती ही नव्या विषयाला धरून त्या भोवती रचलेल्या कथा, कविता, चित्रं, मुलाखती, लेख यासारख्या निरनिराळ्या रचनाप्रकारातून आकार घेते. 'आठवण' मध्ये हिंसेच्या अनुभवाच्या कैफियतीपासून साध्या पण आयुष्य बदलून टाकणाऱ्या घटनांना उजाळा मिळतो. 'आतलं, बाहेरचं, अधलं-मधलं' मध्ये गुंतागुंतीच्या आणि असंख्य पदर असलेल्या जगण्याच्या, कलाव्यवहाराच्या, सांस्कृतिक इतिहासाच्या अनेक पैलूंवर मांडणी केली आहे. ही मांडणी करणारे कवी, चित्रकार, छायाचित्रकारांपासून इतिहासकार, कथाकार, नाटककार आणि शास्त्रज्ञ आहेत. एकाच विषयाच्या अनेक बाजू, अनेकविध दृष्टीकोन त्या विषयाबद्दलच कुतूहल जागवतात, जागं ठेवतात. त्याचे निरनिराळे पैलू आपल्यासमोर आणतात. यातून 'हाकारा'तील मांडणी ही ठरावीक पद्धतीच्या अभिव्यक्तीच्या किंवा कलाविष्काराच्या रूपांना धडका देत त्यांचा परीघ मोठा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानिमित्ताने आम्ही मांडलेली 'हाकारा'ची भूमिका:

हाकारा । hākārā
(नाम/noun)
//: (m) हाक, बोलावणे;

a call, a general or a great and continued calling


हाकारा’ या मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणा-या ऑनलाईन नियतकालिकाच्या अवकाश-निर्मितीमागे भवताल, आपण आणि आपली निर्मिती यामधील गुंतागुंतीचं नातं समजून घेण्याची भूमिका आहे. जगणं, भाव-भावना, सौंदर्य आणि संस्कृतीविषयक विचार आपल्या कला-दृष्टी आणि निर्मितीवर, लिहिण्यावर आणि वाचण्यावर कसे आणि कोणते प्रभाव पाडत असतात? मानवी बदल कलाविषयक देवाण-घेवाणी आणि सौंदर्य- जाणिवांशी कसे जोडून घेत असतात? सतत बदलत्या आणि प्रवाही असणाऱ्या कला-जाणिवा आपला भवताल कसा घडवत असतात? या आणि इतर मुद्द्यांचं आकलन लिखित आणि दृश्य माध्यमातून ‘हाकारा’च्या पारावरुन संवादी रीतीनं मांडण्याचा प्रयत्न आहे. काळ, संस्कृती आणि कला यांच्यातील देव-घेव नेहमीच बहुपदरी आणि बहुपेडी राहिलेली आहे. अभिव्यक्ती सद्यकालात घडत जात असते तर उद्याकडे पाहात आताचा काळ गतकाळाशी आपली नाळ जोडून असतो. कलाकृतीमध्ये तीनही काळ एकमेकांत अशा अनोख्या रितीने गुंतलेले असतात की त्यांच्यातील सीमारेषा धुसर होतात. त्रि-काळाच्या सत्य आणि आभासी खेळातून कला अभिव्यक्ती, सौंदर्यभान आणि तिचे बदलते निकष यातून समकालीन अभिव्यक्ती साकारत असते. अभिव्यक्तीने निरनिराळे घाट, शैली आणि रचना अंगिकारणं तसंच अशा अभिव्यक्तीचं सखोल आकलन करुन घेणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अशा तऱ्हेनं आकाराला येणारी नाविन्यपूर्ण निर्मिती आणि चिकित्सक प्रक्रिया ‘हाकारा’चा गाभा असेल.

‘हाकारा’च्या पारावरून बोलावण्यामागं लिखित आणि दृश्य कला माध्यमात ऐरणीवर असलेल्या मुद्द्यांविषयी सखोल चिंतन आणि समग्र चर्चा घडवून आणणं हा उद्देश आहे. आशय, घाट आणि रचनेचे ‘संहिता’ अंतर्गत आणि ‘संहिता’ बाह्य भवतालाशी असलेल्या आंतरिक संबधांचं विश्लेषण इथं केलं जाईल. कला-माध्यमांचं आंतर-संवादी स्वरुप निरखणं जसं महत्वाचं ठरतं तसंच त्यांची इतिहास, तत्त्वज्ञानाबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानासारख्या ‘इतर’ विद्याशाखांशी घातली जाणारी सांगड मोलाची ठरेल.

‘हाकारा’चा पार वैविध्यपूर्ण शैलीतले लिखाण आणि मांडणी, समीक्षा, कविता, गाणी, कथात्म-साहित्य, वाद-विवाद, मुलाखती, दृक-श्राव्य आणि दृश्य रूपांची गुंफण अशा विविधांगी आविष्कारांतून आपल्याशी मुक्त आणि थेटपणे संवाद साधेल असा आम्हाला विश्वास वाटतो.

हाकारा'ची येती आवृत्ती आता/Now  या विषयाभोवती गुंफलेली आहे. आपल्या कलाकृती/लिखाण पाठविण्यासाठी पाहा: http://www.hakara.in/appeal-call-3/

आशुतोष पोतदार आणि नूपुर देसाई
संपादक, हाकारा । hākārā


Current edition


Our contemporary lives and actions have been radically influencing expressions of writing, image-making and publicizing. Conversely, the production, consumption and circulation of expressions have influenced the aesthetics, politics and networking today. With hākārā, our aim is to explore and practice newer ways of producing and appreciating creative expressions while encouraging dialogue between different fields of expressions. Considering a rich and diverse body of creative work, we’ll focus on creative and critical writing in Marathi and English across literary and visual forms of expressions.
In keeping with this focus, hākārā will be published online in freely accessible and interactive format by focusing on the area that may help us address the diversities and the synergies implicit in literary and visual cultures.

The hākārā editors would be interested in the sharing of research, speculations, literary and visual work presented innovative ways that responds to current debates while being attentive to the nuanced understanding and interconnectedness of content, form and society. We particularly encourage innovative nature of literary and visual images, critical artistic practices and developments that inform the contemporariness of the medium (and its pasts and futures), as well as the formal qualities of words and images in changing contexts.

To submit your work for our forthcoming edition on आता/Now , please see our Next Call here: http://www.hakara.in/appeal-call-3/

Ashutosh Potdar and Noopur Desai
Editors, हाकारा । hākārā.

शांतिनिकेतनचा समकालीन शिलेदार: संचयन घोष यांची मुलाखत (भाग ३)



निराळ्या अवकाशात आणि सामाजिक संदर्भात काम करताना तुमच्या प्रक्रियेमध्ये कोणते बदल घडत जातात? गेल्या कोची बिनालेतल्या 'क्रिटीकल जंक्चर' या प्रदर्शनातल्या तुमच्या संदर्भात मी हे विचारतेय...

गेल्या कोची बिनालेच्या वेळी मी एक वर्तमानपत्र तयार केलं, 'डोन्ट टॉक अबाऊट पोलंड'. मल्याळम सिनेमात हे वाक्य बऱ्याचदा वापरलं जातं. कम्युनिस्ट भावाला दुसरा भाऊ सुनावत राहतो की पोलंड मध्ये अमकं झालं, तमकं झालं, त्यावर कम्युनिस्ट असलेल्या भावाचं उत्तर असतं, ''डोन्ट टॉक अबाऊट पोलंड'! तो आमचा अंतर्गत मामला आहे, या अर्थी. हे मी वापरायचं कारण म्हणजे 'क्रिटीकल जंक्चर' हे प्रदर्शन कोचीत पोलंडच्या सहयोगानं भरवलं होतं. रशिया भेटीनंतरचे टागोरांनी सहकार चळवळीबद्दल मांडलेले विचार किंवा कम्युनिस्ट सत्ता पोलंडमध्ये आता नसताना तिथे घडलेले बदल, भारतातल्या कम्युनिस्ट चळवळीतून आलेली सांस्कृतिक मांडणी यावरचे जुने लेख, आत्ता पोलंडमध्ये चालू असलेल्या सामाजिक-सांस्कृतिक हस्तक्षेपावरचे लेख यांचा त्याच्या समावेश केला होता. दुसरं म्हणजे मी गेली काही वर्ष हरीकुमार गुप्ता या लोककलाकाराबरोबर काम करतोय. सामाजिक व्यंगावर गाणी आणि सादरीकरणातून टीका-टिप्पणी करण्याचा हा प्रकार. त्यांची स्वतःची अशी काही कलेविषयक भूमिका आहे, संकल्पना आहे. ती पण या पत्रिकेत छापली होती. कोचीत एका चहाच्या टपरीवर आम्ही दोघांनी त्याचं जाहीर वाचन केलं. पूर्वी कम्युनिस्ट चळवळ जोरात असताना कामगार रोज चहाच्या टपरीवर जमून असं वाचन आणि त्यावर चर्चा करायचे. कोचीत ते हळूहळू बंद पडलं. पण साधारणपणे १९७० पर्यंत त्यांच्या रोजच्या जगण्याचा तो अविभाज्य भागच होता. तोच फॉर्म आम्ही वापरायचं ठरवलं

 

त्यातल्या विडिओमधून सध्या चालू असलेल्या माझ्या प्रकल्पाची प्रक्रिया टिपलेली दिसते. हरीदा शांतिनिकेतनपासून ३० किमीवरच्या एका गावात राहतात. त्यांचं गाव, तिथल्या खाणी, लोकांचं जगणं हे सगळं त्यांच्या गाण्यात, कवितेत उतरताना दिसतं. इथली उपसलेली माती दूरच्या कारखान्यात जाते आणि तीच माती गावातले लोकं परत विकत घेतात. त्याच्या वस्तू बनवून तिथल्याच बाजारात विकतात. वस्तूंची ही देवाणघेवाणही त्या विडीओत दिसते. स्वतःचीच माती ते विकतातही आणि विकतही घेतात! हरीदांबरोबर मी निरनिराळ्या अवकाशात काम केलंय, त्यांचं गाव, तिथल्या जागा, कलकत्त्याची कला दालनं किंवा हा कोचीचा प्रकल्प. त्यांच्याबरोबरच्या गप्पांमधून, चर्चेतून हे आकाराला येतं. त्याच बरोबर, 'समकालीन' या संकल्पनेकडे आपण कसं बघतो, तेही महत्वाचं ठरतं. समकालीन ही प्रवाही संकल्पना आहे. ती स्थानिक पातळीवरही आकार घेत असते आणि ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. सर्वसामान्यपणे ज्याला आपण पारंपारिक म्हणतो त्यातही ही समकालीनता उमटताना दिसते. तसं बघायला गेलं तर ती 'साइट-स्पेसिफीक' असते. त्या प्रक्रियेत सहभागी व्हायला मला आवडतं. कोची सारख्या पूर्णपणे अनोळखी ठिकाणी काम करताना दोघांसाठी ती प्रक्रिया घडत होती: सांस्कृतिक, भाषिक पातळीवरही.

अशा प्रकारे सहयोगातून कलाकृती उभ्या करताना नेमकं काय वेगळं घडत असतं? म्हणजे कलाकार म्हणून त्यावर नेमका कुणाचा हक्क असतो?

कलाकृतीवर कलाकाराचा हक्क तर असतो. कलाकारच त्या कलाकृतीचा कर्ता/कर्ती असते. त्याच्या पूर्णपणे पलिकडे जाऊन काहीतरी असेल अशा रोमॅंटिक विचारातही आपण अडकता कामा नये. माझं यात काहीच नाही, सगळं लोकांनीच केलंय असं काही नसतं. मुद्दा असा आहे की त्याची व्याप्ती तुम्ही कशी वाढवता, ज्यायोगे ती कलाकृती फक्त एका व्यक्तीची किंवा एकाच विचारातून आलेली न राहाता जास्त व्यापक बनेल. तुम्ही इतरांचे मुद्दे विचारात घेता तेव्हाच ती परिपूर्ण बनते. अशा कलाकृतींचा मुळात हेतूच तो आहे. पण कलाकृती निर्माण करताना सगळ्यांना सारखाच हक्क असेल, ती प्रक्रिया पूर्णपणे लोकशाही पद्धतीने हाताळली जाईल, ही कल्पना जरा युटोपिक आहे. त्यामुळे कलाकृती बनवताना तुम्ही अनेक मुद्दे आणि भूमिका विचारात घेतलेच पाहिजेत, त्या विचारांचं बहुपेडी असणं हाच त्याचा गाभा आहे.

खाजगी आणि सार्वजनिक यासारख्या कल्पनांचा कलाक्षेत्राच्या संदर्भात, खास करून जनकलेचा विचार करताना, तुम्ही कसा विचार करता? त्या कशा आकाराला आल्या?

हे मात्र मी शांतिनिकेतनमध्ये शिकलो. तिथल्या सामूहिक जगण्यातून आणि एकत्र येऊन केलेल्या कला उत्सवातून शिकत गेलो. कारण आपल्याकडे त्याचं काही प्रारूप तयार नाहीये किंवा इतिहासातले काही दाखले नाहीयेत. सार्वजनिक असणं याचं आपल्याकडचं उदाहरण म्हणजे स्वातंत्र्य चळवळ आणि राष्ट्रवादाचा उदय. ब्रिटीशविरोधातून तो त्या काळात आकाराला आला. शहराला भिडणारा असा सार्वजनिक अवकाशाविषयीचा विचार आणि मांडणी आपल्याकडे झाली नाहीये. त्यामुळे या ठराविक राष्ट्रवादाच्या चौकटी बाहेर जाऊन आपल्याला उदाहरण शोधावी लागतात. ते जरा अवघडच काम आहे. गेल्या २०-२५ वर्षात मात्र आपल्याला आजूबाजूला ते आकाराला येताना दिसायला लागलंय. १९९० नंतरच मुख्यतः कारण त्याआधी पब्लिक-प्रायवेट याचा विचार करणाऱ्या कलाकृती फारशा नव्हत्या. विवान सुंदरमचं कलकत्त्यातलं इन्स्टलेशन, 'खोज'चे प्रकल्प किंवा सफदरच्या हत्येनंतर दिल्लीत सुरू झालेलं 'सहमत'चं काम, एवढंच. त्याशिवाय, नाटकाच्या क्षेत्रात काहीतरी केलं जात होतं पण दृश्यकलेच्या बाबतीत मात्र फारसं घडलेलं दिसत नाही. पण त्याआधी पाहायचं झालं तर १९६० मधल्या सोमनाथ होर यांच्या 'तिभागा डायरी' आहेत. त्यांनी तिभागा चळवळीच्या काळात गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या, तिथल्या लोकांच्या वेदना समजून घेतल्या. त्यातून या डायरी तयार झाल्या. किंवा दुसऱ्या बाजूला नव-सिनेमा आला. त्यातही कॅमेरा प्रत्यक्ष गावात, लोकांपर्यंत पोहोचला, खऱ्या लोकेशनवर गेला. कलेच्या बाबतीत 'खाजगी' आणि 'सार्वजनिक' या कल्पनांची एेतिहासिक पार्श्वभूमी बघताना याचाही विचार केला पाहिजे. १९६० ते ८० मध्ये देशभर अशा प्रकारचे प्रयोग चालू होते. कलाप्रकल्प म्हणून नव्हे तर सामाजिक कार्याच्या क्षेत्रातले उपक्रम आणि संवाद या पातळीवर ते काम चालू होतं. पण त्यात बरीच सर्जनशील मंडळी काम करतच होती. फक्त सामाजिक विकासाचा मुद्दा नव्हता तर जगणं, व्यवहाराच्या पद्धती यातूनही ते घडत होतं. पण त्या इतिहासाचं दस्तेवजीकरण झालं नाही. त्याविषयी लिहिलं गेलं नाही, त्यामुळे त्यातलं आज फारच थोडं आपल्यापर्यंत पोहोचतं. आसाममध्ये एकानी जंगल उभं केलं. अशी उदाहरण खूप आहेत. त्याचा इतिहास लिहिला गेला पाहिजे नाहीतर मग कलाकारांना सतत 'या प्रकारच्या कला व्यवहाराची सुरूवात कुठून झाली?' या प्रश्नाला सतत सामोरं जावं लागतं. शांतिनिकेतन मधली भित्तीचित्रं आणि रामकिंकर यांची शिल्पं याच्या पलिकडे अकादमीक क्षेत्रात त्याचं उत्तर मिळत नाही


 

मला कलाभवनमध्ये पण 'तू चित्रं का काढत नाहीस?' या प्रश्नाला तोंड द्यावं लागतं. माझं उत्तर एवढंच आहे की मी कॅनव्हासवर चित्रं काढत नाही. इतर मटेरिअल, प्रक्रिया, अनुभव यातून ते आकाराला येतं. तो संघर्ष कायम चालू असतो. पण थोडं पुढं-मागं करत त्यातूनच मार्ग काढावा लागतो. मला कला शिक्षक म्हणून दिलेल्या चौकटी काम करावं लागतं. मी फक्त त्याची व्याप्ती वाढवायचा प्रयत्न करतो. उदाहरण द्यायचं झालं तर मला 'लाईफ स्टडी' शिकवावं लागतं. पण मग तिथंच मी 'शॅडो कास्टींग'चा प्रयोग केला. असे स्टडी करताना मग मी त्यांना सामाजिक अवकाशात घेऊन जातो. तिथले अनुभव, त्या जागेचा इतिहास, निरनिराळी मटेरिअल हे सगळं तुमच्या चित्रात कसं आणता येईल आणि ते समजून घेऊन चित्र कसं तयार होईल, असा विचार मी विद्यार्थ्यांना करायला लावतो. आता केवळ माध्यम आणि घाट याच्या पलिकडे जाऊन बरेचजण विचार करायला लागलेत असं दिसतंय. अर्थात, या सगळ्याबद्दल आमच्या सतत वाद आणि चर्चा होतच असतात.

या सारख्या प्रकल्पांवर काम करताना दोन महत्त्वाचे मुद्दे समोर येतात, एक म्हणजे आर्थिक पाठबळ आणि दुसरं म्हणजे त्यांचं दस्तेवजीकरण करणं. त्या संदर्भात काय सांगू शकाल?

आत्ता मी ज्या प्रकल्पावर काम करतोय त्याला 'आयएफए'ने थोडी मदत केली आहे. मी शक्यतो फंडिंग एजन्सीकडून पैसे घेऊन काम करत नाही कारण मग फक्त पैसे मिळवायला हा काम करतोय अशी कलाकाराची प्रतिमा बनते. त्यापेक्षा मला लोकांबरोबर काम करण्यात, त्यांच्याशी संवाद साधण्यात रस आहे. यात मी एका नाटकाच्या ग्रुपबरोबर काम करतोय. वेगवेगळ्या प्रकारे लॅंडस्केप कसं दाखवता येईल याचा विचार आम्ही करतो आहोत. बीरभूममधल्या वेगवेगळ्या भागात आम्ही मिटींग घेतोय. तिथली जमीन, निसर्ग आणि एकूण राहाणीमान समजावून घेतोय. यात विविध क्षेत्रातले लोक एकत्र आले आहेत. ते त्यांच्या कामातून आपापल्या भागातल्या लॅंडस्केपला कसं भिडतात, ते पाहायचा प्रयत्न आहे. ते एकत्र येऊन हे धागे एकत्र आणू शकतात का आणि या जमिनीची, अवकाशाची काही वेगळी कल्पना करू शकतात का, ते आम्हाला पाहायचं आहे. जमीन ही केवळ मालकी हक्कापुरती मर्यादित न राहाता अशा इतर काय शक्यता असू शकतात ते पाहाणं महत्त्वाचं आहे. त्या त्या भागातले लोक-कलाकार, कारागीरांना आम्ही बोलवायचं ठरवलं. ते त्यांची रोजंदारी सोडून येणार तर त्यांना किमान जाण्या-येण्याचा खर्च तरी द्यायला हवा म्हणून मग मी 'आयएफए'ला विचारलं. त्यांनी आर्थिक मदत करायची तयारी दाखवली. ते पैसे संशोधनाकरता असले तरी ही प्रक्रिया तेवढ्यापुरती मर्यादित नाही. ती मुख्यतः संवादी प्रक्रिया आहे. आम्ही सुरूवात टागोरांकडून प्रेरणा घेऊन सहा ऋतू, सहा गावं यापासून केली. नंतर मात्र त्याची दिशा बदलली. भौगोलिकदृष्ट्या एकदम वेगळ्या असलेल्या सहा जागा आम्ही निवडल्या. लोकांना भेटलो. त्यांच्या ओळखीतून अजून काही लोक जोडले गेले. त्यांच्या बरोबरच्या गप्पांमधून काय काय करता येईल ते ठरवलं. यासाठी सहा शामियाने उभे केले. त्या त्या ठिकाणी त्यात कार्यक्रम आयोजित केले. एक दिवसभर एकत्र जमून अनेक गोष्टी समजून घेतल्या, चर्चा केली. त्याचा विडिओ आणि साऊंड रेकॉर्डिंग आहे.

यात एक़ गोष्ट नक्की की आम्ही कुठलाही परफॉर्मन्स करत नाही. आपापल्या कला व्यवहाराचं चिकित्सक आकलन करणं हा त्यामागचा हेतू आहे. प्रत्येक जण आपापल्या कला प्रकाराचे बारकावे सगळ्यांसमोर ठेवतो आणि मग त्यावर चर्चा होते. यात शेतकरी पण आहेत, ते शेतीही करतात आणि लोककलाकार आहेत, ते गाणीही गातात. यात शेती तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक इतिहासकार आहेत त्यामुळे जमिनीच्या प्रश्नांवर पण खूप चर्चा होते. शेतीच्या प्रश्नावर चर्चा होते. पण त्या भागातून आलेल्या लोककलाप्रकारांवरही गप्पा होतात. त्यात नेमके काय आणि कसे बदल घडता आहेत, ते हे कलाकार मांडतात. त्या शामियानाचं आणि त्यावर काढलेलं डिजाईन हा पण एक चर्चेचा मुद्दा असतो. त्या डिजाईनमध्ये तिथल्या लोकसंख्येची माहिती पुरवणारे आलेखही काढले जातात. एके ठिकाणी या शामियान्याच्या कापडावर काही महिलांनी त्यांची गाणी लिहिली, भरतकाम केलं. शेवटच्या वेळी सगळीकडची अशी आकडेवारी घेऊन त्याची शामियानाच्या कापडावर चित्ररूपात मांडणी केली. त्याला साधारण कार्यशाळेचं स्वरूप येतं त्यामुळे येऊन फक्त सादरीकरण करून गेले असं होतं नाही. लोकांचा पूर्णवेळ सहभाग यात अपेक्षित आहे. वसंत ऋतूमध्ये एका आदिवासी खेड्यातल्या शाळेत हा कार्यक्रम पार पडला. तिथल्या स्थानिक गोष्टी आणि आधुनिकता यांचा मेळ साधत टागोरांच्या विचारांतून ही शाळा चालवली जाते. ते गुंतागुंतीचे संबंध काय आहेत हेही आम्हाला समजून घ्यायचं होतं. संथाळ नृत्य तिथे सादर केलं गेलं पण त्यात आधुनिक काळात नेमके कोणते बदल घडले यावरही चर्चा केली गेली.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे कुणीही 'प्रेक्षक' नसतं. सगळेजण या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतात. हे सहा कार्यक्रम झाल्यावर त्यांना एकत्र कसं आणायचं हा मोठा प्रश्न आहे. पण आम्ही त्या त्या ठिकाणी हे अनुभव प्रदर्शित करायचा विचार करतो आहोत, तसंच इतर ठिकाणीही ते घेऊन जायचा विचार करतो आहोत. पण ते बाहेर घेऊन जाताना त्यामागचं आमचं धोरण काय असेल ते नीट ठरवावं लागेल. ते तुम्ही इतरत्र कसं घेऊन जाता, त्याची मांडणी कशी करता, त्यातून काय पद्धतीचे संबंध प्रस्थापित होतात ते लक्षात घेणं फार गरजेचं आहे. दुसरं म्हणजे त्याच्या भोवती सजावट न करता ते जसंच्या तसं लोकांसमोर मांडणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. तो दस्तेवज अपूर्ण असू शकतो, त्यात त्रुटी असू शकतात, ती चालू प्रक्रिया म्हणून लोकांसमोर येऊ शकते. त्या प्रकल्पाचं बहुपेडी असणं हे दस्तेवजीकरणाच्या प्रक्रियेत टिकवता आलं पाहिजे. विविध पद्धतीने ते करता येऊ शकत. विडिओ रेकॉर्डिंग, रेखाटनं, नोंदी ठेवणं, डायरी, फोटो, इत्यादि. अशा प्रकल्पांमध्ये त्यांची तात्कालिकताही तेवढीच महत्त्वाची असते. त्यामुळे विडिओ रेकॉर्डिंगमध्ये अगदी पाच वेगवेगळ्या आवृत्ती पण असूच शकतात! त्यातून एखादं नवीन कथनही तयार होऊ शकतं. अर्थात, ती वेगळीच कलाकृती ठरेल. ती या प्रक्रियेला पुरेसा न्याय देऊ शकत नाही. मला असं वाटतं की त्या दस्तेवजाचा अस्सलपणा जपणं मोलाचं आहे. कारण माझ्यासाठी फॉर्मपेक्षा प्रक्रिया जास्त महत्त्वाची आहे.


मुलाखत आणि अनुवाद: नूपुर देसाई
छायाचित्र सौजन्य: संचयन घोष

पूर्वप्रसिद्धी: पुरोगामी जनगर्जना, मार्च २०१७